गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चेचा आणि उत्सुकतेचा विषय ठरलेला केंद्रातील नरेंद्र मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर रविवारी झाला.
नवी दिल्ली- गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चेचा आणि उत्सुकतेचा विषय ठरलेला केंद्रातील नरेंद्र मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर रविवारी झाला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी एकूण १३ जणांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. मागील तीन वर्षाच्या कार्यकाळात भरीव कामगिरी करणारे पेट्रोलियम मंत्री धर्मेद्र प्रधान, ऊर्जामंत्री पियूष गोयल, निर्मला सीतारामन व संसदीय कामकाज राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांना कॅबिनेट मंत्रीपदी बढती देण्यात आली, तर एकूण ९ नव्या चेह-यांना राज्यमंत्री म्हणून संधी देण्यात आली आहे.
दरम्यान, केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात भाजपच्या घटकपक्षांनाही सामावून घेतले जाईल, अशी चर्चा होती. मात्र, ती फोल ठरली. नव्या विस्तारात एकाही मित्रपक्षाला मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेले नाही. राज्यमंत्री म्हणून चार माजी सनदी अधिका-यांना मिळालेली संधी हे या विस्ताराचे वैशिष्टय़ आहे.
नवीन मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर झाले असून देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या संरक्षण खात्याला पुन्हा एकदा पूर्णवेळ संरक्षणमंत्री मिळाला आहे. या पदावर निर्मला सीतारामन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गेली तीन वर्षे राज्यमंत्रीपदी असलेल्या सीतारामन यांना इतके महत्त्वाचे खाते देत पंतप्रधान मोदी यांनी पुन्हा एकदा धक्कातंत्राचा वापर केला आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यानंतर संरक्षणमंत्रीपद भूषविणा-या त्या दुस-या महिला ठरल्या आहेत.
मनोहर पर्रिकर गोव्याच्या राजकारणात परतल्यापासून संरक्षणमंत्रीपदाचा अतिरिक्त कार्यभार केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडे होता. संरक्षणमंत्रीपदासारखे महत्त्वाचे पद असे अधांतरी ठेवल्यामुळे सरकारला टीकेला सामोरे जावे लागले होते. काश्मीर खो-यात होणारे पाकिस्तानपुरस्कृत हल्ले व चीनशी सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनीही हा मुद्दा प्रकर्षाने पुढे आणला होता.
सुरेश प्रभू यांनी रेल्वे खात्याची जबाबदारी सोडण्याची तयारी दाखवल्यापासून रेल्वे मंत्रालयाच्या नव्या ‘मोटरमन’च्या नावावरून सुरू असलेल्या तर्कवितर्काना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. कॅबिनेटपदी बढती देण्यात आलेले पियूष गोयल यांच्या खांद्यावर रेल्वे खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मोदी मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर काही वेळातच सुरेश प्रभू यांनी एक ट्विट करून रेल्वेचे १३ लाख कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांचे आभार मानले. त्याचबरोबर, नव्या मंत्र्यांना त्यांच्या जबाबदारीसाठी शुभेच्छाही दिल्या.
मुख्तार अब्बास नक्वी अल्पसंख्याक मंत्री मंत्रिमंडळ विस्तारात कॅबिनेटपदी बढती मिळालेले मुख्तार अब्बास नक्वी यांच्याकडे अल्पसंख्याक खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर, पेट्रोलियममंत्री म्हणून उल्लेखनीय कामगिरी करणारे धर्मेद्र प्रधान यांच्यावर कौशल्य व उद्योजकता विकास खात्याचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.
मुख्तार अब्बास नक्वी यांची ओळख भाजपचा मुस्लिम चेहरा अशी आहे. ते भाजपच्या जुन्या नेत्यांपैकी एक असून पक्षाच्या प्रवक्तेपदाची जबाबदारीही त्यांनी यशस्वीरित्या सांभाळली आहे. याआधी ते अल्पसंख्याक व संसदीय कामकाज खात्यात राज्यमंत्री म्हणून काम पाहत होते. नजमा हेपतुल्ला यांची मणिपूरच्या राज्यपालपदी नियुक्ती झाल्यामुळे रिक्त झालेल्या केंद्रीय अल्पसंख्याकमंत्रीपदी आता त्यांची वर्णी लागली आहे.
अडवाणींना अटक करणारे आर. के. सिंह मंत्रिमंडळात
बिहारच्या आरा मतदारसंघाचे खासदार आर. के. सिंह यांना राज्यमंत्रीपद देण्यात आले आहे. यापूर्वी त्यांनी देशाचे गृहसचिवपद सांभाळले होते. विशेष म्हणजे समझोता आणि मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी त्यांनी रा.स्व.संघाशी संबंधित आरोपींची नावे उघड केली होती. भाजचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यावरही सिंह यांनी अटकेची कारवाईही केली होती. २० डिसेंबर १९५२ ला जन्म झालेले सिंह १९७५च्या बॅचच्या बिहार केडरचे माजी आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी आपल्या प्रशासकीय कार्यकाळात अनेक महत्त्वपूर्ण पदांवर काम केले आहे. त्यांनी पोलीस खात्याच्या आणि कारागृहाच्या आधुनिकीकरणाच्या योजनांमध्ये देखील महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापनाचा मसुदा तयार करण्याच्या कार्यातही त्यांचा समावेश होता.
नवीन राज्यमंत्र्यांची ओळख
राज्यमंत्रीपदी निवड झालेले शिव प्रताप शुक्ला उत्तरप्रदेशातील राज्यसभा खासदार आहेत. ते ग्रामविकास संसदीय स्थायी समितीचे सदस्य आहेत.
अश्विनी कुमार चौबे हे बिहारमधील बक्सर, लोकसभा खासदार आहेत. ते ऊर्जा आणि स्थायी समितीवर संसदीय समितीचे सदस्य आहेत.
वीरेंद्र कुमार हे टिकमगढ, मध्य प्रदेशचे लोकसभा खासदार आहेत, त्यांनी एमए पीएचडी पदव्या प्राप्त केल्या आहेत.
अनंतकुमार हेगडे कर्नाटकमधील उत्तर कन्नड जिल्ह्यातून निवडून गेले आहेत. ते परराष्ट्र व्यवहार आणि मानव संसाधन विकास मंडळाच्या स्थायी समितीचे सदस्य आहेत.
माजी सनदी अधिकारी आरके सिंह हे बिहारमधून भाजपच्या तिकिटावर निवडून आले होते.
हरिदिप सिंग पुरी १९७४ च्या तुकडीचे माजी आयएफएस अधिकारी आहेत, ते ब्राझिलमध्ये भारताचे राजदूत होते, त्यांचे वडीलही मुत्सद्दी होते.
गजेंद्र सिंह शेखावत जोधपूर लोकसभा खासदार, राजस्थान ते अर्थसंकल्प संसदीय स्थायी समितीचे सदस्य आणि फेलोशिप कमिटीचे अध्यक्ष आहेत.
सत्यपाल सिंह १९८० च्या बॅचचे, महाराष्ट्र केडरचे माजी आयपीएस अधिकारी आहेत, ते बागपत येथून लोकसभेत गेले आहेत. २०१४ च्या निवडणुकीत त्यांनी अजित सिंह यांचा पराभव केला होता.
अल्फोन्स कन्ननथनम कोट्टयमचे असून प्रशासकीय सेवेत कार्यरत होते, त्यांना डिमॉलिशन मॅन नावाने ओळखले जाते.
चार नोकरशहा मंत्रिमंडळात
पुन्हा एकदा सर्वाना चकवा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी आपल्या पोतडीतून नऊ नव्या चेह-यांची नावे बाहेर काढली. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त डॉ. सत्यपालसिंह, डॉ. मनमोहनसिंग सरकारमध्ये गृहसचिव असलेले आर. के. सिंह, संयुक्त राष्ट्रांतील भारताचे माजी कायम प्रतिनिधी ज्येष्ठ राजनैतिक अधिकारी हरदीपसिंग पुरी आणि केरळमधील निवृत्त आयएएस अधिकारी अल्फान्सो कन्नाथानम आदींचा मोदी मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला.
खातेवाटप जाहीर
कॅबिनेट मंत्री :
नितीन गडकरी (जलसंपदा, नदी विकास आणि गंगा नदी विकास खात्याचा अतिरिक्त कारभार), उमा भारती (पेय जल आणि सफाई मंत्री), धर्मेंद्र प्रधान (कौशल्य व उद्योजकता विकास, अतिरिक्त कार्यभार).
राज्यमंत्री :
आर. के. सिंग (ऊर्जा मंत्रालय, स्वतंत्र कारभार), सत्यपाल सिंग (जलसंपदा आणि गंगा विकास राज्यमंत्री), अनंतकुमार हेगडे (कौशल्य विकास राज्यमंत्री), शिवप्रताप शुक्ला (अर्थ राज्यमंत्री), डॉ. वीरेंद्र कुमार (महिला बालकल्याण आणि अल्पसंख्याक राज्यमंत्री), राज्यवर्धन सिंह राठोड (क्रीडा मंत्रालय स्वतंत्र कार्यभार), अल्फोन्स कन्नाथनम (पर्यटन राज्यमंत्री), अश्विनीकुमार चौबे (आरोग्य राज्यमंत्री), गजेंद्र सिंह शेखावत (कृषिराज्यमंत्री).
कोल्ह्याला द्राक्षे आंबट: भाजपा
भाजपनेही शिवसेनेच्या या टीकेला उत्तर दिले आहे. शिवसेनेला मंत्रीपदाची लालसा नाही. मग इतका संताप व्यक्त करण्याची गरज काय? हा तर कोल्ह्याला द्राक्षे आंबट असण्याचा प्रकार आहे, असा टोला भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी हाणला. संजय राऊत हे एक वैफल्यग्रस्त नेते आहेत. त्यांचे वक्तव्य गांभीर्याने घेण्याची गरज नाही, असेही भातखळकर म्हणाले.