भाजपला थोपवण्यासाठी पराभवाचा धडा घेतलेल्या विरोधी पक्षांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र येण्याचे ठरवले आहे.
नवी दिल्ली- एकमेकांचे पाय खेचण्यात तरबेज असलेले विरोधी पक्ष देशभरात मागिल ३ वर्षापासून झालेल्या निवडणुकांमधील पराभवाचा धडा घेत भाजपला थोपवण्यासाठी आता राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने एकाच मंचावर आणि तेही काँग्रेसच्या नेतृत्वात एकत्र येण्याचे ठरवले आहे.
वारंवार झालेल्या पराभवामुळे विरोधी पक्षांना अस्तित्वाची जाणीव झाली आहे. त्यामुळेच भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सामना करण्यासाठी सर्वजण सज्ज झाले आहेत.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी भाजपविरोधी राजकीय पक्षांची बैठक बोलावली होती. यावेळी सोनिया गांधी आणि त्यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांच्या कुशल नेतृत्वामुळे एकमेकांचे तोंडही न पाहणारे राजकीय पक्ष या बैठकीत सहभागी झाले.
राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराबाबत सर्वसहमती व्हावी म्हणून सोनिया गांधी यांनी या बैठकीचे आयोजन केले होते. बहुतेक राजकीय पक्ष या बैठकीला आल्याने काँग्रेससाठी चांगले संकेत मानले जात आहेत. त्यामुळे आगामी काळात देशात तिसरी आघाडी निर्माण होण्याची शक्यता राजकीय निरीक्षक वर्तवित आहेत.
या बैठकीत नेमके कोणकोणते निर्णय घेण्यात आले, याची माहिती मिळू शकली नाही. परंतू या बैठकीला बसप अध्यक्ष मायावती, समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव, तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी आणि कम्युनिस्ट नेते सीताराम येचुरी उपस्थित होते. त्याचबरोबर माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रीय जनता दलाचे लालूप्रसाद यादव, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, नॅशनल कॉन्फ्रन्सचे नेते उमर अब्दूल्ला यांच्यासह जेएमएम, केरळ काँग्रेस, नॅशनल कॉन्फ्रन्स, डीएमके, एआययूडीएफ, आरएसपी, ऑल इंडिया मुस्लिम लीग, सीपीएम, सीपीआय आणि जेडीएस आदी पक्षाचे नेते या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीला बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आले नाहीत. मात्र त्यांच्याऐवजी जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद यादव उपस्थित होते.
दरम्यान आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांना या बैठकीचे निमंत्रण देण्यात आले नव्हते.