दहशतवादी तळावर हल्ले केल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरिफ यांनी संताप व्यक्त करत या हल्ल्याचा निषेध केला आहे.
इस्लामाबाद- भारतीय जवानांनी दहशतवादी तळावर हल्ले केल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरिफ यांनी संताप व्यक्त करत या हल्ल्याचा निषेध केला आहे. शांतता हवी असण्याची आमची इच्छा म्हणजे आमचा दुबळेपणा नाही, अशी प्रतिक्रीया शरिफ यांनी दिल्याचे वृत्त पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी दिले आहे.
दहशतवादी भारतीय सीमेवर घुसून हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचे लक्षात आल्यानंतर भारतीय जवानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवादी तळावर हल्ला केला. बुधवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. भारताने केलेल्या कारवाईमध्ये पाकिस्तानच्या दोन जवानांचा मृत्यू झाल्याचा दावाही पाकिस्तानी माध्यमांद्वारे केला जात आहे.
लष्करी कारवाईचे महासंचालक लेफ्टनंट जनरल रणवीर सिंह यांनी गुरूवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत या कारवाईविषयी माहिती दिल्यानंतर शरीफ यांनी संतप्त प्रतिक्रीया व्यक्त केली.
‘आम्ही या हल्ल्याचा निषेध करतो. आम्हाला शांतता हवी आहे, याचा अर्थ असा नाही की आम्ही कमकूवत झालो. आमच्या देशाचे संरक्षण करण्यास आम्ही सज्ज आहोत’, अशी प्रतिक्रिया शरीफ यांनी व्यक्त केली.