सरकारविरोधात मोर्चे असताना या पालकमंत्र्यांची लुडबुड कशाला? असा खणखणीत सवाल विचारत काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी सरकारच्या हस्तक्षेपाला आक्षेप घेतला आहे.
मुंबई- मराठा समाजाचे मोर्चे राज्यात ठिकठिकाणी शांततामय मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालयावर निघत आहेत. मात्र आता या मोर्चाचे निवेदन स्वीकारण्यासाठी पालकमंत्री म्हणून उपस्थित राहणार असल्याचे कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केले आहे. सरकारविरोधात मोर्चे असताना या पालकमंत्र्यांची लुडबुड कशाला? असा खणखणीत सवाल विचारत काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी सरकारच्या हस्तक्षेपाला आक्षेप घेतला आहे. शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यंगचित्राबाबत कबुली दिली नसती तर त्यांना दसरा मेळावा ‘मातोश्री’च्या अंगणात घ्यावा लागला असता, असा टोलाही त्यांनी लगावला.
मराठा समाजाचे मोर्चे अत्यंत शांततेत सुरू आहेत. आतापर्यंत प्रत्येक ठिकाणी निवेदन जिल्हाधिका-यांनी स्वीकारले आहे. मात्र आता सरकारने त्यात हस्तक्षेप करण्याचा घाट घातला आहे. कोल्हापूर येथे होणा-या मेळाव्याचे निवेदन स्वीकारण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित राहणार आहेत. यापुढे प्रत्येक मोर्चाच्या ठिकाणी पालकमंत्री निवेदन स्वीकारण्यासाठी उपस्थित राहणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केले आहे. याबाबत आमदार नितेश राणे यांनी तीव्र शब्दांत नापसंती व्यक्त केली असून या मोर्चाना वेगळे वळण लावण्याचा सरकारचा घाट असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
नितेश राणे म्हणाले की, मराठा समाजाचे आतापर्यंत २४ मोर्चे निघाले आहेत. या प्रत्येक वेळी जिल्हाधिका-यांनी निवेदन स्वीकारले आहे. मग आता पालकमंत्र्यांचे काय काम आहे? हे मोर्चे सरकारच्याच विरोधात असतील, तर त्याचे निवेदन स्वीकारण्यासाठी पालकमंत्री कशाला येत आहेत? कोल्हापूर येथील मेळाव्याच्या आयोजकांनी त्यांना काय हिसका दाखवायचा तो दाखविला आहे. परंतु माझे म्हणणे असे आहे की, शांततामय मार्गाने मोर्चे सुरू असताना तुमची लुडबुड कशाला? या सरकारच्या विरोधात लोकांच्या भावना तीव्र आहेत. तिथे पालकमंत्र्यांना पाहून लोकांचा उद्रेक झाला तर त्याची संपूर्ण जबाबदार सरकारची असेल, असा इशाराही नितेश राणे यांनी यावेळी दिला.
मराठा समाजाच्या मोर्चाला सामोरे जाण्याचा देखावा करण्यापेक्षा सरकारने आता निर्णय घ्यावा, असे सांगून नितेश राणे म्हणाले की, मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत, त्याचे निवेदन २४ जिल्हाधिका-यांना दिले आहे. ते निवेदन घ्या, त्यांच्या मागण्या समजून घ्या आणि कारवाई करा. उगाच फोटो काढायला कशा जिल्हाधिकारी कार्यालयात येता? या सरकारला मराठा समाजाचे प्रश्न सोडवायचे नाहीत. तर केवळ देखावा करायचा आहे. मराठा समाजाला आरक्षण द्यावे, ही प्रमुख मागणी आहे. काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस सरकारच्या काळात माननीय नारायण राणे साहेब यांनी अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास करून मराठा समाजाला आरक्षण दिले होते. मात्र तो अहवाल विचारात घेतला जात नाही. केतन तिरोडकर नावाच्या माणसाने बापट कमिटीच्या अहवालाचा आधार घेऊन याचिका केली आहे. बापट समितीचा अहवाल पाहिला तर समितीमधील पाच सदस्यांपैकी तिघांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याची शिफारस केली आहे. फक्त एकटय़ा बापट यांनी त्याला विरोध केला आहे. हे समजून घेतले पाहिजे. मराठा समाजाचा आक्रोश लक्षात घेऊन आरक्षण देणे ही भाजपा-शिवसेनेची जबाबदारी आहे, असेही नितेश राणे म्हणाले.
कोपर्डी आरोपपत्राला उशीर का?
कोपर्डी येथे झालेल्या अत्याचार प्रकरणाचा तपास एक महिन्यात पूर्ण करून जलदगती न्यायालयातर्फे हा खटला चालविला जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले होते. मात्र प्रत्यक्षात ८८ दिवसांनंतर आरोपपत्र दाखल करण्यात आले. आणखी दोन दिवस हे आरोप पत्र दाखल झाले नसते, तर त्या प्रकरणातील आरोपी जामिनावर सुटले असते. यावरून हे सरकार मराठा समाजाविषयी किती असंवेदनशील आहे, हे दिसून येते. या प्रकरणात तीन आरोपी असताना एकच आरोपी असल्याचा दाखविण्याचा सरकारचा प्रयत्न होता. मात्र त्या तिन्ही आरोपींचा समावेश करण्यासाठी संजीव भोर यांनी पोलिसांना भाग पाडले, म्हणून त्यांनाच तडीपारीची नोटीस दिली आहे, असेही नितेश राणे म्हणाले.
..नाही तर दसरा मेळावा ‘मातोश्री’च्या अंगणात घ्यावा लागला असता
मराठा मोर्चावर प्रसिद्ध केलेल्या व्यंगचित्राबाबत उद्धव ठाकरे यांनी आठ दिवसांनी कबुली दिली. ती दिली नसती, तर त्यांना शिवसेनेचा दसरा मेळावा ‘मातोश्री’च्या अंगणात घ्यावा लागला असता. मराठय़ांच्या नावावर शिवसेना मोठी झाली, मात्र त्यांनी कायम मराठा समाजाच्या विरोधात असणा-यांची तळी उचलून धरली. शिवाजी महाराज आणि जिजाऊ माँ साहेब यांची बदनामी करणा-या जेम्स लेनचे कौतुक करणारा लेख सामनामध्ये प्रसिद्ध झाला होता. महाराजांची बदनामी करणा-या बाबा पुरंदरेला ‘महाराष्ट्र भूषण’ शिवसेना-भाजपानेच दिले आहे. मूक मोर्चावर व्यंगचित्र काढून शिवसेनेच्या मनातले बाहेर आले आहे. त्याची किंमत त्यांना मोजावीच लागेल, असा इशाराही नितेश राणे यांनी दिला.
मुंबईच्या मोर्चाची थेट तारीख जाहीर करा
मराठा समाजाचा शेवटचा मोर्चा मुंबईत निघावी अशी मराठा समाजाची इच्छा आहे. मात्र हा मोर्चा कोणत्याही प्रकारे होऊ द्यायचा नाही, असा सरकारचा डाव आहे. त्यामुळे संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याबाबत झालेल्या दोन बैठकांमध्ये हे दिसून आले आहे. सकल मराठा समाज बांधवांना माझे आवाहन आहे की, आता मुंबईतील मोर्चाबाबत कोणतीही बैठक न घेता थेट तारीख जाहीर करावी. महाराष्ट्राच्या कानाकोप-यांतून मराठा बांधवांनी या मोर्चात सहभागी व्हावे. इथे जी व्यवस्था आवश्यक असेल ती आपण करू, असेही नितेश राणे म्हणाले. आरबी समुद्रात होणा-या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे नुसते कार्यालय थाटले असून त्याचा उपयोग फक्त भाजपा आमदाराचे कार्यालय म्हणून केला जात आहे, असेही ते म्हणाले.