संशोधकांनी कृत्रिम स्वादुपिंड तयार केले असून ते २०१८ पर्यंत बाजारात उपलब्ध होणार आहे. यामुळे मधुमेही रुग्णांना सर्वसामान्य जीवन जगणे शक्य होणार आहे.
लंडन- मधुमेह हा जगातील सर्वात धोकादायक आजार आहे. तो कधीही बरा होत नाही. त्यामुळे त्याच्या रुग्णांना गोळ्या किंवा इन्शुलिन इंजेक्शनवर आयुष्यभर जगावे लागते. आता या रुग्णांना दिलासा देणारे संशोधन केंब्रिज विद्यापीठाने जाहीर केले आहे. या विद्यापीठाच्या संशोधकांनी कृत्रिम स्वादुपिंड तयार केले असून ते २०१८ पर्यंत बाजारात उपलब्ध होणार आहे. यामुळे मधुमेही रुग्णांना सर्वसामान्य जीवन जगणे शक्य होणार आहे.
सध्या मधुमेही रुग्णांना रक्तातील साखर तपासण्यासाठी आणि शरीरात इन्शुलिन किती प्रमाणात द्यावे हे कळण्यासाठी दोन यंत्रे वापरावी लागतात. मात्र, कृत्रिम स्वादुपिंड रक्तातील साखरेचे प्रमाण ओळखून त्यानुसार इन्शुलिन शरीरात मारा करेल, असे संशोधकांनी सांगितले. या संशोधनामुळे ‘टाईप-१’ मधुमेही रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. केंब्रिज विद्यापीठातील संशोधक रोमन होवोरका व हुड थाबिट म्हणाले की, आतापर्यंत घेतलेल्या चाचण्यांचे निष्कर्ष सकारात्मक आहे. कृत्रिम स्वादुपिंडामुळे रुग्णांना मधुमेहाचे व्यवस्थापन करणे वेळ मिळेल. या स्वादुपिंडामुळे सातत्याने रक्तातील साखरेचे प्रमाण बघण्याची आवश्यकता लागणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
हे कृत्रिम स्वादुपिंड बाजारात कधी मिळणार याबाबत संशोधक म्हणाले की, या यंत्राला अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाची मान्यता मिळण्याची प्रतीक्षा आहे. या यंत्राच्या चाचण्या सध्या सुरू असून २०१७ मध्ये त्याला मान्यता मिळण्याची शक्यता आहे. इंग्लंडच्या राष्ट्रीय आरोग्य संशोधन संस्थेने हे यंत्र २०१८च्या अखेरीस युरोपियन बाजारात उतरवण्याचे संकेत दिले आहेत.
या कृत्रिम स्वादुपिंडावर आणखी व्यापक संशोधन सुरू आहे. त्यामुळे भविष्यात कृत्रिम स्वादुपिंड शरीरात बसवणे शक्य होईल. तसेच त्यात इन्शुलिन निर्माण करणा-या पेशीही तयार करता येऊ शकतील. हे कृत्रिम स्वादुपिंड शरीरात बसवल्यानंतर रोगप्रतिबंधक यंत्रणा अधिक भक्कम करण्यासाठी खास औषधांची गरज लागेल. कृत्रिम स्वादुपिंडाबाबत अनेक क्लिनिकल चाचण्या पूर्ण झाल्या आहेत.