साधू-संतांच्या विचारांची परंपरा व शाहू-फुले-आंबेडकरांसारख्या समाजसुधारकांचा वारसा असलेल्या महाराष्ट्रात रखडलेले जादूटोणाविरोधी विधेयक अखेर शुक्रवारी मंजूर झाले. मागील अनेक वर्षे हे विधेयक मंजूर व्हावे, यासाठी नरेंद्र दाभोलकर व शाम मानव प्रयत्नशील होते. महाराष्ट्राचे पुरोगामित्व सिद्ध करणा-या या विधेयकाला खरे तर कुणीही विरोध करण्याचे कारण नव्हते.
साधू-संतांच्या विचारांची परंपरा व शाहू-फुले-आंबेडकरांसारख्या समाजसुधारकांचा वारसा असलेल्या महाराष्ट्रात रखडलेले जादूटोणाविरोधी विधेयक अखेर शुक्रवारी मंजूर झाले. मागील अनेक वर्षे हे विधेयक मंजूर व्हावे, यासाठी नरेंद्र दाभोलकर व शाम मानव प्रयत्नशील होते. महाराष्ट्राचे पुरोगामित्व सिद्ध करणा-या या विधेयकाला खरे तर कुणीही विरोध करण्याचे कारण नव्हते. मात्र सर्व धर्मीयांसाठी असलेल्या या विधेयकाबाबत वारक-यांच्या मनात संशय निर्माण करण्यात काही शक्ती यशस्वी झाल्या होत्या.
हे विधेयक केवळ हिंदूसाठीच असून त्यामुळे वारक-यांच्या परंपरांवर गदा येणार असल्याचे सांगत वारक-यांत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होता. इतके नव्हे तर त्यांना पुढे करून मोर्चे व आंदोलनेही करण्याचा प्रयत्न झाला. मात्र वारक-यांचा बुरखा घालून वावरणा-यांना उघडे पाडण्याचे काम युवा कीर्तनकार अक्षय भोसले व तुकाराम महाराज सांगळे यांनी केले होते. त्याचबरोबर वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी सर्व फडकरी व दिंडीकरी संघटनांच्या प्रतिनिधींत असलेला गैरसमज दूर केला. इतकेचं नव्हे तर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील, सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांच्याशी वारक-यांशी चर्चा घडवून आणली.
वारक-यांच्या ज्या विधी-विधानांना या कायद्याची अडचण येणार नाही, अशी स्वतंत्र संरक्षक सूची कायद्यात समाविष्ट करण्यात आली. या सूचित स्पष्टपणे वारक-यांच्या परंपरा, धार्मिक परंपरा, यात्रांमध्ये केलेले धार्मिक विधी कायद्यातून वगळल्याचे स्पष्ट करण्यात आले. जादूटोणाविरोधी कायदा मंजूर व्हावा, यासाठी गेली अनेक वर्षे प्रयत्न करणारे नरेंद्र दाभोलकर यांची ऑगस्टमध्ये हत्या झाली. खरे तर हे विधेयक पावसाळी अधिवेशनातच आणण्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे प्रयत्न होते. मात्र त्याच दरम्यान पंढरपूरच्या दिशेने सर्व संतांचे पालखी सोहळे निघाले होते.
त्या वेळी वारक-यांत घुसून काही मंडळी काही तरी वेगळे रूप देऊ शकतात, असे वाटल्याने त्या वेळी विधेयक विधिमंडळात येऊ शकले नव्हते. हिवाळी अधिवेशनात हे विधेयक आणण्याचे सरकारचे नियोजन होते. पावसाळी अधिवेशनानंतर ऑगस्टमध्ये डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची पुणे येथे हत्या झाली. त्यानंतर सरकारने तातडीने जादूटोणाविरोधी अध्यादेश जारी केला. हा कायदा होणारच, असे निश्चित झाल्यानंतर वारक-यांना पुढे करून या कायद्याविरोधात वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न झाला होता. हा कायदा करत असताना सर्वाची सहमती मिळवण्याचा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न होता. शिवसेना-भाजप या हिंदुत्त्ववादी संघटनांचा विरोध नाहीसा व्हावा यासाठी, मुख्यमत्र्यांनी गटनेत्यांची बैठक बोलावली होती. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख, संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील, सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे या सर्वानीच मनावर घेऊन अनेक बैठक घेतल्या. त्यात कोणत्याही संप्रदायाला अडचण येणार नाही, त्यासाठी काही संरक्षक सूची समाविष्ट करण्याचेही निष्टिद्धr(155)त करण्यात आले.
महाराष्ट्राच्या पुरोगामित्त्वाच्या इतिहासात आणखीन एक मानाचा तुरा खोवला जावा यासाठी, हे विधेयक सर्वानुमते मंजूर करण्याचे ठरले. विरोधकही सुधारणानंतर हे विधेयक एकमताने मंजूर करण्यास तयार झाले. बुधवारी हे विधेयक विधानसभेत मांडण्यात आले त्यावर चर्चाही सुरू झाली. आता गुरुवारी चर्चा संपून विधेयक मंजूर होईल, असे वाटत असतानाच विदर्भाच्या प्रश्नांवरील चर्चेला उशिर झाल्यानंतर गुरुवारी चर्चा होऊ शकली नाही. तेव्हा हे विधेयक पुन्हा रखडते की काय, असे वाटत असताना शुक्रवारी हे विधेयक पुन्हा चर्चेसाठी आले.
प्रश्नोत्तरानंतर लगेच चर्चा सुरू झाली. विरोधी बाकांवरून काहीसा विरोधाचा सूर असला तरी त्याची धार काही तेवढी नव्हती. मात्र काँग्रेसचे राहुल बोंद्रे यांनी तुकाराम महाराज यांच्याविषयी वादग्रस्त विधाने केल्याने सभागृहातील वातावरण काही काळ तणावपूर्ण झाले होते. त्यातच उपाध्यक्ष वसंत पुरके यांनी चर्चा थांबवून विधेयक मंजुरीसाठी मतास टाकले. त्यामुळे काही काळ सभागृहात गोंधळ झाला होता. कायद्यातील सुधारणा सूचवताच विरोधकांचा विरोध मावळला. या विधेयकावरील संपूर्ण चर्चेच्या काळात दाभोलकर यांची दोन्ही मुले मुक्ता आणि हमीद प्रेक्षक गॅलरीत होते. विधेयक मंजूर झाले तेव्हा त्यांच्यासह या विधेयकासाठी प्रयत्न करणा-या प्रत्येकाला नक्कीच वाटले असेल-
कृत कृत्य झालो।
इच्छा केली ते पावलो।