आधारकार्ड नोंदणी केंद्रे रात्री दहा वाजेपर्यंत सुरू ठेवावीत, अशी मागणी नगरसेवकांनी सोमवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत केली.
मुंबई– आधारकार्ड नोंदणीसाठी नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. हे कार्ड मिळवण्यासाठी अनेकांना सुट्टी घ्यावी लागत आहे. परंतु सुट्टी घेऊनही नोंदणीची प्रक्रिया काही पूर्ण होत नाही. त्यामुळे आधारकार्ड नोंदणी केंद्रे रात्री दहा वाजेपर्यंत सुरू ठेवावीत, अशी मागणी नगरसेवकांनी सोमवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत केली आहे.
केंद्र सरकारने नागरिकांना आधार ओळखपत्र बंधनकारक केले आहे. नागरिकांना आधार ओळखपत्र काढण्यासाठी रेशनकार्ड, वास्तव्याचा दाखला, वयाचा दाखला, पॅनकार्ड इत्यादी पुरावे द्यावे लागत आहेत. ज्या नागरिकांकडे वास्तव्याचे पुरावे नाहीत, अशांना स्थानिक आमदार अथवा खासदार यांच्यामार्फत देण्यात आलेले वास्तव्यासंबंधीचे दाखले ग्राह्य धरले जातात. परंतु, नगरसेवकांनी दिलेले वास्तव्यासंबंधीचे दाखले ग्राह्य धरले जात नाहीत. त्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होत असून, आमदार व खासदार यांच्या धर्तीवर नगरसेवकांनी दिलेली वास्तव्याची प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात यावीत, अशी मागणी भाजपचे नगरसेवक अॅड. ज्ञानमूती शर्मा यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली. या वेळी झालेल्या चर्चेत भाग घेताना, भाजपचे विनोद शेलार यांनी, आधार ओळखपत्र देण्यासाठी सध्या मशिन व कर्मचारी कमी आहेत. तसेच संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंतच या ओळखपत्राचे काम केले जाते असे सांगून रात्री १० वाजेपर्यंत ही केंद्रे सुरू ठेवण्यात यावीत, अशी सूचना केली.
आधार ओळखपत्र ही योजना केंद्र सरकारची असली तरी महापालिका नोडल एजन्सी म्हणून काम पाहते. परंतु, खासगी संस्था आधार नोंदणीचे काम करतात. मात्र या संस्था दिवसाला ५० पेक्षा जास्त ओळखपत्रांचे काम करत नाहीत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
एका संस्थेने दिलेले अर्ज दुसरी संस्था बोगस ठरवते. त्यामुळे हा गोंधळ अधिकच वाढला असल्याचे सांगत उशिरापर्यंत ही केंद्रे सुरू ठेवण्यात यावीत, अशी मागणी केली. या वेळी झालेल्या चर्चेत अनेक नगरसेवकांनी भाग घेत आधारकार्ड केंद्रांतील गोंधळाबाबत तक्रारींचा पाढाच वाचला.