देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी तारखांवर तारखा पडत आहेत. कोणताही दिवस अजून निश्चित झालेला नाही, मात्र शिवसेनेला कॅबिनेट मंत्रीपद द्यायचे नाही, एवढे मात्र फडणवीस यांनी निश्चित केले आहे.
मुंबई- देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी तारखांवर तारखा पडत आहेत. कोणताही दिवस अजून निश्चित झालेला नाही, मात्र शिवसेनेला कॅबिनेट मंत्रीपद द्यायचे नाही, एवढे मात्र फडणवीस यांनी निश्चित केले आहे. हवी तर दोन राज्यमंत्रीपदे घ्या, असा पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी फडणवीस यांना आदेश दिलेला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीच्या भेटीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्यासोबत संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा केली. भाजपाचे मित्रपक्ष स्वाभिमानी संघटना, महादेव जानकर राष्ट्रीय समाज पक्ष आणि राष्ट्रवादीत पदे भोगून आलेले विनायक मेटे यांचे तीन प्रतिनिधी सामावून घेण्यासाठी पक्ष श्रेष्ठींनी फडणवीस यांना परवानगी दिली असली तरी शिवसेनेला मंत्रीपद द्यायला मोदींचा सक्त विरोध आहे. सध्या राज्य मंत्रिमंडळात २९ मंत्री असून त्यापैकी १९ भाजपा, १० शिवसेनेचे मंत्री आहेत.
आमदारांच्या संख्येच्या प्रमाणात ४२पर्यंत मंत्रिमंडळाची संख्या जाऊ शकते. ३ जागा रिकाम्या ठेवल्या जाण्याची शक्यता असून, सध्या १० जागाच भरल्या जातील. त्यात भाजपा ५, मित्रपक्ष ३ आणि ‘भांडखोर’ पक्ष शिवसेना २ असे वाटप होणार आहे.
जागावाटप चर्चेच्या वेळी मुख्यमंत्र्यांनी ‘भांडखोर पक्षांना २ जागा द्याव्या लागतील’, असा विनोद केल्याचे तिथे हजर असलेल्या एका नेत्याने सांगितले. नव्या मंत्र्यांमध्ये भाजपाकडून संभाजी पाटील, सुभाष देशमुख, मदन येरावार, डॉ. संजय कुटे, डॉ. सुनील देशमुख यांची नावे आहेत, तर राज्यमंत्री म्हणून शिवसेनेतर्फे गुलाबराव पाटील, अर्जुन खोतकर, शुंभुराजे देसाई यांची नावे आहेत.