पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन होत असून भारतीय सैन्याने केलेल्या गोळीबारात पाकिस्तानचे सात जवान आणि एक दहशतवादी मारला गेला.
जम्मू- सर्जिकल हल्ल्यानंतर संतापलेल्या पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन होत असून भारतीय सैन्याने केलेल्या गोळीबारात पाकिस्तान रेंजर्सचे सात जवान ठार तर तीन जवान जखमी झाले आहेत. या गोळीबारात एक दहशतवादी मारला गेला. या चकमकीत भारताचा एक जवान जखमी झाला.
सीमा सुरक्षा दलाच्या अधिका-याने सांगितले की, पाकिस्तानी रेंजर्सनी आंतरराष्ट्रीय सीमेवर कथुआ येथे तर प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर राजौरी येथे शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. राजौरी विभागात दुपारी १२.४० वाजता पाकिस्तानी सैनिकांनी भारतीय सैन्यदलाच्या चौक्यांवर अंदाधुंद गोळीबार केला. लष्कराने त्यांना चोख प्रत्युत्तर दिले.
छोटय़ा शस्त्रास्त्रांद्वारे सकाळी ९.४५ वाजता हिरानगर विभागातील बोबिया भागातील सीमा सुरक्षा दलांच्या चौक्यांवर जोरदार गोळीबार केला. यासाठी त्यांनी लहान शस्त्रे, स्वयंचलित मशीनगन, ८२ मिमी मोर्टार बॉम्ब आदींचा वापर केला. सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी पाकिस्तानी रेंजर्सना जोरदार प्रत्युत्तर दिले. कथुआ येथील आंतरराष्ट्रीय सीमेवर सीमा सुरक्षा दलाने पाकिस्तानी सैन्याला दिलेल्या जोरदार प्रत्युत्तरात पाकिस्तानी रेंजर्सचे सात जवान ठार झाले तर तीन जण जखमी झाले, अशी माहिती सीमा सुरक्षा दलाच्या अधिका-याने दिली.
भारताने केलेल्या सर्जिकल हल्ल्यानंतर पाकिस्तानने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय सीमा व प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर ३१ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. गेल्या चार दिवसांपासून भारत आणि पाकिस्तान सैन्यात जोरदार गोळीबार होत आहे. पाकिस्तान सैन्याने चार दिवसांत पाच वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले.
दरम्यान, पाकिस्तानने या वृत्ताचा इन्कार केला आहे. पाकिस्तानने कोणतीही जिवितहानी किंवा नुकसान झाले नसल्याचा दावा केला आहे.