काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सोमवारी शहरात नोटाबंदीविरोधात स्वतंत्र आंदोलन करण्यात आले.
नांदेड- काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सोमवारी शहरात नोटाबंदीविरोधात स्वतंत्र आंदोलन करण्यात आले. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर घोषणांनी व थाळीनादाने गजबजून गेला. मोदी सरकारविरोधात दोन्ही काँग्रेस रस्त्यावर उतरल्याचे चित्र दिसून आले.
काँग्रेसच्या महिला आघाडीच्या वतीने मोदी सरकारविरोधात थाळीनाद आंदोलन करण्यात आले. जुना मोंढा येथून महिलांनी थाळीनाद करत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. मोर्चात जवळपास पाच हजारहून अधिक महिला सहभागी झाल्या. मोर्चात बंजारा समाजातील महिला आपल्या पारंपरिक वेशात सहभागी झाल्या. आमदार अमिता चव्हाण, अमर राजूरकर यांनी मोर्चाचे नेतृत्व केले.
गुरुद्वारा चौक, महावीर चौक मार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत झाले. या वेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मोदीवर सरकारवर हल्ला चढवला. मोदी सरकारच्या नोटाबंदीचा फायदा मूठभर उद्योगपतींना झाला. सर्वसामान्य जनता मात्र स्वत:चेच पैसे काढण्यासाठी बँकांपुढे रांगा लावून त्रस्त झाली.
अदाणी, अंबानी तुपाशी, जनता मात्र उपाशी अशी परिस्थिती या सरकारच्या काळात झाल्याचे अशोक चव्हाण यांनी सांगितले. हमारा पैसा, हमही चोर, शेतक-यांचा नारा, सातबारा कोरा, मोदी सरकार हाय आदी घोषणा देत महिलांनी थाळीनाद करत आपल्या मागण्या सरकार दरबारी सादर केल्या. आंदोलनकर्त्यांच्या वतीने जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांना निवेदन देण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकली
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन, थाळीनाद आंदोलन, घंटानाद आंदोलन करण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व जिल्हा व शहर अध्यक्ष डॉ. सुनील कदम, माजी मंत्री कमलकिशोर कदम यांनी केले.
८ नोव्हेंबर रोजी ५०० आणि १००च्या नोटा मोदी सरकारने बंद केल्या. काळा पैसा बाहेर निघण्याच्या हेतूने हा निर्णय घेतला असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले. बँकांत सर्वसामान्य जनतेचा पैसा जमा झाला. काळा पैसा कुठे आहे, हे सरकारने स्पष्ट करावे. उलट नोटाबंदीच्या निर्णयाने शेतक-यांच्या मालाला भाव मिळाला नाही. व्यापा-याकडे आर्थिक टंचाई असल्याने शेतक-यांना पैसे देण्यासाठी उपलब्ध नाही झाले. त्यामुळे शेतक-यांचे नुकसान झाले.
अनेक लहान-मोठे उद्योग बंद पडले आहेत. संपूर्ण राष्ट्राची आर्थिक व्यवस्था कोलमडली आहे. नोटा बदलताना शंभरहून अधिक जणांना प्राण गमवावे लागले, यांची जबाबदारी सरकारवर आहे. काळा पैसा हा सर्वाधिक मोदी सरकारमधील मंत्र्यांकडे आहे. नवीन चलन भाजपाच्या पदाधिका-यांकडूनच हस्तगत करण्यात आले. मोठया उद्योगपतींचा पैसा विदेशात गेलेला आहे.
अदानीकडे १० हजार कोटी कर्ज आणि मल्ल्याकडे सहा हजार कोटी कर्ज आहे. यांचे कर्ज सरकारने माफ केले. हे सरकार मोठया उद्योगपतींना धार्जिणे सरकार असल्याची टीका माजी मंत्री कमलकिशोर कदम यांनी या वेळी केली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. तर राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने थाळीनाद आंदोलन, राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात आले. जवळपास दोन तास हे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करून मोदी सरकार हाय. हाय., शेतक-यांना हमी भाव मिळाला पाहिजे, अब की बार.. बस कर यार.. असे नारे देऊन मोदी सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला.
थाळीनादाने महिलांनीदेखील आक्रोश व्यक्त केला. मोठया प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची गर्दी असल्याने या ठिकाणी रास्ता रोकोदेखील करण्यात आला. या वेळी शेतकरी शेतमजूर, कामगार, लघु उद्योग, व्यावसायिक व्यापा-यांना पुरेसे नवीन चलन उपलब्ध करून द्यावे, शेतक-यांच्या शेतीमालाला हमी भाव द्यावा यासह विविध मागण्यांसंदर्भात जिल्हाधिका-यांना शिष्टमंडळाने निवेदन दिले.