येत्या काही काळात अंधेरी, वडाळा, ताडदेव आरटीओत एकूण २२ नवीन निरीक्षक रुजू होणार आहेत.
मुंबई – येत्या काही काळात अंधेरी, वडाळा, ताडदेव आरटीओत एकूण २२ नवीन निरीक्षक रुजू होणार आहेत. सध्या मुंबई व उपनगरातील प्रादेशिक परिवहन व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात अपु-या कर्मचारी संख्येमुळे वारंवार आरटीओच्या पाय-या झिजवाव्या लागतात.
दुचाकी व चारचाकीचे नोंदणी प्रमाणपत्र (आरसी बुक) तसेच परवाना नूतणीकरणासाठी सध्या दीड ते दोन महिन्यांची प्रतीक्षा वाहनचालकांना करावी लागते. मात्र आता नव्याने निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली असल्याने आरसीबुकच्या कामाला वेग मिळणार असल्याचे बोलले जात आहे.
दुचाकी व चारचाकी वाहनांचा परवाना नूतनीकरणासाठी व वाहन नोंदणीसाठी दिवसाला जवळपास ४०० अर्ज येतात. त्यातच गेल्या सहा महिन्यांपासून स्मार्ट कार्ड पुरवणा-या कंत्राटदाराचे कंत्राटही रद्द करण्यात आले आहे.
त्यामुळे वाहन विकत घेऊन एक ते दोन महिने उलटूनही साध्या पावतीवर चालकांना काम चालवावे लागत आहे. याशिवाय वाहन नोंदणी प्रमाणपत्रासाठी ३० ते ४५ दिवसांची अतिरिक्त प्रतीक्षा करावी लागत असल्याने आरटीओच्या कारभाराविषयी रोष व्यक्त केला जात आहे.
याआधी स्मार्टकार्डमध्ये बसवण्यात आलेली चीप ही २ एमबींमध्ये असल्याने त्यांची तपासणी करणे अशक्य होते. त्यामुळे कंत्राटदाराचे कंत्राट तत्कालिन आयुक्त महेश झगडे यांनी त्वरित रद्द केले. यामुळे नव्याने नोंदणी केलेल्या चालकांना मिळणारे स्मार्टकार्ड मिळणे बंद झाले.
त्यानंतर कागदी नोंदणी प्रमाणपत्र देण्याचे आरटीओने सुरू केले. मात्र या कालावधीत बराच काळ लोटल्याने २० ते २५ हजार नोंदणी प्रमाणपत्रकांचा गठ्ठा साठत गेल्याची माहिती समोर आली आहे. यात ताडदेव, अंधेरी, बोरिवली, वडाळा या आरटीओत कर्मचारयांची संख्या अपुरी असल्याने यात आणखीनच भर पडत आहे.
सध्या परिवहन आयुक्त कार्यालयासह शहरातील आरटीओत सुमारे २८० पदे रिक्त आहेत. यात ताडदेव आरटीओत ९१, वडाळा आरटीओत-५१, अंधेरी आरटीओत-८७, बोरिवली आरटीओत-२५ आणि परिवहन कार्यालयात ७४ पदांसाठी जागा रिक्त आहेत.
त्यामुळे नोंदणी प्रमाणपत्रक आणि परवाना नुतणीकरणाच्या कामाला कासवगती लाभली आहे. मात्र येत्या काही दिवसांत २२ निरीक्षक येणार असल्याने आरटीओच्या कामाला गती मिळून साठलेले आरटीओच्या कामाला गती मिळण्यास मदत होणार आहे.