मुंबईतील उपनगरीय रेल्वेचा प्रश्न जोपर्यंत मार्गी लागत नाही, तोपर्यंत मुंबईत बुलेट ट्रेनची एकही विट रचू देणार नाही, अशी ठाम भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली आहे.
मुंबई- मुंबईतील उपनगरीय रेल्वेचा प्रश्न जोपर्यंत मार्गी लागत नाही, तोपर्यंत मुंबईत बुलेट ट्रेनची एकही विट रचू देणार नाही, अशी ठाम भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली आहे. मोदींना बुलेट ट्रेनचे जे काही बांधकाम करायचे असेल ते त्यांनी गुजरातमध्ये करावे. मुंबईत बुलेट ट्रेनचे काम करण्याचा प्रयत्न केल्यास त्याला ‘मनसे’कडून प्रत्युत्तर दिले जाईल, असे राज यांनी ठणकावून सांगितले.
शुक्रवारी प्रभादेवी स्थानकावर झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी कृष्णकुंज निवासस्थानी पत्रकार परिषद बोलावली होती. यावेळी राज यांनी रेल्वे प्रशासन आणि भाजप सरकारवर जोरदार टीका केली. मुंबईतील रेल्वे स्थानकांच्या दुर्दशेसाठी रेल्वे प्रशासन आणि सरकारच जबाबदार आहे. मागच्या साडेतीन वर्षात नोटेचा रंग सोडून काय बदलले असा सवाल त्यांनी केला. काँग्रेस जाऊन भाजपचे सरकार आले तरी यामध्ये काहीच फरक पडलेला नाही, असे ते म्हणाले.
इथे लोकांचे चालणे कठीण झालेय, तर बुलेट ट्रेन कशाला हवी? आहेत त्या गोष्टी सुधारण्याची गरज असताना बुलेट ट्रेन हवीच कशाला. बुलेट ट्रेनचा विषय आता इथेच संपला, मोदींनी त्यांच्या गुजरातमध्येच बुलेट ट्रेन सुरू करावी. मुंबईत बुलेट ट्रेन होऊ देणार नाही आणि तुम्ही संघर्षाला उठलात तर आम्हीही संघर्षानेच उत्तर देऊ, असा इशारा राज यांनी दिला आहे.
५ ऑक्टोबर रोजी चर्चगेटला धडक
शुक्रवारी झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेच्या निषेधार्थ ५ ऑक्टोबरला चर्चगेट येथील रेल्वेच्या मुख्यालयावर मोर्चा काढणार असल्याची घोषणाही राज ठाकरे यांनी केली आहे. विशेष म्हणजे राज ठाकरे स्वत: रस्त्यावर उतरुन या मोर्चाचे नेतृत्त्व करणार आहेत. येत्या तीन दिवसात मुंबईतील स्थानकांच्या परिस्थितीचा अहवाल घेऊन रेल्वे प्रशासनाला जाब विचारण्यासाठी मी स्वत: रस्त्यावर उतरून रेल्वे मुख्यालयावर मोर्चा काढणार आहे. मुंबईकरांनी मोर्चात सहभागी होऊन आपला संताप व्यक्त करावा, असेही राज म्हणाले.
एलफिन्स्टनवरची घटना अतिशय दुर्दैवी होती. पण व्यवस्था, यंत्रणेवर ताण येऊ म्हणून काल घटनास्थळी गेलो नाही. चिंतेचा आव आणून त्या गोष्टी पाहण्यात अर्थ नसतो. संजय गवते १० ते १५ वर्ष एलफिन्स्टन पुलासाठी भांडत आहेत. तर बाळा नांदगावकरांनीही अनेक वर्ष याचा पाठपुरावा केला आहे. काँग्रेस सरकार जाऊन भाजप सरकार आले. त्यांनाही तीन वर्षे झाली परंतु एवढ्या वर्षात काहीही झालेले नाही, असा हल्ला त्यांनी चढवला.
यावेळी राज यांनी पुन्हा एकदा परप्रांतियांना लक्ष केले. परप्रांतियांमुळेच मुंबईतील पायाभूत सुविधांचा बोजवारा उडाल्याचा आरोप त्यांनी केला. आपल्याला दुश्मनांची गरज काय? कशाला हवा पाकिस्तान, कशाला हवा चीन?, लोकांना मारण्यासाठी रेल्वे पुरेशी असल्याचा संतापही त्यांनी व्यक्त केला.
इतके खोटे बोलणारा पंतप्रधान मी पाहिला नाही
राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढविला. इतके धादांत खोटे बोलणारे सरकार आणि इतके खोटे बोलणारा पंतप्रधान मी कधीच पाहिला नाही, अशी खरमरीत टीका राज ठाकरे यांनी केली. हे लोक खोटे बोलूनच सत्तेवर आले आहेत. सगळा सोशल मीडिया पाहिल्यावर लक्षात येते की निवडणुकीआधी काय बोललेत आणि नंतर काय बोलत आहेत. इतकं धादांत खोटे बोलणारे पंतप्रधान मी आजपर्यंत कधीच पाहिलेले नाही, अशी बोचरी टीका राज ठाकरे यांनी केली. एल्फिन्स्टन आणि परळ ब्रिजवरील दुर्घटनेच्या पार्श्वभुमीवर राज यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर सडेतोड टीका केली.