बाबा कुष्ठरोग्यांना सामाजिक भूकंप म्हणायचे, कारण त्यांना समाजाने पूर्णपणे झिडकारले होते. महारोगी म्हणजे दलितातील दलित व पीडितातील पीडित माणूस असतो.
मुंबई – बाबा कुष्ठरोग्यांना सामाजिक भूकंप म्हणायचे, कारण त्यांना समाजाने पूर्णपणे झिडकारले होते.
महारोगी म्हणजे दलितातील दलित व पीडितातील पीडित माणूस असतो. त्यांच्याकडे स्वत:चे रेशनकार्ड नसते, आधारकार्ड, इलेक्शन कार्ड नसते व अशा व्यक्तींना समाजच नाही तर सरकार आणि प्रशासनाकडूनसुद्धा नाकारले जाते. अशा नाकारलेल्या व्यक्तींसाठी आनंदवनने जगण्याचा आधार दिला.
म्हणूनच आनंदवन म्हणजे एक स्वेच्छा तुरुंग आहे व मी त्याचा जेलर असल्याचे प्रतिपादन महारोगी सेवा समिती वरोरा आनंदवनाचे सचिव डॉ. विकास बाबा आमटे यांनी मुंबईत केले.
मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्था आयडॉल, संगणकशास्त्र, रसायनशास्त्र आदी विभागाच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठाच्या कलिना संकुलातील मराठी भाषा भवन येथे आयोजित केलेल्या ‘आनंदवन-विश्वातील विश्व, विश्वातीत विश्व’ या विषयावरील परिसंवादात ते बोलत होते. या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या प्रभारी संचालिका डॉ. अंबुजा साळगांवकर होत्या.
बाबा आमटे कुष्ठरोग्यांना समाजात पुन्हा कसे पाठविता येईल याचाच विचार करीत असत, बाबा नेहमी या आनंदवनला प्रेमाचे अभयारण्य म्हणायचे. १९३७ सालापासून बाबांची महारोग्यांची सेवा करण्याची प्रयोगशाळा सुरू झाली. तसेच त्यांनी सफाई कामगारांसाठीही कार्य केले, ते भंगीकामही करायचे. यामुळे आम्हाला कोणी नातेवाईक नव्हते, मित्र नव्हते. महारोगी हेच आमचे मित्र व नातेवाईक होते. समाजाने आम्हाला नाकारले होते.
२५ वर्षे नातेवाईकांना बघितलेही नव्हते. आनंदवनासाठी मदतनिधी मागताना अनेक ठिकाणी अपमान झाला. लोक इतरांसाठी मदत करतील, पण महारोगी असे नाव सांगितल्यावर मदत देणे नाकारतात. ठाणे जिल्ह्याचा कुष्ठरोगात प्रथम क्रमांक आहे. ठाणे व चंद्रपूर जिल्ह्यातील दररोज ३ ते ४ कुष्ठरोगी आनंदवनात भरती होतात. सरकारने लेप्रसी विभाग बंद केला असून तो इतर विभागात मर्ज केला आहे.
आनंदवन ही एक प्रयोगशाळा आहे. आजपर्यंत ६५ वर्षात कुष्ठरोगी व दलित, पीडित अशा २३ लाख लोकांना साह्य केले आहे. त्यांच्या सहकार्याने अंधशाळा, अपंगशाळा असे २८ प्रकल्प आनंदवनने सुरू केले असल्याची माहितीही आमटे यांनी दिली.
आमटे पुढे म्हणाले की, आनंदवनच्या उपक्रमाला सरकारचे साह्य झाले नाही. पण सरकारने वेळोवेळी कर मात्र लावला आहे. ज्या वेळी सरकारने गॅसची सबसिडी बंद केली, त्या वेळी एका रात्रीत आनंदवनची आर्थिक गणिते बदलली. कारण आनंदवनात एकच रेशनकार्ड आहे. त्यामुळे सबसिडीचे गॅस बंद झाले.
परंतु समाजातील अनेक लोकांनी याला मदत केली व आनंदवनात सर्वात मोठा सार्वजनिक बायोगॅस प्रकल्प सुरू झाला. आज आनंदवन एक एलपीजीविरहित गाव तयार झाले असल्याचे सांगत आमटे यांनी आपल्या जीवनातील अनेक प्रसंग या वेळी सांगितले.