ठाणे महापालिकेने नुकत्याच झालेल्या महासभेत कळवा खाडीकिनारी असलेल्या साडेतीन हजार झोपडया पाडण्याचा ठराव मंजूर केला असून यामुळे हजारो नागरिक बेघर होणार आहेत.
ठाणे- ठाणे महापालिकेने नुकत्याच झालेल्या महासभेत कळवा खाडीकिनारी असलेल्या साडेतीन हजार झोपडया पाडण्याचा ठराव मंजूर केला असून यामुळे हजारो नागरिक बेघर होणार आहेत. केवळ सौंदर्यीकरणाच्या नावाखाली ठाणे महापालिकेचे आयुक्त आणि सत्ताधारी पक्ष कळव्याचे स्मशान करायला निघाले असून उद्या याच स्माशानात ठाणेकर नागरिक सत्ताधा-यांची चिता रचतील, असा इशारा राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे.
ठाणे महापालिकेच्या या ठरावाविरोधात कळव्यातील ३५ हजार झोपडीधारकांनी सोमवारी कळवा नाक्यापर्यंत मोर्चा काढत तिथे अभूतपूर्व चक्काजाम आंदोलन केले. यावेळी आंदोलनकर्त्यांना संबोधित करताना आमदार आव्हाड बोलत होते.
ठाणे महापालिकेने कळव्यातील खाडीकिनारी असलेल्या झोपडयांवर कारवाई करण्याची तयारी केल्यानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करत या कारवाईला स्थगिती मिळवली होती. मात्र त्यानंतर सत्ताधारी शिवसेना भाजपाने महासभेत या झोपडयांवर कारवाई करण्याचा ठराव केला. या कारवाईसाठी ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल हे स्वत: आग्रही असून या ठरावामागे त्यांचीही ‘मेहनत’ असल्याचे बोलले जाते.
याविरोधात सोमवारी कळव्याच्या मनीषा नगर, जानकी नगर, खारीगाव, घोळाई नगर, आतकोनेश्वर नगर भागातील झोपडीधारकांनी मोर्चा काढला. मनिषा नगरपासून कळवा नाक्यापर्यंत मोर्चा आल्यानंतर तिथेच ठिय्या देत मोर्चेक-यांनी चक्काजाम आंदोलन केले.
यामुळे नवी मुंबई, रेतीबंदर आणि ठाण्याकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. यावेळी मनोहर साळवी, मिलींद पाटील, मनाली पाटील, अपर्णा साळवी, महेश साळवी, रिटा यादव, अक्षय ठाकूर, मुकुंद केणी, प्रमिला केणी आदी उपस्थित होते.
तर उद्या माजी नगरसेवक व्हाल..
आजचे हे शहर आमच्या घामाने सजले असून सत्ताधारी आणि प्रशासकीय अधिका-यांनी एकही झोपडी पाडली, तर आम्ही रस्त्यावर उतरू, गोरगरिबांना बेघर केले, तर हे लोक बंड करतील आणि मग आज सत्ताधारी असलेले नगरसेवक उद्या माजी नगरसेवक म्हणून गणले जातील.
झोपडया पाडून आयुक्त व सत्ताधा-यांना शहराचे सुंदर स्मशानात रूपांतर करायचे आहे, पण याच स्मशानात सेना-भाजपाची चिता रचल्याशिवाय हा गरीब माणूस स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही आ. जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी बोलताना दिला.