गेल्या ९२ वर्षापासून सुरू असलेला रेल्वेचा स्वतंत्र अर्थसंकल्प आता बंद झाला आहे.
नवी दिल्ली- गेल्या ९२ वर्षापासून सुरू असलेला रेल्वेचा स्वतंत्र अर्थसंकल्प आता बंद झाला आहे. हा अर्थसंकल्प मुख्य अर्थसंकल्पात विलीन केला आहे. यामुळे रेल्वेचे दहा हजार कोटी रुपये वाचणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अर्थसंकल्पविषयक विविध निर्णय घेण्यात आले. अर्थमंत्री अरुण जेटली म्हणाले की, फेब्रुवारीच्या अखेरीस अर्थसंकल्प मांडण्याची जुनी परंपरा बंद केली असून अर्थसंकल्प लवकर सादर केला जाईल.
विधानसभा निवडणुकींचे वेळापत्रक लक्षात घेऊन २०१७-१८च्या अर्थसंकल्पाची तारीख घोषित केली जाईल. मात्र, अर्थखात्याने १ फेब्रुवारी रोजी ही तारीख अर्थसंकल्प मांडण्यासाठी प्रस्तावित केली आहे. अर्थसंकल्पविषयक सर्व प्रक्रिया २४ मार्चपर्यंत पूर्ण करण्याची योजना सरकारने आखली आहे.
या विलीनीकरणामुळे सरकारला रेल्वेला लाभांश द्यावा लागणार नाही. तसेच रेल्वे अर्थसंकल्प मुख्य अर्थसंकल्पात विलीन झाल्याने संसदेचा वेळ वाचणार आहे. देशाच्या अर्थसंकल्पात खर्चाचे प्रस्ताव २० लाख कोटी रुपयांचे असतात तर रेल्वे अर्थसंकल्पात खर्चाचे प्रस्ताव २ लाख कोटींचे असतात. आता रेल्वेचे सर्व प्रस्ताव मुख्य अर्थसंकल्पात मांडले जातील, असे जेटली यांनी सांगितले.