‘‘राज्यातील आरोग्याच्या प्रश्नासंदर्भात परिपूर्ण सुनियोजित आराखडा महाराष्ट्राने तयार केला आहे.
मुंबई – ‘‘राज्यातील आरोग्याच्या प्रश्नासंदर्भात परिपूर्ण सुनियोजित आराखडा महाराष्ट्राने तयार केला आहे. त्या माध्यमातून जेथे आरोग्याची सुविधा नाही, तेथे आरोग्याची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे,‘‘ असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
केंद्र सरकारच्या ‘राष्ट्रीय बालआरोग्य योजने’चे उद्घाटन बुधवारी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या हस्ते पालघर येथे झाले. त्या वेळी मुख्यमंत्र्यांनी आरोग्यविषयक राज्याच्या योजनेची माहिती दिली. देशातील अनेक योजनांची सुरुवात महाराष्ट्रातून होत आहे, ही अभिमानाची बाब आहे. यापूर्वी ‘रोजगार हमी योजने’ला राष्ट्रीय स्तरावर ‘महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने’चा दर्जा मिळाला. आधारकार्डची सुरुवात नंदुरबारच्या आदिवासी भागातून झाली. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेची सुरुवातही महाराष्ट्रातून झाली. महाराष्ट्रातील सर्व लोकप्रतिनिधींनीही राष्ट्रीय कार्यक्रम गावागावापर्यंत पोहोचवावा, असे आवाहन त्यांनी केले.
बालकांच्या आरोग्याबाबत सा-या जगाला चिंता आहे. भारतही त्यात मागे नाही. दरवर्षी दोन कोटी ७० लाख बालके जन्माला येतात त्यांचे आरोग्य चांगले असणे ही काळाची गरज आहे. केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने देशातील प्रत्येक नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी विविध योजना राबवल्या. त्याचे सकारात्मक परिणाम आता दिसू लागले आहेत. प्रत्येकाचे आरोग्य चांगले राहावे यासाठी केंद्र सरकार निधी पडू देणार नाही.- गुलाम नबी आझाद, केंद्रीय आरोग्यमंत्री
‘आशा वर्कस’चे मानधन बँकेत
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशनच्या अखत्यारित राज्यातल्या ग्रामीण भागात काम करणा-या ‘आशा वर्कर्स’चेमानधन आता थेट बँकेत जमा होणार आहे. या मोहिमेची सुरुवात बुधवारी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या हस्ते झाली. सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत राज्यात पाच हजार आशा वर्कर्स आहेत. त्यांना प्रत्येक महिन्याला अडीच हजार रुपये मानधन दिले जाते. पूर्वी हे मानधन त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रातून थेट दिले जायचे. मात्र आता यापुढे हे मानधन थेट बँकेत जमा होणार आहे. ही मोहिम आधारकार्डशी संलग्न राबवण्यात येणार आहे.