राज्यात शनिवारी पावसाचे जोर‘धार’ आगमन झाले. पण पहिल्याच पावसात मुंबई महापालिकेची पोलखोल झाली असून महापालिकेचे पितळ उघडे पडले आहे.
मुंबई- मुंबईमध्ये मान्सून दाखल झाल्याने उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना दिलासा मिळाला. मात्र मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मुंबईच्या लाईफलाईनवर परिणाम झाल्याने मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतूक सकाळी मंदावली होती. यामुळे कामावर निघालेल्या चाकरमान्यांचे प्रचंड हाल झाले.
राज्यात शनिवारी पावसाचे जोर‘धार’ आगमन झाले. पण पावसाळ्यापूर्वी मुंबईत पाणी तुंबणार नाही. ..आणि तुंबलेच तर त्याची जबाबदारी राज्य सरकारवर असेल, असे म्हणणा-या मुंबई महानगरपालिकेची पोलखोल झाली असून पहिल्याच पावसात महापालिकेचे पितळ उघडे पडले आहे.
सकाळपासून संततधार पडणा-या पावसामुळे रस्ते, रेल्वे वाहतूक आणि विमानसेवा विस्कळीत झाली. मुंबईतील अनेक रस्त्यांवर गुडघाभर पाणी तुंबल्याने बेस्ट सेवेचे मार्ग बदलण्यात आले. या पावसाने मुंबईकरांचे मात्र चांगलेच हाल झाले. पहिल्याच पावसात पालिकेचा निष्काळजीपणा मुंबईकरांसमोर उघड झाला. दरम्यान, रविवारच्या दिवशी रेल्वेकडून घेण्यात येणा-या मेगा ब्लॉकमधून मध्य रेल्वेची सुटका झाली आहे. या मार्गावर मेगाब्लॉक नसेल.
वरुणराजाचे शुक्रवारी मध्यरात्रीपासून मुंबईत आगमन झाले. त्यानंतर शनिवारी सकाळी पावसाने काहीशी उसंत घेतली. पण नंतर पुन्हा पावसाचे आगमन झाले. त्यामुळे मुंबईकर सुखावला असला तरी या पावसाने पालिकेचे सगळेच दावे फोल ठरवले आहेत. मुंबईच्या महापौरांनी केलेल्या घोषणाही पावसात वाहून गेल्या आहेत. ठिकठिकाणी पाणी साचल्याने रस्त्यावरील वाहतुकीला ब्रेक लागला, तर रेल्वे सेवाही पूर्णत: विस्कळीत झाली. अनेक स्थानकांदरम्यान रुळांवर पाणी भरल्याने अनेक लोकल जागीच थांबल्या, तर अनेक लोकल उशिराने धावत होत्या.
सखल भागात पाणी तुंबलेच
वरुणराजाच्या जोरदार इनिंगमुळे भायखळा, दादर, हिंदमाता, परळ, माटुंगा, शीव, कुर्ला, घाटकोपर, अंधेरी, कांजूरमार्ग आदी भागात पाणी साचले. पावसाळ्यापूर्वी महापालिकेने या परिसरात २८९ पंप पाण्याचा निचरा करण्यासाठी लावण्यात येतील, असे सांगितले होते. पण त्यातले फक्त ६४ पंपच कार्यरत होते. कांजुरमार्ग येथे रुळावर झाड कोसळल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. विक्रोळी येथे अभियांत्रिकी काम सुरू असल्याने मध्य रेल्वेवरच्या धीम्या लोकल जलदगती मार्गावर वळवण्यात आल्या होत्या. शिवाय मध्य रेल्वेने अनेक लोकल्स रद्द केल्या. मध्य रेल्वेची वाहतूक ४० मिनिटे उशिराने सुरु होती.
महापौर म्हणतात, पाणी तुंबले नाही!
पहिल्याच पावसात पालिकेचा निष्काळजीपणा मुंबईकरांसमोर उघड झाला. मात्र पालिकेतील सत्ताधारी शिवसेना प्रत्येक गोष्टीत प्रशासनाची पाठराखण करताना दिसून येते. पावसामुळे शहरात पाणी तुंबले नव्हते, तर साचले होते, असा दावा महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केला. सकाळी झालेल्या पावसात शहरातील काही भागात काही वेळ पाणी साचले होते. पाणी तुंबले होते, असे म्हणता येणार नाही, असे महापौरांनी सांगितले.
पाणी तुंबले आयुक्तांनी पाहिले
मुंबईच्या रस्त्यांवर पाणी भरणार नाही, नालेसफाईसह सगळीच कामे पूर्ण झाली असा दावा पालिकेने केला होता. मात्र पावसाच्या पहिल्याच इनिंगमध्ये मुंबई जलमय झाली आणि पालिकेवर टीकेची झोड उठली. त्यानंतर प्रशासनाला जाग आली आणि पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दादर- हिंदमाता परिसराची पहाणी केली. दरम्यान, या पहाणीनंतर अजोय मेहता कशाप्रकारे नियोजन करणार आणि कामांत दिरंगाई करणा-या कंत्राटदारांवर कारवाई करणार का, असा सवाल मुंबईकरांकडून उपस्थित केला जात आहे.
केरळमध्ये २९ मे रोजी पोहोचलेला मोसमी पाऊस ८ जून रोजी महाराष्ट्राच्या दक्षिण भागात पोहोचला. मोसमी वारे पुढे सरकण्यासाठी हवामान सध्या अनुकूल असून शनिवारी मोसमी पाऊस मुंबई, ठाणे आणि राज्याच्या काही भागांमध्ये दाखल झाल्याची माहिती हवामान खात्याने दिली. राज्यातील उर्वरित भागांमध्ये सोमवारपर्यंत मोसमी वारे पोहोचतील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
पालिका अधिकारी ऑनड्युटी
रविवार व सोमवारी मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त यांच्या सुट्टय़ा रद्द केल्या आहेत. तसेच पावसात घडणा-या प्रत्येक गोष्टीची माहिती देण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत. त्यामुळे कधी नव्हे ते पावसामुळे तरी पालिका अधिकारी ऑनडय़ुटी दिसून आले.
विमान सेवेवरही परिणाम
पावसामुळे रस्ते वाहतूक, रेल्वे सेवेवर परिणाम झाला असतानाच विमान सेवेवरही परिणाम झाला. रात्रभर झालेल्या पावसाचा फटका विमान सेवेलाही बसला. मुंबईत येणा-या दोन विमानांचे मार्ग खराब हवामानामुळे बदलण्यात आल्याचे समजते.
भायखळा पोलीस ठाणे पाण्यात
पावसामुळे अनेक सखल ठिकाणी पाणी भरल्याने यंदाही महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाचे बारा वाजल्याचे दिसून आले. मात्र शनिवारच्या पावसात सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले ते म्हणजे भायखळा पोलीस ठाण्याने. जोरदार पावसामुळे भायखळा पोलीस ठाण्याच्या आत आणि व्हरांडय़ात पाणी भरले. मात्र त्यावर तातडीने काहीच उपाययोजना करणे शक्य नसल्याने पोलीस अधिका-यांनी त्याच पाण्यात आपले काम सुरू ठेवले.
‘मिठी’ची भीती
२६ जुलै २००५ मध्ये मुंबई जलमय झाली आणि मिठी नदी उजेडात आली. त्यावेळी मिठीनदीला पूर आला आणि अनेक जणांना जीव गमवावा लागला होता. त्यानंतर मुंबई महापालिकेने मिठी नदीपरिसरात संरक्षक भिंत उभारण्याचे काम हाती घेतले. त्यासाठी आतापर्यंत कोटय़वधी रुपये खर्च केले, मात्र काम आजही पूर्ण झालेले नाही. त्यामुळे कुर्ला, साकीनाका येथील नागरिकांमध्ये नेहमीच भीतीचे वातावरण असते.
ठाण्यात पावसाचा बळी
पावसाने ठाण्यात पहिला बळी घेतला आहे. ठाण्याच्या घोडबंदर रोडवर रस्ते अपघातात प्रियांका झेंडे या २२ वर्षीय युवतीचा मृत्यू झाला. मुसळधार पावसामुळे हा अपघात झाल्याचे समजते. ती लोकमान्यनगर भागात राहणारी आहे. प्रियांका ही तिची मैत्रीण संघवी बोकाडे हिच्यासोबत पावसाची मजा घेण्यासाठी घोडबंदर रोडवर दुचाकी घेऊन गेली होती. तिथून परतत असताना नागला चौकी भागात मुसळधार पावसामुळे गाडी चालवणा-या संघवीला समोरचा टँकर दिसला नाही आणि गाडी घसरून मागे बसलेली प्रियांका थेट टँकरखाली आली. तिच्या डोक्यावरून टँकरचे चाक गेल्याने तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
ठाणे जिल्ह्यात कल्याण, मुरबाड, उल्हासनगर, शहापूर आणि भिवंडी परिसरातही पावसाने दमदार हजेरी लावली. रत्नागिरी, सिंधुर्दुगालाही पावसाने झोडपून काढले. लातूर, परभणी, उस्मानाबाद आणि परभणीतही पावसाने जोरदार हजेरी लावली. सांगली, सातारा आणि कोल्हापूरमध्येही सरी कोसळल्या. पावसामुळे राज्यातील अनेक भागांतील वीजपुरवठाही खंडित झाला आहे.
दरम्यान, १२ जूनपर्यंत मुंबईसह कोकणात अतिवृष्टीची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.