वेगवेगळ्या कलादालनांमधील प्रदर्शनांना ऋतुमानांनुसार येणा-या सणवारांची झालर लागली आहे. आर्टिस्ट सेंटर आर्ट गॅलरीत सुरू असणा-या पाच तरुण कलावंतांच्या समूह कला प्रदर्शनात वैविध्य बघायला मिळते, तर जहांगीर कलादालनात कृपा शहा यांच्या रंगलेखनाचे ‘प्रतिबिंब’मध्ये आध्यात्म डोकावतो आहे. पुढच्या आठवडय़ात बजाज आर्ट गॅलरीत सुरू होणा-या पूर्वी पारेख यांच्या रंगलेखनात कृष्णभक्ती दरवळणार आहे. या तीनही प्रदर्शनांमधून आध्यात्मातील वैविध्य डोकावते आहे.
पाच तरुणांचे स्टार आर्ट
स्टार आर्ट ग्रुपच्या पाच तरुण रंगलेखक आणि शिल्पकारांनी आविष्कृत केलेल्या कलाकृतींचे प्रदर्शन मुंबईतील आर्टिस्ट सेंटर आर्ट गॅलरीत १७ ऑगस्टपासून सुरू झाले असून, ते २३ ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. रंगलेखक एस. के. कामतगौडर, एम. लक्ष्मी नारायण, एम. स्वेता, विवेकानंद एस. गौडासलामनी आणि शिल्पकार जे. एस. पी. गोविंद यांच्या कलाकृती या प्रदर्शनात ठेवण्यात आल्या आहेत.
कलेच्या धाग्याने एकत्र बांधलेले कलाकार एकत्र आले. त्यातून या चित्रप्रदर्शनाची मोट बांधली आहे. प्रत्येकाची कलासाधना जरी वेगवेगळी असली तरी पाहणा-याला त्यात एक समान सूत्र सापडते. जे. एस. पी. गोविंद यांनी वाया जाणा-या धातूंच्या तुकडयांमधून अप्रतिम शिल्पे तयार केली आहेत. प्रयोग आणि नावीन्य याच्या संगमातून सुंदरतेचा साक्षात्कार त्यांच्या शिल्पांमधून झालेला दिसतो.
एस. के. कामतगौडर यांची जलरंगातील चित्रे आपल्या मनाचा वेध घेतात. ऐतिहासिक वास्तूंचा धांडोळा घेताना त्यांनी आपल्या रंगलेखनातून मांडलेले निरीक्षण त्यांच्या चित्रकलाकृतींमध्ये बघायला मिळते. अफाट पसरलेला देखावा आणि रंगसंगती यामुळे त्यांची चित्रे मन मोहून टाकतात. एम. लक्ष्मी नारायण यांची चित्रे ही मानवी मनाच्या अंतरंगातील भावभावना कॅन्व्हासवर प्रकट करताना दिसून येतात.
कुंचल्याचा जादूई वापर करून त्यांनी सध्याच्या तणावपूर्ण जीवनात आध्यात्मिक सावली निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. एम. स्वेता यांची चित्रं स्त्रीत्वाची भावना आणि त्यांचे अंतरंग अलवारपणे कॅन्व्हासवर उतरवणारी आहेत. रंगसंगतीचा संयमी वापर आणि नेत्रसुखद सादरीकरण यामुळे स्वेता यांची चित्रं मनाला भावतात.
विवेकानंद एस. गौडासलामनी यांची चित्रे परंपरागत लोकांची चित्रे डोळ्यांसमोर उभी करतात. सेंद्रिय आणि असेंद्रिय पदार्थाचा कॅन्व्हासवर खुबीने वापर करून त्यांनी अॅक्रिलिक रंगात ही चित्रे साकार केली आहेत. स्टार आर्ट ग्रुपच्या पाच तरुण चित्रकारांनी चित्रांची एक वेगळी दुनिया रसिकांसमोर आणली आहे.
कृपा शहांचे ‘प्रतिबिंब’
मुंबईतील प्रसिद्ध रंगलेखिका कृपा शहा यांच्या ‘प्रतिबिंब’ या चित्रांचे प्रदर्शन काळा घोडा येथील हिरजी जहांगीर आर्ट गॅलरीत १७ ऑगस्टपासून सुरू झाले असून, ते २३ ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे.
कृपा शाह यांनी आपल्या विविध चित्रांत ‘ओम’रूपी निसर्गाचे अमूर्त प्रतिबिंब साकारले आहे. त्यांच्या कलाप्रदर्शनातील कलारूपे मुख्यत्वेकरून निसर्ग व वैश्विक परिवर्तनावर आधारित असून ती सर्व चराचरातील एकता व समभाव या कल्पनेवर गुंफलेली आहेत. ध्यानधारणेतून मानवी मन व पशुपक्षी यांच्या तसेच निसर्गाच्या सान्निध्यातून अनुभवास येणारी वेगवेगळी अनुभूती या संकल्पनेतून त्यांनी आपली अमूर्त शैलीतील चित्रे रेखाटली आहेत.
चित्रातील विविध घटकांमधील परस्पर संबंध, योग्य ती रंगसंगती व पोत याद्वारे साधलेला अपेक्षित दृश्य परिणाम, कला माध्यमावरील व शैलीवरील असणारे त्यांचे प्रभुत्व यामुळे ही चित्रे आकर्षक व मनोवेधक झाली आहेत. एका विशिष्ट दृष्टिकोनातून सादर केलेला हा वैशिष्टय़पूर्ण रम्य कलाविष्कार रसिकांना आगळावेगळा आनंद देणारा आहे.
कृपा शहा यांचे कलाशिक्षण मुंबई विद्यापीठात झाले असून त्यांनी मुंबई, पुणे, बंगलोर, दिल्ली, दुबई, व्हिएतनाम आदी अनेक ठिकाणी अनेक कलादालनांतून आपली चित्रे सादर केली आहेत. त्यांना वुमन लीडर्स इन इंडियाचा २०१४ चा उत्कृष्ट चित्रकार हा पुरस्कार प्राप्त झाला असून, अनेक मान्यवर व कला संग्राहक तसेच कलाप्रवर्तक संस्थांनी त्यांच्या रंगलेखनाची स्तुती केली आहे. सदर प्रदर्शनाचे आयोजन जे. एस. आर्ट गॅलरीचे संचालक सुरज लाहेरू यांनी केले आहे.
अश्विनी बोरसे यांचे ‘अस्तित्व’
कर्जत येथील युवा रंगलेखिका अश्विनी बोरसे यांनी अलीकडे रेखाटलेल्या चित्रकलाकृतींचे प्रदर्शन नरीमन पॉइंट येथील आर्ट वॉक कलादालनात १७ ऑगस्टपासून सुरू झाले असून, ते ३० ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. ‘अस्तित्वा’वर भाष्य करणा-या या कलाकृती कलाप्रेमींना गुंतवून ठेवणा-या आहेत.
‘अस्तित्व’ हा प्रत्येक माणसाच्या सन्मानाचा एक भाग आहे. या अस्तित्वाभोवती ‘मी’पणाचा भाव असतो, अशी सर्वसाधारण समज आहे. पण ज्या क्षणामध्ये हा ‘मी’पणाचा भाव नाहीसा होतो, तेव्हापासूनच माणूस अस्तित्वाशी एकरूप होत असतो. या ‘अस्तित्वा’शी एकरूप होण्याचा अनुभव अश्विनी बोरसे यांनी या रंगलेखनातून अनुभवला असल्याचे जाणवते.
अश्विनी बोरसे या रंगलेखनाविषयी म्हणतात, ‘ज्या प्रमाणे नर्तनात केवळ नृत्यच शिल्लक राहावे व नर्तक दिसेनासा व्हावा, त्याचप्रमाणे चित्र काढताना मी कुठे हरवून जाते हे माझे मलाच कळत नाही.’ हे रंगलेखिकेचे सांगणे म्हणजेच तिचे चित्रांमध्ये हरवून जाणे आणि चित्रांचे अस्तित्व सांगणे होय.
अस्तित्व म्हणजेच सृजनत्व आणि सृजनत्व म्हणजे स्वत:ला हरवून बसणे. अश्विनी रंग व आकारांच्या जगात स्वत:ला हरवून बसलेल्या कलावंत वाटतात. त्यामुळे त्यांच्या या प्रदर्शनाला दिलेले नावही सार्थकी ठरते.
पूर्वी पारेख यांची कृष्णभक्ती!
रंगलेखिका पूर्वी पारेख यांचे ‘क्रिष्णा इन नवरसा’ हे चित्रप्रदर्शन नरिमन पॉइंट येथील कमलनयन बजाज आर्ट गॅलरीमध्ये २४ ऑगस्टपासून सुरू होणार असून, ते २९ ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. पूर्वी पारेख यांनी या प्रदर्शनातील रंगलेखनाद्वारे कृष्णभक्ती उजागर केली आहे. या प्रदर्शनामध्ये श्रीकृष्णाची अनेकविध रूपे सादर केली आहेत.
‘रस’ म्हणजे सर्वत्र प्रवाहित करणे. श्रीकृष्णाने त्याच्या अनेक लीलांमधून जी नवरसांची बरसात केली त्याचं मोहमयी रूप या चित्रांमधून न्याहाळायला मिळते. कुठलाही ‘भाव’ हा या रसांमधूनच प्रकट होत असतो. शृंगार, हास्य, रौद्र, वीर, कारुण्य, बीभत्स, भयानक, अद्भुत आणि शांत असे नऊ रस श्रीकृष्णाच्या लीलांनी अधोरेखित झाले, तेच नऊ रस पूर्वी पारेख यांनी साकारले आहेत.
हे नऊ रस भावभावना आणि मन:स्थिती यांचे यथार्थ दर्शन घडवतात. श्रीकृष्णाच्या नऊ रसांच्या क्रीडा साकार करताना चित्रकर्तीने तैलरंग आणि मिश्र माध्यमांचा वापर केला आहे आणि तो भाव रसिकांपर्यंत पोहोचवला आहे.