महाराष्ट्रात यापूर्वी युतीचे सरकार होते तेव्हा नारायण राणे मुख्यमंत्री होते, तर गोपीनाथ मुंडे हे उपमुख्यमंत्री होते.
मुंबई- महाराष्ट्रात यापूर्वी युतीचे सरकार होते तेव्हा नारायण राणे मुख्यमंत्री होते, तर गोपीनाथ मुंडे हे उपमुख्यमंत्री होते. त्यांच्या मंत्रिमंडळात मी सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून काम केले आहे. म्हणून मुंडे आणि राणे हे माझे नेते आहेत, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. नारायण राणे हे माझे मित्र होते, आहेत आणि भविष्यातही राहतील, असेही ते म्हणाले.
केंद्रातील मंत्रिमंडळात एक नंबरचे मंत्री म्हणून गौरविलेले नितीन गडकरी यांनी ‘एबीपी माझा’ वृत्तवाहिनीवरील ‘माझा कट्टा’ या कार्यक्रमात अनेक विषयांवर अत्यंत मनमोकळय़ा गप्पा मारल्या. सध्या नारायण राणे भाजपाच्या वाटेवर आहेत, अशा चर्चा सुरू आहेत. त्या अनुशंगाने नारायण राणे यांच्याशी आपले कसे संबंध आहेत, असे विचारले असता गडकरी म्हणाले की, मागच्या युतीच्या काळात नारायण राणे मुख्यमंत्री होते तर गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री होते. या दोघांच्याही मंत्रिमंडळात मला काम करण्याची संधी मिळाली. त्या काळात नारायण राणे यांच्याशी स्नेहाचे संबंध झाले.
पुढे शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये गेले तरी त्यांच्याशी आपले असलेले मैत्रीचे संबंध तसेच कायम आहेत, असे गडकरी म्हणाले. शिवसेना सोडताना आपण राणे यांच्यासोबत होतो. त्यांनी शिवसेना सोडू नये यासाठी मी शेवटपर्यंत त्यांच्यासोबत होतो. परंतु त्यावेळी परिस्थितीच तशी होती त्यांना तो निर्णय घ्यावा लागला, असे गडकरी म्हणाले. नारायण राणे माझे मित्र आहेत. कालही होते, आजही आहेत आणि उद्याही राहतील.
सध्या ते काँग्रेसमध्ये नाराज असल्याचे बोलले जाते. मात्र आता त्यांनी कोणत्या पक्षात जावं, हा त्यांचा प्रश्न आहे. ते वेगळ्या मार्गावर आहेत, मी वेगळ्या मार्गावर आहे. त्यांचा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे, असे नितीन गडकरी म्हणाले. महाराष्ट्रात नेतृत्व बदल होईल आणि गडकरी महाराष्ट्रात येतील, आधूनमधून सुरू असते. त्याबद्दल त्यांना विचारले असता ते म्हणाले की, सुरुवातीला मी दिल्लीत जायला तयार नव्हतो. मी मनस्वी कार्यकर्ता आहे.
दिल्लीचे हॉटेल कधीच मला आवडले नाहीत. पनीर आणि आलू पराठा वगैरे. दिल्लीचा मला कंटाळाच होता. दिल्लीत कधी राहायचोच नाही. मात्र, दिल्लीत राहिलो, तेव्हा आता महाराष्ट्रात यायचं नाही, असे सांगत गडकरींनी महाराष्ट्रात परतण्याची इच्छा नसल्याचे स्पष्ट केले. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेबद्दल सांगताना गडकरी म्हणाले, मुंबई-पुणे एक्स्प्रेस बांधण्यासाठी ३६०० कोटींचं टेंडर होतं.
रिलायन्सचं टेन्डर रद्द केलं. त्यावेळी अनेकजण बोलले. पण मी १६५० कोटीत बांधलं. २ हजार कोटी रुपये वाचले. आमच्या काळात कामं स्वस्तात झाली आणि चांगली झाली. माझं फायनान्शियल बजेट मोठं इंटरेस्टिंग आहे. माझ्या विभागासाठी ६५ हजार कोटी माझं भारत सरकारचं बजेट आहे. त्यानंतर १० हजार कोटी रुपये माझं टोल इन्कम आहे. त्यामुळे हे १० हजार कोटी रुपये समजा मी १५ वर्षांसाठी मॉनेटाईज केले, तर किमान १ लाख ८० हजार ते २ लाख कोटी रुपये कुणीही द्यायला तयार होईल. त्याचसोबत ७० हजार कोटी रुपयांचे बाँड्स काढण्याचे अधिकार मला आहे.
माझे १०५ प्रोजेक्ट सरकारी पैशांनी पूर्ण झाले आहेत, ते जर मी मॉनेटाईज केले तर सव्वा लाख कोटी माज्या विभागाला मिळतील. शिवाय, पुढल्या दोन वर्षात दीड लाख कोटी मला बजेटमधून मिळतील. या कामातून पुन्हा टोल लागेल, पुन्हा पैसे मिळतील. त्यामुळे सुमारे १५ लाख कोटींचे मी रस्ते बांधू शकतो, असं सविस्तरपणे नितीन गडकरी यांनी त्यांच्या विभागाची आर्थिक बाजू समजावून सांगितली.