विध्वंसक अण्वस्त्रांचा वापर शांततेसाठीच करण्यात येईल, अशी स्पष्ट ग्वाही भारताने रविवारी दिली.
नवी दिल्ली- विध्वंसक अण्वस्त्रांचा वापर शांततेसाठीच करण्यात येईल, अशी स्पष्ट ग्वाही भारताने रविवारी दिली. भारत हा अण्वस्त्रांचा वापर शस्त्र म्हणून करणार नाही तर शस्त्र समतोल राखण्यासाठीच करेल, असे भारताच्या आघाडीच्या संरक्षण तज्ज्ञांनी स्पष्ट केले.
दिल्लीला अवघ्या पाच मिनिटांत पाकिस्तानने लक्ष्य केले असते, अशी दर्पोक्ती पाकिस्तानच्या अण्वस्त्र कार्यक्रमांचे प्रमुख डॉ. ए. क्यू. खान यांनी शनिवारी केली होती.
इस्लामाबाद जवळच्या काहुटा केंद्रावरून दिल्लीला अवघ्या पाच मिनिटांत लक्ष्य करू शकला असता. त्यावेळी पाकिस्तानला एक अणुचाचणी करायची होती, मात्र त्यावेळच्या पाकिस्तान सरकारने परवानगी दिली नाही, असे खान यांनी स्पष्ट केले.
खान यांच्या वक्तव्यावरून भारताच्या संरक्षण क्षेत्रातून तिखट प्रतिक्रिया उमटली. पाकिस्तानला पूर्णपणे नेस्तनाबूत करण्याची भारताची क्षमता आहे. मात्र, अण्वस्त्र ही युद्ध करण्यासाठी नाही, तर शस्त्र समतोल राखण्यासाठी असल्याची भारताची भूमिका आहे, असे भारताचे माजी लष्करप्रमुख जनरल एन. सी. वीज यांनी सांगितले. वीज हे विवेकानंद इंटरनॅशनल फाऊंडेशनचे या विचारगटाचे संचालक आहेत.
प्रख्यात संरक्षणतज्ज्ञ व विषेक असलेले माजी ब्रिगेडीयर गुरमीत कन्वल यांनी सांगितले की, खान यांचा दावा पोकळ आहे. अण्वस्त्र ही केवळ शस्त्रसमतोल राखण्यासाठीच असतात. मात्र, समजा पाकिस्तानी लष्करप्रमुखांनी उद्या अण्वस्त्र हल्ल्याचे आदेश दिले तरीही ते सोडण्यासाठी पाकिस्तानला सहा तासांचा अवधी लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
एअरव्हाईस मार्शल (निवृत्त) मनमोहन बहाद्दूर म्हणाले की, खान यांचे वक्तव्य केवळ प्रसिद्धीसाठी आहे. युद्धात अण्वस्त्र वापरण्याचा विचारही पाकिस्तानी नेतृत्व करणार नाही. खान यांनी त्यांचे महत्त्व वाढवण्यासाठी असे वक्तव्य केले आहे. निवृत्त कमोडोर सी. उदय भास्कर म्हणाले की, प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी खान यांनी हे वक्तव्य केले आहे. पाकिस्तानातून पाच मिनिटांत क्षेपणास्त्र दिल्लीत पोहोचेल हे कपोकल्पित वाटते.
२००४ मध्ये खान यांनी अण्वस्त्र निशस्त्रीकरण करण्याची जबाबदारी मान्य केली आहे. खान यांनी पाकिस्तानी राजकारणात सहभाग घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात ते अयशस्वी ठरले.