केंद्रातील आणि राज्यातील सत्तेचा वापर, जिल्हा प्रशासन, पोलीस खाते आणि पैशांचा वापर करूनही शिवसेना-भाजपा पक्ष काँग्रेसला जनतेपासून दुरावू शकले नाहीत.
कणकवली- केंद्रातील आणि राज्यातील सत्तेचा वापर, जिल्हा प्रशासन, पोलीस खाते आणि पैशांचा वापर करूनही शिवसेना-भाजपा पक्ष काँग्रेसला जनतेपासून दुरावू शकले नाहीत.
काँग्रेस पक्षाला सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर पूर्ण आणि स्पष्ट बहुमत देऊन जिल्ह्यातील जनतेने सेना-भाजपाच्या भूलथापांना बळी न पडता विकासाच्या खोटया आकडेवारीला आणि व्यक्तीद्वेषाच्या राजकारणाला चोख उत्तर दिलेले आहे, असे स्पष्ट प्रतिपादन काँग्रेसचे युवा नेते, आमदार नितेश राणे यांनी केले.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस नेते नारायण राणे यांचे नेतृत्व जनतेला हवे आहे. तेच या जिल्ह्याचा विकास करू शकतात. यावर मतदारांनी बहुमताने शिक्कामोर्तब केले, असेही नितेश राणे म्हणाले. या निकालातून व्यक्तीद्वेषाचे घाणेरडे राजकारण करणारे सेना-भाजपाचे पदाधिकारी तोंडघशी पडले आहेत, असा टोला त्यांनी लगावला.
कणकवली येथील काँग्रेसच्या मध्यवर्ती कार्यालयात आ. नितेश राणे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष सुरेश सावंत आदी उपस्थित होते. नितेश राणे म्हणाले, काँग्रेसची जिल्हा परिषदेवर निर्विवाद सत्ता स्थापन झालेली आहे.
राष्ट्रवादीच्या एका जागेमुळे काँग्रेसचे संख्याबळ २८ झाले आहे. सर्वच जिल्ह्यातील पंचायत समित्यांचा विचार करता काँग्रेसला मिळालेले यश समाधानकारक मानावे लागेल. जिल्ह्यातील मतदारांनी काँग्रेससाठी स्पष्ट बहुमत देऊन काँग्रेस नेते नारायण राणेसाहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला आहे.
जिल्ह्याच्या विकासासाठी राणेसाहेबांचे नेतृत्व जनतेला हवे आहे, यावरही जनतेने शिक्कामोर्तब केले आहे. जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, आठही तालुक्याचे अध्यक्ष, प्रत्येक विभागाचे अध्यक्ष आणि ग्रामकमिटीचे अध्यक्ष यांच्यासह काँग्रेस कार्यकर्त्यांनी या निवडणुकीत फार मेहनत घेतली.
काँग्रेसचे विचार मतदारांपर्यंत पोहोचवले. त्यामुळे काँग्रेसच्या या यशात त्यांचा सिंहाचा वाटा आहे, असे सांगतानाच आ. राणे यांनी विजयी झालेल्या काँग्रेसच्या सर्व जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या उमेदवारांचे अभिनंदन केले.
भाजपाला सातत्याने पराभव दाखविणा-या जिल्हाध्यक्षांनी पायउतार व्हावे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काँग्रेसविरोधात प्रचारासाठी आणले गेले. त्यांनी पदाची प्रतिष्ठा पणाला लावली आणि आता जो निकाल आला, तो भाजपाला आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडणारा आहे. या भाजपाच्या पराभवानंतर जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी राजीनामा देणे गरजेचे आहे.
सिंधुदुर्गात सातत्याने भाजपाचा पराभव होत आहे, असे असताना जिल्हाध्यक्ष पदावर बसण्यापेक्षा त्या पदावरून पायउतार व्हावे आणि थोडेबहुत यश ज्या कार्यकर्त्यांनी मिळवले आहे, त्यांच्याकडे पक्षाची सूत्रे द्यावीत तरच यापुढे काँग्रेस पक्षाच्या जवळपास तरी भाजपा उभा राहील, असे आ. नितेश राणे यांनी सूचित केले.
शिवसेनेच्या विकास घोषणांवर जनतेचा विश्वास नाही
पालकमंत्री आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख यांच्यावर टीका करताना आ. नितेश राणे म्हणाले, सेना-भाजपाच्या छुप्या युतीला आणि घाणेरडया राजकारणाला निष्ठावंत शिवसैनिक कंटाळलेला आहे.
शिवसेनेतील सर्व पदे आपल्या घरात घेऊन जिल्हाप्रमुखपद मिरवणा-या आ. वैभव नाईक यांनीही आत्मपरीक्षण करण्याची वेळ आलेली आहे. २७०० कोटी रुपये विकासनिधी आणला, आशा घोषणा करणा-या नाईक यांच्यावर जनतेचा विश्वास नाही, हे मतदारांनी दाखवून दिले आहे.
सिंधुदुर्गप्रमाणेच महाराष्ट्रालाही नारायण राणे यांच्या नेतृत्वाची गरज
मुंबई महानगरपालिकेतील काँग्रेसच्या पराभवाबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आमदार नितेश राणे म्हणाले, कोणत्याही निवडणुकीत पक्षाला विजय संपादित करायचा असेल तर उमेदवारांची योग्य निवड आणि त्या उमेदवारांना योग्य नेतृत्वाची गरज असते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात काँग्रेसला माजी मुख्यमंत्री काँग्रेस नेते नारायण राणेसाहेब यांचे नेतृत्व मिळाले. त्यांच्या नेतृत्वाखाली सातत्याने काँग्रेस पक्ष विजय संपादन करत आहे. राणेसाहेबांचे हेच सक्षम नेतृत्व महाराष्ट्रातही सिंधुदुर्गप्रमाणेच विजय संपादित करून देणारे आहे. त्यामुळे काँग्रेसच्या केंद्र स्तरावरील नेतृत्वाने त्याची दखल घेणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.