दिवाळीसारखे सण हे मनाला दिलासा देणारे आहेत.. नोटाबंदी, जीएसटी, महागाई आदी सर्व विषय ऐरणीवर असले अन् रोजच्या जगण्याबाबतची काळजी, भ्रांत असली तरी सणासुदीच्या निमित्ताने आनंद मिळवण्याचा प्रयत्न, प्रवृत्ती माणसाजवळ असतेच.. आणि लोकांच्या याच सहनशक्तीला यानिमित्ताने सलामच केला पाहिजे.. असे मला वाटते.
मला वाटते दिवाळीच काय पण कोणत्याही सेलिब्रेशनचे दोन भाग व्हावेत, एक व्यक्तिगत अन् दुसरे सामाजिक.. दिवाळीबाबत म्हणाल तर मला भारतीय संस्कृतीप्रमाणे इतर सामान्यांप्रमाणे आपल्या कुटुंबीय मित्रपरिवारांमध्ये दिवाळीचा आनंद घ्यायला आवडते.. दिवाळीतली माझी आवडीची जबाबदारी म्हणजे, मला रांगोळी काढायला आवडते.. दिवाळीच्या दिवसांत एक रांगोळी काढली की, माझी दिवाळी साजरी झाली असे मला वाटते.. खरे तर फटाके , फराळापेक्षा मला रांगोळीचे खास आकर्षण आहे. मला वाटते, रांगोळी रेखाटणे, फराळाचे पदार्थ करणे आणि लक्ष्मीपूजनाची तयारी या गोष्टी वजा केल्या तर महिलांकरिता दिवाळीचे असे खास काही राहात नाही..
माझ्या आठवणीतली दिवाळी अर्थातच बालपणीची, तीही शालेय वयातील. शाळेत असताना दिवाळीत घेतलेला नवा फ्रॉक मिरवण्यात एक गंमत होती. मी सातवीत असताना वडिलांकडे हट्ट करून पहिले घडय़ाळ मिळवले होते.. ते घडय़ाळ घालून मी सगळीकडे मिरवायचे.. हात नाचवण्याची गरज नसली तरी हात समोरच्यापुढे नाचवायचे. जेणेकरून त्यांनी माझ्याकडच्या नव्या घडय़ाळाची दखल घेतली पाहिजे.. बालसुलभ भावना अन् क्लृप्त्या खरेच निरागस असतात. लहानपणी जवळच्या गार्डनमधून माती आणून किल्ला बनवला जायचा. कंदील आम्ही जमेल तसा घरीच करायचो. अन् आईही आम्ही बनवलेला कंदील कौतुकाने लावायची.. स्वाभाविकच लहानपणीची दिवाळी मनावर कोरलेली असते. संवेदनशीलता जपणा-या अनेक संस्कारातून माझी दिवाळी कोरली गेली आहे..
आत्ता जरी मी संपादक असले तरी सामान्यांप्रमाणेच आनंदाने, उत्साहाने सण साजरे करायला मला आवडते. आम्हा संपादकांकरिता दिवाळीचे वैशिष्टय़ म्हणजे दिवाळी अंक. अंक वेळेत येणे, तो वाचकांच्या हाती पडणे म्हणजेच संपादकाचे सेलिब्रेशन. दिवाळी अंकाचे विषय फार बोजड असू नयेत, असा माझा आग्रह असतो. एकतर वर्षसण, सर्वानाच आनंद मिळवायचा असतो, त्यामुळे मनोरंजनाकडे कल असतो. अति बौद्धिक विषय असतील, तर असे अंक वाचले जातील का, हा प्रश्न उरतोच. वाचकांना अधिकाधिक आनंद देणे संपादकांच्याच हातात असते, असे मला वाटते.. ऐन दिवाळीत एखादी दुर्दैवी घटना घडली तर ती बातमी, विश्लेषण आदी कव्हर करावेच लागते..
परवा एलफिन्स्टन रोडवर घडलेल्या दुर्घटनेतील जीव गमावलेल्या कुटुंबीयांप्रती सहानुभूती दाखवतानाच त्यांचा संवेदनशीलतेने विचार झालाच पाहिजे, असे वाटते. अशा घटना मनाला चटका लावून जातात. ही संवेदनशीलता प्रत्येकानेच जपली पाहिजे. दवाळीसारखे सण हे मनाला दिलासा देणारे आहेत. नोटाबंदी, जीएसटी, महागाई आदी सर्व विषय ऐरणीवर असले अन् रोजच्या जगण्याबाबतची काळजी, भ्रांत असली तरी सणासुदीच्या निमित्ताने आनंद मिळवण्याचा प्रयत्न, प्रवृत्ती माणसाजवळ असतेच. लोकांच्या याच सहनशक्तीला यानिमित्ताने सलामच केला पाहिजे, असे मला वाटते. दिवाळी आनंदाने साजरी करतानाच आपल्या आसपास जे अनेक कारणाने अफेक्टेड लोक आहेत त्यांच्या प्रती किमान संवेदनशीलता बाळगा, घासातला घास काढून द्या. संक्रमणाच्या काळात संवेदनशीलता देणारी दिवाळी म्हणूनच मला अधिक भावते.
[EPSB]
[/EPSB]