प्रस्तावित जैतापूर माडबन अणुऊर्जा प्रकल्पामुळे राजापूर तालुक्यातील माडबनचे नाव यापूर्वीच देशातच नव्हे तर सातासमुद्रापार पोहोचले आहे.
राजापूर- प्रस्तावित जैतापूर माडबन अणुऊर्जा प्रकल्पामुळे राजापूर तालुक्यातील माडबनचे नाव यापूर्वीच देशातच नव्हे तर सातासमुद्रापार पोहोचले आहे. याच माडबन गावातील विस्तीर्ण आणि निसर्गरम्य अशा निळय़ाशार सागर किना-यावर सलग दुस-या वर्षी सापडलेल्या ‘ऑलिव्ह रिडले’ या समुद्री कासवाच्या १३७ अंडयांमुळे कासव संवर्धन मोहिमेच्या दृष्टीने या समुद्र किना-याचे महत्त्व आणखी वाढले आहे. पर्यटकांबरोबरच प्राणी आणि पक्षी मित्रांसाठीही हा समुद्रकिनारा आता विशेष आकर्षण ठरणार आहे.
राजापूर तालुक्यातही या कासव संवर्धन मोहिमेमुळे भविष्यात माडबन समुद्रकिनारी कासव महोत्सवही भरविला जाऊ शकतो आणि ही बाब राजापूरवासीयांसाठीच नव्हे तर जिल्हावासीयांसाठी आणि खासकरून प्राणीमित्रांसाठी एक पर्वणी ठरणारी आहे. यासाठी आता वनविभागाच्या पुढाकाराची आणि नियोजनाची आवश्यकता आहे.
देशातील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प माडबन गावी होत असल्याने माडबन गाव जगाच्या नकाशावर आले आहे. निसर्गसंपन्न आणि समुद्र किना-यावर वसलेल्या या गावात पूर्वीपासूनच पर्यटक येतात. इथला निळाशार समुद्रकिनारा आणि निसर्गरम्य शांत वातावरण पर्यटकांना कायमच साद घालत आले आहे. त्यामुळे माडबन हे एक पर्यटन स्थळ म्हणूनही ओळखले जाते. आता माडबन गावाचे नाव या कासव संवर्धन मोहिमेने आणखी चर्चेत आले आहे.
माडबन समुद्र किना-यावर अशा प्रकारे कासव येतात व अंडी घालतात असा अंदाज वनविभागाला आला होता. त्यादृष्टीने गेले काही वर्ष वनविभागाचे या समुद्र किना-याकडे विशेष लक्ष होते. विभागीय वनअधिकारी विजय जगताप, परीक्षेत्र वनअधिकरी बी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राजापूरच्या वनपाल राजश्री कीर, वनरक्षक सागर गोसावी यांच्यासह वनविभागाच्या कर्मचा-यांनी याकडे विशेष लक्ष दिले होते.
स्थानिक पातळीवर माडबन सरपंच ओंकार वाघधरे, पोलीस पाटील श्यामसुंदर गवाणकर, ग्रामस्थ प्रशांत मांजरेकर, संदीप कदम, व्यावसायिक वैभव कुवेसकर यांच्यासह या परिसरातील अनेक ग़्रामस्थांनी यासाठी मोलाचे सहकार्य केले. या कासवांचा अंडी घालण्याचा हंगाम हा नोव्हेंबर ते एप्रिल असतो. आणि पहाटे समुद्रकिना-यावर येऊन एक खड्डा खोदून मादी ही अंडी घालते व पुन्हा हा खड्डा बुजवून अगदी पूर्वीप्रमाणेच सपाट करून ती समुद्रातून आल्या पावली परत जाते. त्यामुळे तिच्या पायाचे ठसेही आपसुकच बुजले जातात.
एका वेळेला एक मादी १५० ते २०० व कदाचित त्यापेक्षाही जास्त अंडी घालते. त्यानतंर ५४ ते ५५ दिवसांनी या अंडयांतून आपसूक पिल्ले बाहेर पडतात. या पार्श्वभूमीवर पहाटे समुद्रकिना-यावर फिरून अशा प्रकारे अंडी घालणा-या मादीवर लक्ष ठेवण्याचे काम माडबनच्या स्थानिक ग्रामस्थांनी केले. यापूर्वी डिसेंबर २०१५ मध्ये अशा प्रकारे ‘ऑलिव्ह रिडले’ कासवाची १२५ अंडी आढळून आली. त्याचे वनविभागाने स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने संवर्धन केले आणि ५४ दिवसांनी त्या अंडय़ातून बाहेर आलेली ८५ पिल्ले समुद्रात सोडली. त्यानंतर पुन्हा एकदा जानेवारीमध्ये अशा प्रकारे आणखी एका कासवाने याच परिसरात १३५ अंडी घातली.
याचेही पूर्वीप्रमाणे संवर्धन करून २८ मार्च २०१६ रोजी यातून बाहेर आलेली ८८ पिल्ले समुद्रात सोडण्यात आली. गतवर्षी तब्बल दोन वेळा वनविभागाने ही यशस्वी मोहीम पार पाडली. तर या वर्षी आता पुन्हा एकदा १३७ कासवाची अंडी या समुद्रकिनारी आढळून आली असून त्याचे वनविभागाने संवर्धन केले आहे. त्यामुळे कासव संवर्धनाच्या दृष्टीने माडबन समुद्रकिना-याला आता अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.
मात्र पर्यटनाच्या दृष्टीने या समुद्र किना-याचा विकास आणि पर्यटकांना सेवा-सुविधा पुरविण्याबाबत शासन स्तरावरून अधिकाधिक प्रयत्न होणेही आवश्यक आहे. सलग दुस-या वर्षीही या समुद्रकिनारी ‘ऑलिव्ह रिडले’ कासवाची अंडी सापडली. त्यामुळे भविष्यात माडबन समुद्रकिना-याकडे वनविभागाचे विशेष लक्ष राहणार आहे.
भविष्यात गुहागर येथील वेळासप्रमाणे राजापुरातील माडबन किना-यावरही कासव महोत्सव होऊ शकतो. यासाठी या एकूणच कासव संवर्धन मोहिमेत स्थानिक ग्रामस्थांमध्ये निर्माण झालेली जागरूकता आणि मोलाचे सहकार्य यामुळेच हे शक्य होत असल्याचे नमूद करताना भविष्यात यापुढेही अशा प्रकारे कासवांचेच नव्हे तर सर्व वन्य प्राण्यांचे संरक्षण करून निसर्गाचा समतोल राखू या असे आवाहनही राजापूर वनपाल राजश्री कीर यांनी केले आहे.