आमीर खान त्याच्या कामाप्रती प्रामाणिक आहे. प्रत्येक काम चांगलं व्हावं, यासाठी त्याचे मनापासून प्रयत्न असतात. चित्रपटातील भूमिका आवडली, तर काही वेळा तो त्यासाठी पैसेही आकारत नाही. अशीच बातमी आहे, ‘पीके’संदर्भातली!
या चित्रपटासाठी आमीरने एक पैसाही घेतलेला नाही, असं म्हणणं आहे, या चित्रपटाचा निर्माता विधुविनोद चोप्राचं! आणि त्यामुळेच या चित्रपटाचं प्रमोशन आणि चित्रपट बनवताना आपल्यावर भार पडलेला नाही. आमीरच्या या वृत्तीमुळे विधुविनोद इतका भारावला आहे की, त्याने सगळय़ाच अभिनेत्यांना त्यांचं मानधन कमी करण्याविषयी सल्ला द्यायला सुरुवात केली आहे.
विधू म्हणतो, ‘सगळय़ाच अभिनेत्यांनी त्यांचं मानधन कमी करायला हवं. सगळेच खूप पैसे घेतात. अभिनेत्यांच्या या भरभक्कम मानधनामुळे चित्रपट बनवण्यासाठी पैसेच उरत नाहीत. मात्र या सगळय़ांनी मानधन कमी केलं तर चांगला चित्रपट बनवता येईल.’ आपला हा संदेश त्या सगळय़ांसाठी आहे, जे मोठमोठय़ा गाड्या, फार्महाउस आणि आपला माल जेथे जेथे नेतात, त्या सगळय़ांसाठी आहे.’ ‘त्यांनी हे सगळं बंद करावं,’ असा सल्लाही द्यायला विधुविनोद विसरलेला नाहीय.
‘१०० कोटींचा क्लब बनवण्यापेक्षा चांगला चित्रपट बनवा,’ असं मत त्याचं आहे. आमीर चित्रपटाचं मानधन घेत नाही. चित्रपट चालला आणि काही फायदा झाला तरच त्यातून काही रक्कम घेतो; अन्यथा काहीही घेत नाही, असं विधुविनोद सांगतो.