सोडतीतील घरांच्या ताब्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे नियोजित वेळेत सादर न करणे, विजेत्या अर्जदाराला आता महागात पडू शकते.
मुंबई- सोडतीतील घरांच्या ताब्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे नियोजित वेळेत सादर न करणे, विजेत्या अर्जदाराला आता महागात पडू शकते.
म्हाडाच्या यंदाच्या सोडतीत विजेत्या ठरलेल्या अर्जदारांकडून पात्रता निश्चितीसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे जमा करण्याची प्रक्रिया म्हाडाद्वारे सुरू आहे. नियोजित कालावधीत अर्जदाराने कागदपत्रे सादर केली नाहीत तर विजेत्या अर्जदाराला थेट अपात्र करत प्रतीक्षा यादीवरील अर्जदारांना संधी दिली जाईल.
सोडत प्रक्रियेतील दिरंगाई, त्यामुळे घरांचा ताबा देण्यात होणारा विलंब लक्षात घेता यंदा प्रक्रिया वेळेत पूर्ण व्हावी, यासाठी ठोस पावले उचलली जात असल्याचे म्हाडाच्या वरिष्ठ अधिका-यांनी सांगितले.
म्हाडाद्वारे यंदा १ हजार ६३ घरांसाठीची सोडत काढण्यात आली. सोडतीतील विजेत्यांना पात्रता निश्चितीसाठी आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतात. पात्रता निश्चितीसाठी आवश्यक असणारे ‘पोस्ट लॉटरी सॉफ्टवेअर’ म्हाडाद्वारे ऑगस्ट महिन्यात कार्यान्वित करण्यात आले. या सॉफ्टवेअरसाठी http://postlottery2015.mhada.gov.in या संकेतस्थळाची निर्मिती केली.
या प्रक्रियेंतर्गत आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी ७ सप्टेंबर ही अखेरची तारीख होती. मात्र या कालावधीत केवळ ४००च्या जवळपास अर्जदारांनीच कागदपत्रे सादर केली आहेत. उर्वरित अर्जदारांना कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन करत म्हाडाने २२ सप्टेंबपर्यंत मुदतवाढ दिली. तरीही अनेक अर्जदारांनी कागदपत्रे सादर न केल्याने म्हाडाने कठोर पावले उचलली आहेत.
ज्या अर्जदारांनी कागदपत्रे सादर केली नाहीत, अशा अर्जदारांना ३१ ऑक्टोबपर्यंत मुदवाढ दिली आहे. या कालावधीत कागदपत्रे जमा केली नाही तर अशा विजेत्या अर्जदारांना अपात्र करत प्रतीक्षा यादीवरील अर्जदारांना संधी दिली जाणार असल्याचे म्हाडाच्या वरिष्ठ अधिका-यांनी सांगितले.
ज्या वर्षी सोडत काढली जाईल त्या वर्षात निदान सोडतीचे ९० टक्के काम पूर्ण करण्याचे म्हाडाने निश्चित केले असून त्या दृष्टीने पात्रता निश्चितीसाठी आवश्यक कागदपत्रे लवकरात लवकर जमा करण्याचे ठरवले आहे.