लालबाग येथे निर्माण झालेल्या तणाव निवळल्यानंतरही काही सोशल नेटवर्किंग साईटवरून अफवा पसरवल्या जात होत्या. या अफवा पसरवणा-यापर्यंत पोहोचण्यासाठी मुंबई पोलिसांनी मोबाईल सेवा पुरवणा-या कंपन्या व केंद्रीय यंत्रणांकडे मदत मागितली आहे.
मुंबई- लालबाग येथे निर्माण झालेल्या तणाव निवळल्यानंतरही काही सोशल नेटवर्किंग साईटवरून अफवा पसरवल्या जात होत्या. या अफवा पसरवणा-यापर्यंत पोहोचण्यासाठी मुंबई पोलिसांनी मोबाईल सेवा पुरवणा-या कंपन्या व केंद्रीय यंत्रणांकडे मदत मागितली आहे. दरम्यान, या प्रकरणातील संकेतस्थळावरील ८५० पोस्ट पोलिसांनी ‘ब्लॉक’ केल्याची माहिती पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी दिली.
घटनेनंतर पोलिसांनी काळाचौकी, भोईवाडा, भायखळा व वरळी पोलीस ठाण्यात बेकायदा जमाव व दंगलीचे गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणातही पोलिसांचा तपास सुरू आहे. मात्र वातावरण निवळल्यानंतरही सोशल नेटवर्किंग साईट्सवर काही समाजकंटकांकडून याबाबत प्रक्षोभकपोस्ट व व्हीडिओ क्लिप पाठवल्या जात होत्या. त्यामुळे पोलिसांनी अफवा पसरवणा-यांच्या मुळापर्यंत पोहोचण्यासाठी मोबाईल सेवा पुरवणा-या कंपन्यांकडे अशा मोबाईलधारकांची माहिती मागितली आहे. याशिवाय केंद्रीय सुरक्षा यंत्रणांकडेही या प्रकरणी मदत मागण्यात आली आहे.
लालबाग-परळ येथील घटनेनंतर सामाजिक सलोखा अधिक दृढ व्हावा, यासाठी मुंबई पोलीस मोहोल्ला कमिट्यांना अधिक बळकट करणार आहेत. त्यासाठी सध्या रिक्त असलेल्या जागा भरणे, ज्या ठिकाणी कमिटी नाही, तिथे ती स्थापन करणे आदी प्रक्रिया काही दिवसांत सुरू होईल. याशिवाय जुन्या कमिट्यांना अधिक कार्यक्षम करण्यासाठी काही सूचनाही करण्यात येणार आहेत.
गायक अंकित तिवारीचा सहभाग ही चूक
पोलिसांच्या ‘उमंग’ कार्यक्रमात गायक अंकित तिवारी याचा सहभाग ही चूक असल्याचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी मान्य केले. कार्यक्रमाची आखणी व व्यवस्थापनाची जबाबदारी इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी करत होती. त्यांनीच या कार्यक्रमात कोण सहभागी होईल, याबाबत निर्णय घेतले होते. कार्यक्रमापूर्वीच कंपनीला कोणताही वाद उद्भवणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. पण, त्यानंतरही ही चूक झाल्याचे मारिया यांनी सांगितले.
दोन महिन्यांत २०९७ जणांचा शोध
बेपत्ता नागरिक व अल्पवयीन मुलांना शोध घेण्यासाठी नोव्हेंबरपासून मुंबई पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. त्याअंतर्गत आतापर्यंत २०९७ जणांचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यात ५४६ अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. त्यांचा वापर भीक मागण्यासाठी केला जात होता का, याबाबत पोलीस तपास करत आहेत.