साधारणपणे पावसाळा संपला की सुगीच्या दिवसांची नांदी होते, हा नियम निसर्गाला लागू होतो तसाच करमणूकविश्वालाही. कारण या क्षेत्रातही या काळात बहराचे दिवस सुरू होतात. सप्टेंबरपासून छोटया पडद्यावर यावेळी अनेक मालिका प्रेक्षकांच्या समोर येत असतात. यंदाही या दिवसांमध्ये मिळणारा जाहिरातींचा अधिकाधिक महसूल आपल्याकडे यावा, यासाठी सगळ्याच वाहिन्या नव्या मालिका आणायला सज्ज झाल्या आहेत. सोनीवरील ‘कौन बनेगा करोडपती’, ‘कलर्स’वरील ‘२४’ आणि ‘बिग बॉस’, झी वाहिनीवरील ‘बुद्धा’ आणि ‘स्टार प्लस’वरील ‘महाभारत’ ही काही उदाहरणं. या सगळ्याच मालिका भव्यदिव्य असल्याने मनोरंजनाचं बंपर पीक येणार आहे. काय असणार आहे या महामालिकांत?
भारतीय टीव्ही उद्योगाच्या इतिहासातला सगळ्यात यशस्वी कार्यक्रम म्हणून ज्याची गणना केली जाते, त्या ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमाचं सातवं सत्र सुरूझालं आहे. अत्यंत वैशिष्टयपूर्ण असं हे सत्र असून त्यात पारितोषिकाची रक्कम वाढवण्यात आली आहे. आता ‘कौन बनेगा करोडपती’तील सर्व प्रश्नांची उत्तरं देणा-या स्पर्धकाला तब्बल सात कोटी रुपये मिळणार आहेत. या सत्रात स्पर्धकाला पाच ‘लाइफ लाइन’चा वापर करता येणार आहे. ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमाच्या आजवरच्या लोकप्रियतेचा विचार करता आताशा ही मालिका पुन्हा एकदा भारतीय टीव्ही जगतात एक नवा इतिहास रचण्यासाठी सज्ज झाली आहे. ‘सीखना बंद तो जितना बंद’ ही केबीसीची कॅचलाइन आहे. माणसानं सतत शिकत राहिलं पाहिजे, असा संदेशही यानिमित्ताने देण्यात येणार आहे. या शोमध्ये नेहमीप्रमाणेच एकूण पंधरा प्रश्न विचारण्यात येणार आहेत. शिवाय ‘सप्त कोटी संदूक’ नावाच्या नव्या खेळाचाही समावेश करण्यात आला आहे. यात केवळ चार प्रश्नांनंतर एक कोटीपासून ते सात कोटी रुपयांपर्यंत पोहोचता येणार आहे. ‘तज्ज्ञांचा सल्ला’ या जीवनदायिनीऐवजी आता ‘अलटपलट’ अशी नवी जीवनदायिनी आली असून ‘पॉवर पप्लू’मध्ये आपली एक लाइफलाइन जिवंत करता येणार आहे. ‘फास्टेस्ट फिंगर फर्स्ट’ आणि ‘हॉट सीट’वर बसलेल्या स्पर्धकांमध्ये एक नवी खेळीही ठेवण्यात आली आहे. त्याचा वापर करून अशा स्पर्धकांना किमान एक लाख रुपये जिंकण्याची संधी देण्यात आली आहे. ‘केबीसी’च्या इतर सत्राप्रमाणे या सत्राचीही निर्मिती सिद्धार्थ बासू यांच्या ‘सिनर्जी’ या कंपनीने केली असून भारतीय टीव्हीच्या जगतातली ती एक महागडी मालिका असणार आहे. या मालिकेचा प्रत्येक भाग प्रेक्षकांना नवा आनंद देऊन जाईल, असा विश्वास ‘सोनी’चे प्रमुख एन. पी. सिंग यांनी व्यक्त केला आहे.
स्टार प्रवाहही सज्ज
हे दिवस एकंदरीत सर्वच व्यवसायांसाठी सुगीचे दिवस घेऊन येतात. याच काळात आपल्या वाहिनीच्या कार्यक्रमांची पुनर्रचना करून अधिकाधिक प्रेक्षकवर्ग आपल्याकडे कसा येईल, याचा विचार वाहिनीकडून होत असतो. मी जेव्हा ‘स्टार प्रवाह’ची जबाबदारी स्वीकारली तेव्हा मला एक गोष्ट जाणवली की, आमच्या वाहिनीवरील ज्या काल्पनिक मालिका आहेत त्या चांगल्या चालल्या आहेत. मात्र त्यातला जो रिअॅलिटी शोचा जॉनर आहे तो आमच्याकडे कमी आहे. त्यामुळे त्याच धर्तीवर आम्ही काम सुरू केलं. लहान मुलांसाठी डान्स रिअॅलिटी शो करायचा, हे आमच्या मनात सुरुवातीपासूनच पक्क होतं. मात्र हा शो भव्य स्वरूपात करायचं, असं आम्ही ठरवलं. या शोसाठी आम्ही संपूर्ण राज्यात ऑडिशन्स घेतल्या. हा एकमेव असा डान्स शो आहे, ज्यात एकाच वेळेस एकटयाने, डयुएट व ग्रुप डान्स करण्यात येणार आहे. या मालिकेसाठी या इंडस्ट्रीतले बडे नृत्य दिग्दर्शक परीक्षक म्हणून घेण्यात आले आहेत. या मालिकेच्या माध्यमातून अमृता खानविलकर पहिल्यांदाच परीक्षकाची भूमिका करणार आहे. – जयेश पाटील (क्रिएटिव्ह प्रमुख, स्टार प्रवाह)
‘झी टीव्ही’वर ‘बुद्धा’
‘रामायण’, ‘महाभारत’ या मालिकांनी भारतीय टीव्ही उद्योगात इतिहास घडवला आहे. हीच परंपरा पुढे चालवणारी ‘बुद्धा’ ही मालिका ‘झी वाहिनी’वर सुरूहोत आहे. भारतात जन्मलेल्या गौतम बुद्धांवर तयार झालेली व प्रसारित करण्यात आलेली ही पहिलीच मालिका आहे. या मालिकेत गौतम बुद्धाच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू, प्रसंग दाखवण्यात आले आहेत. बी. के. मोदी यांनी या मालिकेची निर्मिती केली असून या मालिकेत अत्यंत आधुनिक असे थ्री-डी स्पेशल इफेक्ट्स वापरण्यात आले आहेत. कबीर बेदी या मालिकेत एका महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. भारतीय टीव्ही उद्योगातली सर्वाधिक खर्चिक अशी ही पौराणिक मालिका केवळ भारतातच नव्हे तर जगभरात दाखवण्यात येणार आहे. बौद्ध धर्माचा प्रसार झालेल्या देशांमध्ये ही मालिका तिथल्या स्थानिक भाषांत प्रसारित करण्यात येणार आहे. अनेक मोठे कलाकार असलेल्या या मालिकेत गौतम बुद्धाच्या जन्मापासून ते निर्वाणापर्यंतचा प्रवास दाखवण्यात येणार आहे. आठ सप्टेंबरपासून सुरू होणारी ही मालिका दर रविवारी सकाळी अकरा वाजता पाहता येईल.
कलर्सवर ‘२४’
‘२४’ नावाची विदेशी टीव्हीवरची मालिका खूप लोकप्रिय आहे. कोणत्याही गुन्ह्यांचा छडा चोवीस तासांत कसा लावला जातो, हे या मालिकेतून दाखवलं जातं. गुन्ह्यांचा शोध घेताना पडद्यावर एक घडयाळ प्रेक्षकांना सतत दिसत असतं. त्याच्या साक्षीनं मालिकेतलं नाटय अधिक प्रभावी पद्धतीनं प्रेक्षकांच्या समोर येत असतं. ही मालिका आतापर्यंत जगातल्या विविध वाहिन्यांवर आली आणि सगळ्या देशांत लोकप्रिय ठरली.
या मालिकेचा हिंदी अवतार लवकरच ‘कलर्स’ या वाहिनीवर सुरू होत आहे. अनिल कपूर या मालिकेचा निर्माता असून मालिकेचं दिग्दर्शन अभिनय देव करत आहे. या मालिकेच्या पहिल्या भागात पंतप्रधानपदाच्या निवडणुकीत असलेल्या एका उमेदवाराच्या हत्येचा कट दहशतवादविरोधी पथक कसा उधळून लावतं, हे पाहायला मिळणार आहे. या मालिकेच्या माध्यमातून अनिल कपूर पहिल्यांदाच छोटय़ा पडद्यावर पदार्पण करणार आहे. या मालिकेच एकूण स्वरूप पाहता प्रत्येक भाग म्हणजे जणू एक एक चित्रपट असेल, असं म्हटलं जातंय.
‘स्टार प्लस’वर महाभारत
बी. आर. चोप्रा यांची ‘महाभारत’ ही मालिका सुरू झाली होती, तेव्हा त्यासाठी अनेकांनी रंगीत टीव्ही संच विकत घेतले होते. याच नावाची महामालिका १६ सप्टेंबरपासून ‘स्टार प्लस’वर सुरू होत आहे. या मालिकेची निर्मिती सिद्धार्थकुमार तिवारी यांनी केली आहे. या मालिकेसाठी अतिशय भव्य सेटची उभारणी करण्यात आली आहे. उमरगाव इथे दहा एकर जागेवर हा भव्य सेट उभारण्यात आला आहे. आतापर्यंतचा हा सर्वात महागडा सेट असून कलादिग्दर्शक ओमंग कुमार यांनी तो उभारला आहे, तर बाह्यचित्रीकरण काश्मीर, जैसलमेर, जयपूर, बेडाघाट व अहमदाबाद इथल्या भव्य महालात करण्यात आली आहे. विलक्षण साहसदृश्ये व सर्वच आधुनिक साधनसामग्रींचा वापर या मालिकेसाठी करण्यात आला आहे.
केवळ कंप्युटर ग्राफिक्सच नव्हे, सगळ्याच बाबतीतली भव्य-दिव्य निर्मिती हे या मालिकेचं वैशिष्टय आहे. एखाद्या चित्रपटाप्रमाणे तिची निर्मिती करण्यात आली आहे. रेड कॅमे-याने चित्रित करण्यात आलेल्या या मालिकेच्या क्रिएटिव्ह टीममध्ये एकूण साडेसहाशे लोकांचा समावेश आहे. व्हिज्युअल इफेक्ट्स आणि थ्री-डी रूपांतरण तंत्राने तयार करण्यात आलेली ही भारतीय मालिकेच्या इतिहासातली सर्वाधिक भव्य मालिका ठरणार, यात शंका नाही.