काळा पैसा, बनावट नोटा आणि दहशतवादी कारवायांसाठी वापरला जाणारा पैसा रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे व एक हजार रुपयांची नोट रद्दबातल ठरवण्याच्या घेतलेल्या निर्णयाचा फटका सर्वसामान्य माणसांना अधिक बसला.
मुंबई- काळा पैसा, बनावट नोटा आणि दहशतवादी कारवायांसाठी वापरला जाणारा पैसा रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे व एक हजार रुपयांची नोट रद्दबातल ठरवण्याच्या घेतलेल्या निर्णयाचा फटका सर्वसामान्य माणसांना अधिक बसला. या नोटा बंद केल्यामुळे तसेच शंभर रुपयांच्या नोटा उपलब्ध नसल्यामुळे सामान्य नागरिकांना बुधवारी जीवनावश्यक वस्तूंचीही खरेदी करता येत नव्हती. हाती पैसे आहेत; पण खर्च करता येत नाहीत. बँकेत आहेत, पण पैसे काढता येत नाहीत, या कात्रीत सापडला. त्यामुळे सामान्य नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
पाचशे व हजार रुपयांच्या नोटा अचानक चलनातून बंद केल्याची घोषणा झाल्यानंतर काही मिनिटांतच या नोटा स्वीकारणे बंद केले. याचा परिणाम सामान्य माणसांवर झाला. सकाळी मटण-मासे यांच्यासह भाजीपाला, कडधान्य खरेदीसाठी पाचशे रुपयांची नोट घेऊन बाहेर पडणा-या गृहिणींना प्रत्येक दुकानामध्ये नोट न स्वीकारली जात असल्याने शरमेने मान खाली घालून माघारी फिरण्याची वेळ येत होती. त्यामुळे रिकाम्या पिशव्या हलवत गृहिणींना पाणावलेल्या डोळय़ांनी घरी परतावे लागत होते.
सरकारने निर्णय जाहीर केल्यावरही दुधाच्या दुकानांमध्ये या नोटा स्वीकारणे बंद करण्यात आले. दुधाच्या दुकानांमध्ये दोन ते तीन लिटर दुधाची खरेदी करण्यासाठी पाचशे रुपयांची नोट आणणा-या ग्राहकांकडून ती नोट स्वीकारली जात नव्हती. त्यांचे भ्रमणध्वनी नोंद करून त्यांना क्रेडिटवर दूध दिले जात होते.
पाचशे घेतो, पण तेवढय़ाचेच मासे घ्या, पेट्रोल, डिझेल भरा
मासळी बाजारात गेलेल्या लोकांकडून कोळी बांधवांनी पाचशे रुपयांची नोट स्वीकारण्याची तयारी दर्शवली. परंतु पाचशे रुपयांची मासळी घ्यावी, असा आग्रहही कोळणींकडून केला जात होता. त्यामुळे एरव्ही शंभर, दोनशे रुपयांची मासळी घेणा-या सामान्य माणसानेही पाचशेची नोट घेतली जाते म्हणून तेवढय़ाचीच मासळी खरेदीला प्राधान्य दिले होते.
पेट्रोल, डिझेल तसेच सीएनजी गॅस भरण्यासाठी पेट्रोलपंपावर पाचशे व हजार रुपयांची नोट स्वीकारली जाणार असल्याने मध्यरात्रीपासून पेट्रोलपंपावर इंधन भरण्यासाठी वाहनांची गर्दी झाली होती. अनेक पेट्रोलपंपांवर पाचशे व हजाराची नोट स्वीकारली जात नव्हती. वाहनचालकांकडे आधीच विचारणा करून सुट्टे असतील किंवा पाचशे अथवा हजार रुपयांएवढेच जर इंधन भरायचे असेल तर भरून दिले जाईल, असे सांगितले जात होते.
रुग्णालयांमध्ये रुग्णांचे डिस्चार्ज आणि उपचार खोळंबले
नोटा बंदचा परिणाम रुग्णालयांमध्ये दिसून आला. अनेक खासगी तसेच महापालिका रुग्णालयांमध्ये डिस्चार्ज होणा-या रुग्णांकडून उपचाराचे पैसे भरताना पाचशे व हजारांचा नोटा पुढे केल्या जात होत्या. परंतु रुग्णालय व्यवस्थापनाकडून हे पैसे स्वीकारले जात नसल्यामुळे अनेक रुग्णांचा मुक्काम बिलाचे पैसे देता येत नसल्यामुळे रुग्णालयात वाढला.
महापालिका रुग्णालय आणि त्यातील औषधांच्या दुकानांमध्ये सुरुवातीला पाचशे व हजाराच्या नोटा स्वीकारल्या जात होत्या. परंतु दुपारनंतर या नोटा स्वीकारणे बंद केल्यामुळे रुग्णांसाठी औषधांची खरेदी करता येत नव्हती की, रुग्णांचे पैसेही नातेवाईकांना भरता येत नव्हते. महापालिका प्रशासनाकडून आदेश असल्यामुळे महापालिका रुग्णालयांमध्ये पाचशे व हजाराच्या नोटा स्वीकारण्याचे बंद करण्यात आले असल्याचे रुग्णालय व्यवस्थापनाकडून सांगण्यात येत होते.
महत्त्वाच्या बँका ८ वाजेपर्यंत खुल्या राहणार
पैसे जमा करण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन महत्त्वाच्या बँकांनी गुरुवारी आठ वाजेपर्यंत कामकाज करण्याचे ठरवले आहे. तसेच एटीएम शुल्क माफ केले असून पैसे काढण्याच्या मर्यादेत वाढ केली. स्टेट बँक ऑफ इंडिया, आयसीआयसीआय बँकेने गुरुवारी रात्री ८ वाजेपर्यंत बँका सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
तसेच ३० नोव्हेंबपर्यंत रोख रक्कम भरण्यासाठी आणि एटीएमचे सर्व शुल्क माफ करण्याचा निर्णय आयसीआयसीआय बँकेने घेतला आहे. तसेच डेबिट कार्डातून पैसे काढण्याच्या मर्यादेत वाढ केली. अॅक्सिस बँकेने रोख रक्कम हाताळणी शुल्क माफ केले आहे.
बँका शनिवार, रविवारी सुरू
नवी दिल्ली- नोटा जमा करण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन बँका शनिवारी व रविवारी सुरू ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. देशातील १४९ व्यावसायिक बँका, ५६ ग्रामीण बँकांच्या १ लाख ३० हजार शाखा शनिवारी व रविवारी सुरू राहतील, असे अर्थखात्याचे सचिव शक्तिकांत दास यांनी सांगितले. बँका सुरू राहण्याच्या निर्णयाची माहिती खातेदारांना द्यावी, असे आदेश केंद्राने दिले आहेत.