मुंबईत झालेल्या जोरदार पावसामुळे सखल भागात पाणी साचले असून रेल्वेसह विमान वाहतूकीलाही पावसाचा फटका बसला.
मुंबई- मुंबई शहर आणि उपनगरात काल सायंकाळपासून झालेल्या जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले. सखल भागात पाणी साचले. रेल्वेसह विमान वाहतूकीला पावसाचा फटका बसला. भांडुपच्या खिंडी पाडा येथे दरड कोसळण्याची घटना घडली. यात चार नागरिक जखमी झाले असून मुलुंडच्या खाजगी रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जोरदार पावसामुळे पश्चिम आणि मध्य रेल्वेची वाहतूक सेवा विस्कळीत झाली.
मुंबईसह महाराष्ट्राच्या काळजात धडकी भरविणा-या पावसाने दिवसभर आपली दमदार बरसात सुरू ठेवली. कधी जोरदार सरी, तर कधी रिमझिम पाऊसधारा असे पावसाचे आजचे रूप होते. कालपासूनच पावसाने जोरदार बरसायला सुरुवात केलेली असल्याने अनेकांनी घराबाहेर न पडणे पसंत केले. सरकारने कालच शाळांना सुट्टी जाहीर करून टाकली होती. अनेक शासकीय आणि खासगी अस्थापनातील महिलांना लवकर घरी जाण्याची परवानगी देण्यात आली.
मुंबईसह राज्यभरात काल दुपारपासून सुरू असलेल्या पावसाने बुधवारीही आपली संथ बॅटींग सुरू ठेवली. रात्रभर पावसाचा जोर कायम असल्याने तिन्ही मार्गावरच्या लोकल गाड्या संथ गतीने धावत होत्या. २९ ऑगस्टच्या पावसात अनेकांना २०-२० तास अडकून पडावे लागले होते. आजही सकाळपासून आभाळ भरून आलेले होते. त्यामुळे अनेकांनी घराबाहेर न पडण्याचा निर्णय घेतला. सकाळी अकराच्या सुमारास काही काळ विश्रांती घेतल्यानंतर दुपारनंतर पुन्हा पावसाचा जोर वाढला. उपनगरात तर अधूनमधून थांबत पावसाची बॅटिंग सुरूच आहे. येत्या २४ तासांतदेखील मराठवाडा वगळता राज्याच्या अन्य भागांत काही ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा वेधशाळेने दिला आहे.
रस्त्यांवर अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले. सर्वाधिक पावसाची नोंद विक्रोळी येथे झाली. घाटकोपर, मुलुंड, धारावी परिसरातही जोरदार पाऊस झाला. मुंबईतली दहीसर नदी ओसंडून वाहू लागली होती. खबरदारी म्हणून नॅशनल पार्क बंद ठेवण्यात आले आहे. आरे कॉलनी पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आली आहे. त्याऐवजी क्रमांक ३ वरून वाहतूक वळवण्यात आली आहे.
शाळा-महाविद्यालयांना सुट्टी
पावसाचा कालपासून वाढलेला जोर आणि आजही मोठय़ा प्रमाणात पाऊस होण्याची हवामान खात्याने वर्तविलेली शक्यता लक्षात घेऊन शिक्षण विभागाने मुंबई विकास प्राधिकरण परिसरातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली होती. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी काल त्याबाबत अधिकृत घोषणा केली होती. मुंबई महापालिकेनेही आपल्या शाळांना सुट्टी जाहीर केली होती.
डबेवाल्यांची सेवा बंद
पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या डबेवाल्यांनी त्यांची आजची सेवा रद्द करण्याचा निर्णय घेतला. परिणामी पावसाला न जुमानता, रडत-खडत जाणा-या ट्रेनने ज्यांनी कसेबसे कार्यालय गाठलेही असेल, त्या मुंबईकर चाकरमान्यांना डबे मिळेले नाहीत. डबेवाले मुंबईत रोज दोन लाखांवर डबे पोहोचवतात. उपनगरी रेल्वेसेवा मुसळधार पावसामुळे विस्कळीत झाल्याने डबेवाल्यांनी सेवा बंद ठेवली होती.
मध्य, पश्चिम आणि हार्बर या तिन्ही रेल्वे लाइनशी जोडलेल्या ७० रेल्वे स्थानकांच्या माध्यमातून डबेवाले अविरत आपली सेवा देतात. रेल्वेमुळे जलदगती सेवा देणे डबेवाल्यांना शक्य होते. दोन तासांच्या आत ते डबा पोहोचवतात.
या आधी ९ ऑगस्टला डबेवाल्यांनी मराठा आरक्षण मोर्चात भाग घेतल्याने आपली सेवा बंद ठेवली होती. त्यानंतर २९ ऑगस्टला मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे दुस-या दिवशी त्यांना डबे पोहोचवता आले नव्हते.
केळवा बीच पर्यटकांना फटका!
पालघर जिल्ह्यात मंगळवारी रात्रीपासून वादळी वा-यासह पावसाने धुमाकूळ घातला असून पावसामुळे समुद्र किना-यावरील गावांच मोठे नुकसान झाल आहे. जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या केळवे परिसरातही घरे व हॉटेलांची हानी झाली असून त्यामुळे पर्यटकांना चांगलाच फटका बसला आहे.
केळवे येथील अनेक हॉटेलांचे पत्रे वादळाने उडून गेले आहेत. त्याचबरोबर तेथील किना-यावरील सुरुच्या बागेतील झाडे उन्मळून पडली असून बाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. त्यामुळे किना-यांची रयाच गेली आहे. जिल्ह्यात अनेक गावांतील घरामधे पाणी शिरले आहे. पावसाचा जोर ओसरला असला तरी वादळ सुरूच असल्याने घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे. पश्चिम रेल्वेने डहाणू-विरारसह अनेक लांब पल्ल्याच्या गाडय़ा रद्द केल्या आहेत.
डहाणू औष्णिक ऊर्जा केंद्राजवळ ओव्हरहेड वायर तुटल्याने काल सायंकाळी मुंबईहून गुजरात व दिल्लीकडे जाणा-या गाडय़ा तब्बल तीन तास विविध रेल्वे स्थानकांत अडकून पडल्या होत्या. रेल्वेच्या सर्वच स्थानकांमध्ये पाणी तुंबल्यामुळे आजही वाहतूक खूपच मंदावली आहे.
राज्याला पावसाने झोडपले
कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात पावसाने आजही जोर कायम ठेवला. राज्यातील सर्व धरणे भरली असून त्यातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. कोयना धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले असून धरण क्षेत्रातील गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. सोलापूर जिल्ह्यातील उजणी धरणातून पाणी सोडल्याने पंढरपूरसह आजूबाजूच्या गावात पूर स्थिती निर्माण झाली आहे. जायकवाडी प्रकल्प गेल्या अनेक वर्षात भरण्याच्या स्थितीत आहे. एकूण राज्यात पावसाने जोरदार कमबॅक केल्याने मराठवाडय़ावरील दुष्काळाची छाया पुसली जाण्याची शक्यता आहे.
राज्यातील धरणे ओव्हर फ्लो
मुंबईसह राज्यात गेल्या दोन दिवसांपासू जोर वाढला आहे. परिणामी राज्यातली बहुतांश धरणे भरली आहेत. अनेक धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्याखालच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोयना, खडकवासला, उजनी आदी धरणांच्या पाण्यातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
सातारा जिल्ह्यातल्या कोयना धरणातून नदीत ११ हजार क्युसेक्स पाण्याच्या विसर्ग सुरू आहे. कोयना धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आली आहे. पुण्याच्या खडकवासला धरणातून २३ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. परिणामी सिंहगड रस्ता परिसरातल्या काही इमारतींमध्ये पाणी शिरण्याची शक्यता आहे. महापालिकेचे कर्मचारी, पोलीस या भागात तैनात करण्यात आले आहेत. नारायण पेठ आणि डेक्कनला जोडणारा भिडे पूल पाण्याखाली गेला आहे. परिणामी नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्यास सांगण्यात आले आहे.
अहमदनगरच्या प्रवरा नदीपात्रातील भंडारदरा धरणातून ५,६७३ क्युसेक्स, निळवंडे धरणातून १८,९७५ क्युसेक्स तर ओझर प्रकल्पातून ८,०३५ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पालघर जिल्ष्टद्धr(39)ातील धामणी धरणाचे ५ दरवाजे उघडण्यात आले आहेत. धामणी आणि कवडास धरण मिळून एकूण १८,८०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सूर्या नदीत केला जात आहे. सोलापूरचे उजनी धरणही पूर्ण भरले आहे. कोल्हापूरची दूधगंगा, राधानगरी, सांगलीचे वारणा ही धरणंही पूर्ण भरली आहेत.
विमानसेवेला फटका
पावसामुळे विमानांच्या उड्डाणांनाही फटका बसला आहे. छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मुख्य धावपट्टीवर पाणी साचल्याने ५० हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली. संध्याकाळी ६ वाजेपर्यंत ही धावपट्टी बंद ठेवली होती. १४ क्रमांकाच्या धावपट्टीवरून काही प्रमाणात उड्डाणे झाली.
जोरदार पावसाचा फटका विमान प्रवाशांनाही बसला असून त्यांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. मुंबई विमानतळावर पावसामुळे अक्षरश: तळे साचल्याने विमानांच्या उड्डाणांना अडथळे येत आहेत. विमानतळावरील काही भागच सध्या सुरु असून इतर अनेक धावपट्टय़ांवर पाणी साचल्याने येथील वाहतुक पूर्णपणे ठप्प झाली आहे. बाहेरुन येणा-या अनेक विमानांच्या मार्गांमध्येही बदल करण्यात आले असून ती इतर विमानतळांवर वळवण्यात आली आहेत. दरम्यान, देशांतर्गत हवाई सेवा पुरवणा-या विमान कंपन्यांनी आपल्या प्रवाशांना तिकीटाचे पैसे परत देण्याची किंवा उड्डाणाचे वेळापत्रक बदलून देण्याची तयारी दर्शविली आहे.
अफवांवर विश्वास ठेऊ नका!
मुंबईकरांनी यंदाच्या पावसाळ्याचा चांगलाच धसका घेतल्याचे चित्र दिसत आहे. २९ ऑगस्टच्या अनुभवानंतर कालच्या पावसामुळे पुन्हा एकदा अनेक अफवा व्हॉट्सअॅप आणि सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागल्या आहेत. तरी या अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन मुंबई पोलिसांनी आपल्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून केले आहे.
जोरदार पावसानंतर मुंबईमध्ये वादळ येणार आहे तसेच २६ जुलैपेक्षा भयंकर पाऊस मुंबईमध्ये होणार आहे, अशा आशयाचे मेसेजेस व्हायरल झाले आहेत. अनेकांनी या मेसेजेची सत्यता पडताळून पाहण्यासाठी या मेसेजेचे स्क्रीनशॉर्ट ट्विट करुन मुंबई पोलिस आणि इतर संबंधित यंत्रणांकडे याबद्दल विचारणा केली आहे. मात्र मुंबई पोलिसांनी अधिकृत सुत्रांकडून माहिती मिळेपर्यंत अशा अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन नागरिकांना ट्विटरच्या माध्यमातून केले आहे.
मुंबईवर ढग जमल्याचे सॅटेलाईट फोटो तसेच परदेशातील वादळांचे फोटो मुंबईवर वादळ घोंघावतेय अशा माहितीसहित व्हायरल केले जात आहे. हे मेसेजस खरे वाटावे म्हणून अशा अनेक खोटय़ा मेसेजसमध्ये हवामान खात्याचे नाव टाकून ते फॉरवर्ड केले जात आहेत. तरी अशाप्रकारचे कोणतेही वादळ मुंबईवर घोंघावत नसून, १७ तारखेपासून पुढील तीन दिवस मुंबई आणि कोकण किनारपट्टीच्या भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने आधीच वर्तवली होती. कालपासून सतत पाऊस पडत असल्याने असे मेसेजेस व्हायरल झाले असल्याने अनेकजण त्याची सत्यता पडताळून न पाहाता हे मेसेजेस फॉरवर्ड करत आहेत. अशाप्रकारे मेसेजेसची सत्यता न पडताळून पाहता ते फॉरवर्ड करणा-यांविरुद्ध कोणी तक्रार केल्यास त्यांच्याविरुद्ध अफवा पसरवण्याच्या गुन्हा अंतर्गत कारवाई होऊ शकते, असे मत सायबर सुरक्षा तज्ञ अॅड. प्रशांत माळी यांनी व्यक्त केले. तसेच असे मेसेज फॉरवर्ड करण्याआधी त्याची सत्यता पडताळून पाहा आणि मगच तो फॉरवर्ड करा, असा सल्लाही माळी यांनी नेटक-यांना दिला.
लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू
विरार- वसईतील पाऊस १७ वर्षीय तरूणीच्या जीवावर बेतला. कॉलेजमधून घरी परतत असताना मैत्री शाहा या तरुणीचा ट्रेनमधून पडून मृत्यू झाला. काल रात्री ही दुर्घटना झाली. काल झालेल्या मुसळधार पावसाने रेल्वे वाहतुकीचे तीनतेरा वाजले. त्यामुळे येईल ती लोकल पकडण्यासाठी प्रवाशांची धडपड सुरू होती. त्यात या तरूणीने लोकलमध्ये चढण्याचा प्रयत्न केला. मात्र दुर्दैवाने बोरिवली-दहीसर दरम्यान दरवाजातून ती लोकलबाहेर पडली. त्यातच तिचा दुर्दैवी अंत झाला.
राज्यातली धरणे भरली, नदीकाठच्या गावांना ‘अलर्ट’
मुंबईसह कोकम व पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कोसळत असून राज्याच्या अन्य भागातही संततधार सुरू आहे. राज्यात पावसाने दमदार पुनरागमन केले असून मंगळवार दुपारपासून सरीवर सरी कोसळत आहेत. रात्रभर सुरु असणा-या पावसाने मुंबईत बुधवारी दुपारपासून थोडी उसंत घेतली असली तरी रिमझिम पाऊस सुरुच आहे.