दिल्ली पोलिस दलातील अधिका-यांवर कारवाई करण्यासाठी सामान्य दिल्लीकरांना वेठीस धरणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे वेडे मुख्यमंत्री असल्याचे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटले आहे.
मुंबई – दिल्ली पोलिस दलातील अधिका-यांवर कारवाई करण्यासाठी आम आदमी पक्षाने दोन दिवस केलेल्या धरणे आंदोलनावर सर्व स्तरांतून टीका होत आहे. अशा प्रकारे आंदोलन करुन सामान्य जनतेला वेठीस धरणा-या दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी ‘वेडा मुख्यंमंत्री’ म्हटले आहे. केजरीवाल यांनी केलेल्या आंदोलनामुळे दोन दिवस दिल्लीतील सुरक्षा यंत्रणेची संपूर्ण तारांबळ उडाली होती. यासाठी पोलिसांच्या सुट्ट्याही रद्द करण्यात आल्या होत्या.
‘आप’ राजकारणातील ‘आयटम गर्ल’ – चेतन भगत »
हिंगोली येथील एका कार्यक्रमा दरम्यान हे वक्तव्य केले आहे. यावेळी त्यांनी त्यांच्या भूतकाळातील आठवणींनाही उजाळा दिला. ‘जेव्हा मी खेरवाडी येथे पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत होतो त्यावेळी दंगलीमुळे लग्नांनंतर घेतलेली माझी रजा रद्द करण्यात आली होती. आता मात्र एका वेड्या मुख्यमंत्र्यामुळे मला दिल्ली पोलिसांची रजा रद्द करावी लागली’, असे शिंदे यांनी सांगितले.
सोमवारी सोमनाथ भारती यांचे आदेश फेटाळून लावणा-या दिल्ली पोलिसांच्या निलंबनाकरीता अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या मंत्र्यांनी रेलभवनाजवळ धरणे केले होते. त्या दोन पोलिसांना सक्तीच्या रजेवर पाठवल्यानंतरच मंगळवारी रात्री हे आंदोलन मागे घेण्यात आले.