‘क्यू की सांस भी कभी बहु थी’ या तद्दन फालतू मालिकेमुळे स्मृती इराणी या छोटया पडद्याच्या माध्यमातून देशातील अनेक घरांमध्ये पोहोचल्या. त्यांचा अभिनय यथातथाच आहे. त्या काही नूतन नाहीत. दीप्ती नवल, स्मिता पाटील किंवा शबाना आजमी यांच्यासारखा कसदार अभिनयही त्यांच्या नावावर नाही. असे असतानाच त्या केवळ भाजपाशी एकनिष्ठ राहत अमेठीत खोडी काढण्याचे काम करीत राहिल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी त्या ‘विशेष मंत्री’ आहेत.
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री असणे ही मोठीच बाब आहे. पण जेमतेम सातवीपर्यंत शिक्षण झालेल्या स्मृती इराणी यांची बौद्धिक कुवत त्या या खात्याच्या मंत्री झाल्यानंतर वर्धिष्णू होईल, असे वाटत होते. पण त्यात फारच फरक पडला, असे सध्या तरी वाटण्यासारखी स्थिती नाही.
याचा प्रत्यय मंगळवारी आलेला आहे. बिहारचे शिक्षणमंत्री अशोक चौधरी यांनी स्मृती इराणी यांना ट्विट केले. ‘डीअर, स्मृती इराणी, तुम्ही राजकारण व भाषणबाजीऐवजी नवीन शैक्षणिक धोरणांवर लक्ष केंद्रित करावे. तुमचे धोरण २०१५ला येणार होते ते कुठे आहे!’ असा साधाच सवाल त्यांनी स्मृती इराणी यांना विचारला. या सवालाचे उत्तर देणे तर दूरच या इराणी मॅडम यांनी चौधरी यांनी ट्विट करताना वापरलेल्या ‘डीअर’ या शब्दावर आक्षेप घेतला.
अखेर चौधरी यांनाच असा शब्दप्रयोग इंग्रजीत व्यावसायिक ई-मेल्सकरिता करण्यात येतो, याची माहिती इराणी यांना द्यावी लागली. त्यावरही या इराणी शांत बसतील तर त्या भाजपाच्या कसल्या? त्यांनी चौधरी यांना उत्तर दिले, ‘माझ्या प्रत्येक पत्राची सुरुवात ही ‘आदरणीय’ शब्दाने होते’. वास्तविक पाहता इराणी यांनी चौधरी यांना विचारलेल्या प्रश्नाचे ‘हा’ वा ‘नाही’ असे उत्तर दिले असते तर हा वाद तातडीने संपुष्टात आला असता. पण त्यांनाही शैक्षणिक धोरणाबाबत अळीमिळी गुपचिळी साधायची होती. त्यामुळे त्यांनी ‘डीअर’ या शब्दाचा बेखुबीने वापर करून चौधरी यांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला. पण अशा वाक्चातुर्याने चौधरी यांनी विचारलेला प्रश्न संपणार थोडीच आहे?
केंद्र सरकार नवीन शैक्षणिक धोरण जाहीर करणार आहे. या धोरणात काय काय असणार अशी उत्सुकता सगळ्यांनाच असताना त्याला चौधरी तरी कसे अपवाद असतील? ते अपवाद नसतील तर त्यांनी विचारलेला प्रश्न चुकीचा कसा मानायचा? मुळात स्मृती इराणी यांचा वकुब किती आहे, आवाका किती आहे याचा प्रत्यय कायम देशवासीयांनी घेतलेला आहे.
हैदराबाद विद्यापीठात इराणी व कामगार मंत्री बंडारू दत्तात्रय यांनी घातलेल्या घोळामुळे रोहित वेमुला या पीएचडी करणा-या विद्यार्थ्यांला आत्महत्या करावी लागली. त्याचे पडसाद संसदेत विशेष: राज्यसभेत उमटल्यावर खासदार मायावती यांनी इराणी व दत्तात्रय यांना धारेवर धरले. तेव्हा याच इराणी घशाच्या शिरा ताणेपर्यंत ओरडून आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न करीत होत्या. अशा केविलवाण्या पद्धतीने केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री आपली बाजू मांडण्याची ही भारतीय संसदीय प्रणालीतील पहिलीच घटना असावी.
हा वादही इराणी यांनी ओढावून घेतला होता. त्यांनी तेव्हाच जर तातडीने उपाययोजना केली असती तर वेमुला याला आत्महत्येपासून परावृत्त करता आले असते. पण इराणी यांना ते करायचे नव्हते, असाच त्यातून अर्थ निघतो.
मंगळवारी याच स्तंभातून मोदी सरकारने कशी कमअस्सल माणसे सरकारी समित्यांवर नेमली. त्यांनी मान्यताप्राप्त अशा या संस्थांचे कसे खोबरे केले आहे. त्याचा रोष कसा व्यक्त होत आहे. याबाबत ऊहापोह केला होता. स्मृती इराणीही त्याच मांदियाळीत बसतात. त्याचे क्वॉलिफिकेशन आहे सुब्रमण्यम स्वामींसारखे. गांधी घरण्याविषयी द्वेषभावना बाळगणे. यातूनच लोकसभेची निवडणूक त्या थेट अमेठीतून लढल्या.
या निवडणुकीत अपयश आल्यानंतर त्यांना खरे तर पक्ष कार्यात सक्रिय करणे आवश्यक असताना मोदी यांनी थेट केंद्रीय मंत्री केले. हे महत्त्वाचे खाते सांभाळण्यासाठी आवश्यक असणारी गुणवत्ता आतापर्यंत त्यांना सिद्ध करता आलेली नाही. याउलट वादग्रस्त विधाने करून प्रसिद्धीचा झोत आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्नच त्यांच्याकडून झालेला आहे. आता या डीअर प्रकरणातून त्याचाच कित्ता त्यांनी गिरवला आहे.
चित्रपटसृष्टीत डोळ्याला ग्लिसरीन लावून मुळूमुळू रडणे वेगळे व वास्तवात जगणे वेगळे असते. त्याचेच भान बहुदा इराणी यांना नसल्याने त्या अनेकदा वास्तव सोडणारे वक्तव्य करतात. वागतातही तशाच. त्यांची ही शैली भाजपाला, त्यांच्या खूशमस्क-यांना लखलाभ असो. पण अशा कृती, उक्तीतून परिपक्वता सिद्ध होत नसते.
देशाच्या पहिल्या केंद्रीय मंत्रिमंडळात मौलाना अब्दुल कलाम आझाद यांनी हे खाते सांभाळलेले होते. त्यानंतर के.सी. पंत, एम.सी. छागला, सिद्धार्थ शंकर रे, पी. व्ही. नरसिंहराव,अटलबिहारी वाजपेयी, व्ही. पी. सिंग, माधवराव सिंधीया, शंकरराव चव्हाण, अर्जुन सिंग यांनी या खात्याचा कार्यभार सांभाळलेला होता. या पूर्वसुरींनी या खात्याच्या माध्यमातून भरीव कामे केली आहेत. अशा या खात्याचे मंत्रीपद भूषवताना त्याच्या इसेंसला धक्का पोहोचू नये, याची काळजी इराणी यांनी घ्यावी, एवढी माफक अपेक्षा.