मुंबईत एकूण १०९ स्थानकांवर ७५ लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करत असतानाही त्यांच्यासाठी असणारी स्वच्छतागृहांची संख्या फार कमी आहे.
मुंबई- मुंबईत एकूण १०९ स्थानकांवर ७५ लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करत असतानाही त्यांच्यासाठी असणारी स्वच्छतागृहांची संख्या फार कमी आहे. जी स्वच्छतागृहे उपलब्ध आहेत त्याठिकाणी प्रवासी नाकाला रुमाल लावूनच आत जातात. ४० टक्के महिला प्रवाशांचा यात समावेश असून त्यांची तर शौचालयांच्या कमतरतेमुळे कुचंबणाच होते. मात्र प्रवाशांना सुविधा देण्याची ओरड रेल्वे प्रशासनाकडून होत असली, तरी प्रत्यक्षात सुविधा कागदावरच असल्याचे समोर आले आहे.
सफाई कामगारांची नियुक्ती करण्यात न आल्याने व स्वच्छतागृहे चालवण्यासाठी कंत्राटदार न मिळाल्याने शौचालय बंद ठेवण्यात आल्याचे कारण रेल्वे प्रशासनाकडून देण्यात येते. ‘रोज दीड ते दोन तास प्रवास करत प्रवासी मुंबईत येत असतात, अशावेळी त्यांना व्यवस्थित नैसर्गिक क्रिया करायला न मिळणे म्हणजे किती घृणास्पद आहे, असे मत प्रवासी संघटनेने व्यक्त केले.
सीएसटीसारख्या आंतरराष्ट्रीय स्थानकात केवळ तीन स्वच्छतागृह आहेत. त्या स्वच्छतालयात नेहमीच भली मोठी रांग लागलेली पाहायला मिळते. नैसर्गिक क्रिया करायला वेळ लागल्यास आरोग्यासही धोका पोहोचण्याची शक्यता असते, अशावेळी रेल्वे प्रशासन या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहत नसल्याचे दिसते.
मोठया स्थानकांसोबत लहान म्हणजे गर्दी कमी असणा-या स्थानकांवरही स्वच्छतागृहे उभी राहावी, यासाठी रेल्वे प्रशासनाने पावले उचलली पाहिजेत, अशी मागणी प्रवासी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
काही स्थानकांतील शौचालयांना छप्पर नाही तर काही स्थानकातील शौचालयांच्या खिडक्या मोठया असल्याने महिला प्रवासी त्या शौचालयात जाणेच टाळतात. कंत्राटदारांकडून आकारण्यात येणा-या पैशांच्या प्रमाणात स्वच्छतेचा लवलेशही दिसत नाही. स्वच्छतेच्या नावाने बोजवारा उडाला असतानाही कंत्राटदार पैसे आकारतात.
शिवाय कंत्राटदारांनी किती पैसे आकारावेत हे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट न केल्याने प्रत्येक स्थानकावर कंत्राटदार त्यांच्या मर्जीप्रमाणे पैसे आकारतात. रेल्वे स्थानकात शौचालयांची संख्या आणि कर्मचा-यांचीही संख्या वाढवावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. एकूण प्रत्येक प्रवाशाचा प्रवास सुखकर व त्याला योग्य सुविधा उपलब्ध करणे रेल्वे प्रशासनाची जबाबदारी आहे, असे मत प्रवाशांनी व्यक्त केले.