पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा रद्द केल्यामुळे निर्माण झालेल्या अभूतपूर्व नोटांच्या टंचाईची सर्वाधिक झळ शेतात काबाडकष्ट करणा-या शेतक-यांना बसत असून मोठया मुश्किलीने पदरात पडलेल्या शेतमालाचे भाव धाडकन कोसळले आहेत.
मुंबई- पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा रद्द केल्यामुळे निर्माण झालेल्या अभूतपूर्व नोटांच्या टंचाईची सर्वाधिक झळ शेतात काबाडकष्ट करणा-या शेतक-यांना बसत असून मोठया मुश्किलीने पदरात पडलेल्या शेतमालाचे भाव धाडकन कोसळले आहेत. अगोदर अस्मानी संकटाने शेतकरी नाडला आणि आता सरकारच्या सुलतानी निर्णयामुळे तो पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचे चित्र ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे.
शेतक-यांचा हा रब्बीच्या पेरणीचा हंगाम असून खरिपाचे हाती आलेले पीक बाजारात विकून रब्बी पिकांची तयारी केली जाते. परंतु बाजारात शंभर आणि दोन हजार रुपयांच्या नव्या नोटाच उपलब्ध नसल्याने शेती मालाची मागणी घटली आहे. इतकेच नव्हे तर तो माल मातीमोल भावाने विकावा लागत आहे.
गेली चार वर्षे दुष्काळात होरपळल्यानंतर या वर्षी पावसाने चांगली सुरुवात केली होती. पेरण्या खूप चांगल्या वातावरणात झाल्या होत्या. पिकेही चांगली आली होती. मात्र पिके पोट-यात आणि भरात असतानाच पुन्हा पावसाने ओढ दिली आणि दाना भक्कमपणे भरू शकला नाही. विशेषत: बाजारी, सोयाबीन, संकरीत ज्वारी ही पिके उद्ध्वस्त झाली. कापूस थोडाफार तग धरून होता. गेल्या वर्षी संपूर्ण कापूस ४००० ते ४२०० दराने विकावा लागला होता. मात्र या वर्षी सुरुवातीलाच शेतक-यांना ४८०० ते ५२०० इतका भाव प्रति क्िंवटल मिळत होता.
कापसाची पहिली वेचनी करून रब्बीच्या पिकाची शेतकरी तयारी करीत असतानाच पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटांवर बंदी घातल्याचा निर्णय पंतप्रधान मोदी यांनी घेतला. दिवसभर रांगेत उभे राहूनही जेमतेम दोन किंवा चार हजार रुपये हातात पडत आहेत. शेतक-यांना रब्बीची बियाणे, खते खरेदी करण्याची अत्यंत निकड असल्याने येईल त्या भावाला कापूस आणि खरिपाची पिके विकावी लागत आहेत. कापसाचा भाव ५२०० वरून ४००० हजारांवर येऊन धडकला आहे. तर सोयाबीन पिकाचा भाव ३६०० वरून २२०० ते २५०० रुपये खाली आला. त्याबदल्यात रब्बीच्या बियाणांची आणि खतांची व्यापारी चढया दराने विक्री करीत आहेत. त्यामुळे चारीबाजूने शेतकरी नागवला जात आहे.