गेल्या काही वर्षाच्या तुलनेत यंदा इकोफ्रेंडली गणेशमूर्तीच्या संख्येत वाढ झालेली दिसून येते. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणा-या भक्तांमध्ये वाढ होत आहे हे निश्चित.
गेल्या काही वर्षाच्या तुलनेत यंदा इकोफ्रेंडली गणेशमूर्तीच्या संख्येत वाढ झालेली दिसून येते. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणा-या भक्तांमध्ये वाढ होत आहे हे निश्चित. मात्र पर्यावरणपूरक गणेशोत्सवाबाबत समाजात प्रबोधन होणे आवश्यक आहे?. इकोफ्रेंडली गणपतीमुळे खरोखरच पर्यावरणाचा समतोल राखला जाऊ शकतो? इकोफ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्यासाठी केवळ गणेशभक्तांनीच पुढाकार घ्यावा का? इकोफ्रेंडली गणपतीमुळे जलप्रदूषण रोखण्यास मदत होईल? राज्य सरकार तसेच मुंबई महापालिकेने पुढाकार घेत इकोफ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्यासाठी जनजागृती मोहिमेची तीव्रता वाढवली पाहिजे?
काळाची गरज ओळखा
इकोफ्रेंडली गणपती मूर्तीच्या वाढत्या मागणीने आशादायी चित्र निर्माण झाले आहे. वाढत्या जलप्रदूषणामुळे जलचरांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला. दिवसेंदिवस प्रदूषणाचा विळखा वाढत असताना आता पर्यावरणपूरक गणपती महोत्सव साजरा करण्यासाठी पुढाकार घेतला जात आहे, हे निश्चितच आशादायी चित्र आहे. अर्थात हे चित्र बदलले. कारण प्रदूषणामुळे होणा-या दुष्परिणामांचे चटके बसायला सुरुवात झाल्याने. तशी प्रांजळ कबुलीच वाचकांनी दिली. धार्मिक श्रद्धेच्या नावाखाली निसर्गाचा खेळ नको. गणेशभक्तांमध्ये पर्यावरणपूरक गणेशमूर्तीचे महत्त्व पटू लागले आहे. बदल हा मुंगीच्या वेगाने घडतो, त्यामुळे पर्यावरणपूरक गणपतींची संख्या वाढण्यास थोडा अजून काळ लागेल, असेही वाचकांचे म्हणणे आहे. ही संख्या उत्तरोत्तर वाढत जावी, यासाठी सरकार तसेच महापालिकेने पुढाकार घेणे आवश्यक आहे. वेगवेगळे सामाजिक उपक्रम, स्पर्धा राबवून पर्यावरणपूरक गणपती मूर्तीची संख्या नक्कीच वाढेल, असा विश्वासही वाचकांनी व्यक्त केला.
पर्यावरणावर प्रबोधन हवे!
पर्यावरणाचे महत्त्व लोकांना उमजू लागल्याने इकोफ्रेंडली गणेशमूर्तीच्या संख्येत वाढ होत आहे. माणसांनीच पर्यावरणाची वाट लावली आहे. याचा प्रत्यय पुण्यातील माळीण, उत्तराखंडमधील परिस्थिती! इकोफ्रेंडली गणपतीमुळे पर्यावरणाचा समतोल राहील यासाठी सर्वानीच खारीचा वाटा उचलणे गरजेचे आहे. गणेशभक्तांनीच जास्त पुढाकार घेऊन इकोफ्रेंडली गणपतीमुळे पाणी दूषित होत नाही, यासाठी प्रयत्न करावे. महापालिकेने चालू केलेल्या इकोफ्रेंडली यंत्रणेला मनापासून मदत करावी. यासाठी सामाजिक मंडळाने हातभार लावावा व पर्यावरणाचे रक्षण करावे!- सुभाष वाघवणकर, जोगेश्वरी
उत्तरोत्तर इकोफ्रेंडली गणपतींची संख्या वाढो
कागदाच्या लगद्यापासून गणपतीच्या सुंदर मूर्ती बनविल्या जातात. पाण्यात अगदी सहजपणे विरघळल्या जाणा-या या मूर्तीना रंगविण्यासाठी नैसर्गिक रंगांचा वापर केला जातो. परंतु इकोफ्रेंडली रंग हे मोठय़ा प्रमाणावर उपलब्ध होत नसल्यामुळे मूर्त्यांमधील आकर्षणावर मर्यादा येते. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणा-या भक्तांमध्ये वाढ होत आहे, कारण ती आता काळाची गरज झाली आहे. प्रदूषण कमी करायचे असेल तर श्रद्धा डोळस ठेवायला हवी. प्रदूषणमुक्तीच्या दिशेने पडलेले हे एक सकारात्मक पाऊल आहे. इकोफ्रेंडली गणपती तयार करताना कागद, टिश्यूपेपर, माती, वॉटरकलर, भाज्यांपासून तयार केलेले रंग, डिंकापासून बनविलेला गम, कापड इत्यादी साहित्य लागते. नैसर्गिक रंग वापरून मूर्ती साकारण्याच्या कार्यशाळा शाळांमध्ये सुरू झाल्या असून, स्वत: मूर्ती घडवण्यांमध्ये बालगोपाळही पुढाकार घेत आहेत. गणेशभक्तांबरोबरच राज्य सरकार व महापालिकेनेही इकोफ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पुढाकार घेऊन जनजागृती केली पाहिजे. त्यासाठी समाजात प्रबोधन होणे आवश्यक आहे.– पुष्पा ढवळे, नवीन पनवेल
पर्यावरणपूरक गणेशोत्सवच साजरा व्हावा
पर्यावरणपूरक गणेशोत्सवांच्या संख्येत झालेली व अजूनही सातत्याने होत असलेली वाढ लक्षात घेता एकूण चित्र निश्चितच आशादायी आहे. सुधारणा या नेहमी मुंगीच्याच पावलांनी होत असतात! विशेष म्हणजे अशा प्रकारच्या नावीन्यपूर्ण गणेशोत्सवासाठी आग्रही असणा-या गणेश भक्तांच्या संख्येतही लक्षणीय वाढ झालेली आढळते. जनसामान्यही या बदलाचे मनापासून स्वागत करीत आहेत. याचे कारण म्हणजे पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या दृष्टीने सर्वाकष, सर्वागीण आणि व्यापक प्रयत्नांमध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सवांनी फार मोठे मोलाचे सक्रिय योगदान दिले आहे. गणेशमूर्ती तयार करण्यापासून ते विसर्जनापर्यंत जी काही सामग्री वापरली जाते, त्यात विविध प्रकारची घातक द्रव्ये वापरली जात असल्याने मूर्तीच्या विसर्जनांनी फार मोठय़ा प्रमाणात जलप्रदूषण होते. परिणामत: मासे हे प्रामुख्याने तडफडून मृत झालेले आढळून येतात. म्हणूनच अजूनही फार मोठय़ा पल्ला गाठावयाचा असल्याने आणि त्यासाठी प्रखर, प्रभावी व उत्स्फूर्त प्रबोधनाची नितांत गरज आहे.- मधुकर ताटके, गोरेगाव
पर्यावरणाची हानी टाळू या
भारत हा भक्तिप्रधान देश. श्री गणेश हे अवघ्या महाराष्ट्राचे लाडके आराध्य दैवत. त्याच्या आगमनाच्या आनंदात आपल्या हातून काही विपरीत घडणार नाही याची काळजी घेणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. इकोफ्रेंडली गणेशमूर्तीची चळवळ ही गणेशोत्सवाचे पावित्र्य जपणार आहे. गणेशोत्सवात प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीमुळे प्रदूषणाची समस्या निर्माण झाली आहे. इकोफ्रेंडली गणेशमूर्तीचे प्रमाण वाढल्यास प्रदूषणाचे प्रमाण निश्चितच कमी होण्यास मदत होईल. पर्यावरणाची हानी टाळून आज काही तरुण मंडळी पर्यावरणाचे जतन करण्यासाठी आपले तन-मन अर्पण करून कार्य करत आहेत. इकोफ्रेंडली गणेशमूर्ती ही काळाची गरज आहे, परंतु आर्थिक अडचणींमुळे जर या मूर्ती कमी प्रमाणात येत असतील तर ही कमतरता सरकारने भरून काढली तर मोलाची ठरेल.- कमलाकर जाधव, बोरिवली
संपूर्ण समाजाचा सहभाग हवा
आज जगाला विविध प्रकारच्या प्रदूषणांनी ग्रासले आहे. खरे तर त्याला आपणच जबाबदार आहोत. निसर्गातील बदलांमुळे मानवाच्या आक्रमणामुळे पावसाचे वेळापत्रक बदलल्याचे दिसून येत आहे. त्यातही समुद्राचे निळाशार खारे पाणी कधी कडू, गडद काळ्या रंगाचे होऊन बसले कळलेच नाही. महोत्सवाच्या नावाने पर्यावरणाची हेळसांड होत आहे. बाप्पांची मूर्ती शाडूचीच असावी, या शास्त्राला गणेशोत्सव मंडळांनी तिलांजली दिली आहे. त्यामुळे पर्यावरणावर विपरित परिणाम होतोय, हे त्यांच्या गावीही नाही. अशा नकारात्मक वातावरणातही ‘इकोफ्रेंडली’ गणेशोत्सव साजरा करण्यावर जी आशावादी मंडळे व कार्यकर्ते ठाम आहेत त्यांच्यामुळे आशेचा किरण दिसून आला आहे. गणेशाची आरासही थर्माकोलऐवजी पानाफुलांची व कागद या माध्यमातून साकारली तर प्रदूषणाला आळा बसेल. पर्यावरणपूरक गणेशोत्सव जास्तीत जास्त मंडळांनी साजरा करावा. त्यासाठी स्पर्धेचे आयोजन करावे. बक्षिसांच्या आमिषाने पर्यावरणपूरक गणपती बनवण्यासाठी स्पर्धा रंगेल. पर्यायी पर्यावरणपूरक गणपतीचा हेतू साध्य होईल. मंडळांनी गणेशमूर्तीच्या उंचीचा अट्टहास धरू नये. शाडूच्या मातीपासून, कागदाच्या लगद्यापासून मूर्ती वा फायबरच्या माध्यमातून मूर्ती साकारली जावी. गणेश हे बुद्धीचे दैवत आहे. बुद्धी गहाण टाकून देवाधीन होणे हे बाप्पालाच मान्य होणार नाही. हे गणेशभक्तांनी लक्षात घ्यावे.- दीपक अक्षेकर, माहीम
समाजप्रबोधनाची आवश्यकता
इकोफ्रेंडली या शब्दाचा अर्थच अनेकांना माहीत नाही. प्लॅस्टर ऑफ पॅरिस, थर्माकोलसारख्या वस्तूंचा वापर केल्यामुळे अलीकडच्या काळात प्रदूषणात सतत वाढ होत आहे; याची जाणीव झाल्यामुळे त्यावर आळा घालण्यासाठी पर्यावरणस्नेही गणेशोत्सवाची कल्पना गणेशभक्तात रुजत आहे. या सणाच्या निमित्ताने प्रति वर्षी गणेशभक्तांनी वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवून पर्यावरणास हानी पोहोचणार नाही, अशा साहित्याचा वापर करून घरगुती गणेशोत्सव साजरा करण्यावर भर दिल्याचे दिसून येत आहे, ही बाब निश्चितच स्वागतार्ह आहे. लोकमान्य टिळकांनी ब्रिटिशांविरुद्ध आवाज उठविण्यासाठी आणि जनतेत जागृती निर्माण करण्यासाठी गणेशोत्सव सुरू केला असला तरी काळानुरूप त्यात बदल झाला. आता त्याला बाजारीकरणाचे स्वरूप प्राप्त झाले. गणेशोत्सव मंडळांचा ताबा राजकारण्यांनी आणि तथाकथित नेत्यांनी घेतला. त्यामुळे स्पर्धा निर्माण झाली. प्रत्येक गल्लीबोळातून नवसांच्या राजांची स्थापना होऊ लागली. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीमुळे प्रदूषणही वाढले. याचे प्रमुख कारण समाजात प्रबोधनाचा अभाव! आताची बदलेली परिस्थिती पाहता देर आए दुरुस्त आहे, असेच म्हणावेसे वाटेल. शासनाने, महापालिकेने पुढाकार घेऊन ठिकठिकाणी कृत्रिम तलाव बांधून त्यात मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी गणेशभक्तांचे प्रबोधन करण्याची आवश्यकता आहे. तरच पर्यावरणाचा ऱ्हास काही प्रमाणात कमी होऊ शकेल.- मधुकर कुबल, बोरिवली (पू)
अगोदर संकल्पना नीट समजून घ्या
जिथे पाहावे तिथे इकोफ्रेंडली गणपतीचा उदो उदो सुरू आहे. अगोदरच इकोफ्रेंडली ही संकल्पना समजून घेणे आवश्यक आहे. मूर्ती बनवण्यासाठी प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा वापर करून तयार होणा-या मूर्ती या पर्यावरणास घातक ठरू लागल्याचे लक्षात आल्यानंतर शाडूच्या पारंपरिक मूर्ती बनवण्याकडे लक्ष केंद्रित केले गेले. शाडूच्या मातीपासून बनवलेल्या मूर्ती पर्यावरणाला हानी पोहोचवत नाहीत. त्यामुळे शाडूच्या मातीपासून किंवा कागदाच्या लगद्यापासून बनवलेली मूर्ती ही पर्यावरपूरक अर्थात इकोफ्रेंडली समजली जाते. खरे तर पर्यावरणसंवर्धन इकोफ्रेंडली गणपतीसाठी अगोदरच जोरदार हालचाली घडायला हव्या होत्या. उशिराने जागे झालेल्यांना आता जाब विचारण्यात अर्थ नाही. त्यातल्या त्यात इकोफ्रेंडली गणेशमूर्तीची संख्या वाढतेय, याचे थोडेफार समाधान. मात्र अजूनही म्हणावी तशी जनजागृती होताना दिसत नाही. ‘मला काय त्याचे’ अशी स्वार्थी मनोवृत्ती यामागे असावी. आता आशादायी चित्र दिसून येत आहे. इकोफ्रेंडली गणपतींची संख्या उत्तरोत्तर वाढो, हीच सदिच्छा. – प्रभाकर देशपांडे, गोवंडी
थर्माकोलचा वापर टाळावा
इकोफ्रेंडली गणेशोत्सव साजरा करणे ही काळाची गरज आहे. समाजप्रबोधनासाठी गणेशोत्सव मंडळाने, गणेश भक्तांनीच पुढाकार घ्यावा. इकोफ्रेंडली गणपतीमुळे जलप्रदूषण रोखण्यास मदत होईल. राज्य सरकार तसेच मुंबई महापालिकेने प्रचार आणि प्रसार करण्यास मदतीचा हात पुढे करावा. जलप्रदूषणासाठी गणपती महोत्सवादरम्यान प्लॅस्टर ऑफ पॅरिसमुळे मोठमोठय़ा गणपती मूर्तीच्या विसर्जनाचे संकट उभे राहते. कित्येक मूर्ती पुन्हा किना-यावर येऊन पडतात. देवाची विटंबना करणे हे पाप आहे. पर्यावरणस्नेही यांनी निसर्गाला हानी पोहोचणार नाही, अशा साहित्याचा प्लॅस्टिक, थर्माकोलचा वापर करण्यास मज्जाव करावा किंवा वापर करू नये. ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पर्यावरण रक्षणासाठी टीव्ही किंवा जाहिरातीद्वारे प्रचार करावा.- नारायण पन्हाळेकर, काळाचौकी
माणसांनो, आवरा स्वत:ला
गणेशोत्सवादरम्यान जलप्रदूषणाचे चित्र पाहून स्वत:चीच लाज वाटते. धर्माच्या नावाने निसर्गाला आव्हान देणे चुकीचे आहे. पीओपीच्या मूर्ती विरघळत नाहीत. त्याचा दुष्पपरिणाम माशांच्या संवर्धनावर पर्यायाने मासेमारीवर होतो. मूर्तीही लाटांसोबत किना-याला येऊन थडकते. मूर्तीचे अवयव इतस्तत: पसरतात. शाडूच्या मूर्ती वा कागदाच्या लगद्यापासून बनवलेल्या मूर्ती सहजासहजी पाण्यात विरघळतात. त्यामुळे जलप्रदूषण टाळता येते. इकोफ्रेंडली गणपतींचे प्रमाण वाढावे, म्हणून महापालिका, सरकार व सामाजिक संस्थांकडून प्रयत्न व्हावयास हवेत. – मुरलीधर धंबा, डोंबिवली
‘ई मेल’द्वारा आलेली पत्रे..
सजावटही पर्यावरणपूरक!
महाराष्ट्रात घरोघरी साजरा होणारा गणेशोत्सव सार्वजनिक गणेशोत्सवाच्या रूपाने देशभर पोहोचला. इंग्रजांच्या राजवटीविरुद्ध समाज एक व्हावा या हेतूने सुरू झालेल्या गणेशोत्सवाचा मूळ हेतू काळाच्या ओघात विरघळून गेला. हल्ली यात भपकेबाजपणा आला. त्यातूनच शाडूच्या मूर्तीची जागा पर्यायाने स्वस्त अशा प्लॅस्टर ऑफ पॅरिसने घेतली. नैसर्गिक सजावट मागे सारून थर्माकोल सजावटीवर भर दिला गेला. त्याचीच परिणती जलप्रदूषणात झाली. परंतु मागील काही वर्षापासून थोडय़ा प्रमाणात का होईना जलप्रदूषणाचे गंभीर स्वरूप लक्षात आले आहेत. शाडू मूर्तीची वर्षागणिक वाढलेली मागणी हे त्याचेच द्योतक आहे. आता लोकांचा कल थर्माकोलऐवजी कागदी, कापडी सजावटीवर भर देण्याकडे वाढतो आहे. गणपतीच्या शाडूच्या मूर्तीसोबतच सजावटसुद्धा पर्यावरणस्नेही असावी.- दीपक गुंडये, गांधीनगर, वरळी
जलप्रदूषण रोखलेच पाहिजे
गणेशमूर्तीची उंची, प्लॅस्टर ऑफ पॅरिस व रासायनिक रंगांचा अतिवापर यामुळे जलप्रदूषण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनविण्यासाठी सार्वजनिक गणेश मंडळाने पुढाकार घेतला आहे. विसर्जना वेळी शास्त्रानुसार वाहत्या पाण्यात किंवा नैसर्गिक जलस्रोतातच विसर्जन करणे सोयीचे होते. शाडूच्या मूर्ती घेण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. निसर्गावर कोणताही ओरखडा न येऊ देता हा उत्सव साजरा करण्याकडे मंडळांचा कल वाढतो आहे. मूर्तीची उंची कमी असावी, शाडूच्या मूर्ती, नैसर्गिक रंग वापरावा यासाठी जनजागृती करून जलप्रदूषण रोखले पाहिजे. परदेशी बनावटीच्या रंगात मोठय़ा प्रमाणावर रासायनिक घटक आहेत. या रंगांच्या किमतीही कमी आहेत. हे रंग पाण्यात विरघळत नाहीत. रासायनिक रंगांमुळे पाण्यावर तेलकट थर तयार होऊन जलचरांना धोका निर्माण होतो. काही मूर्तिकार थेट ऑइल पेंटचाही वापर करतात. काही रासायनिक रंग पाण्यात विरघळत नसल्याने पाणी दूषित होते. मूर्तिकारांनीही रासायनिक रंगांचा वापर टाळावा व पर्यावरणपूरक रंगांचा वापर करावा. मूर्तिकारांना शाडू मातीच्या मूर्ती बनवण्यासाठी उत्तेजन दिले गेले पाहिजे. मुळात प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीवर बंदी आणावी.- विवेक तवटे, कळवा
इकोफ्रेंडली गणेशमूर्तीना पर्याय नाही
आज प्रदूषणाने गंभीर स्वरूप धारण केले आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आता धडाधड पावले उचलण्याची गरज आहे. त्यामुळे इकोफ्रेंडली गणेशमूर्तीना पर्याय नाही. मुंबई किनारपट्टी अगोदर यातूनच प्रदूषित आहे. त्यामुळे इकोफ्रेंडली गणेशमूर्तीचे महत्त्व आजच्या पिढीला माहीत होणे गरजेचे आहे. याकरिता महापालिका आणि राज्य सरकार या दोघांनीही एकत्रितपणे यावर योग्य ती अंमलबजावणी केली पाहिजे. तरच आपण मोकळय़ा हवेत श्वास घेऊ शकतो. अन्यथा, प्रदूषणामुळे सामान्यांचे जगणे मुश्कील होऊन बसेल.- उदय वाघवणकर, जोगेश्वरी (पू)
‘शाडू’चीच गणेशमूर्ती वापरावी
प्लॅस्टर ऑफ पॅरिसपासून श्रीगणेशाची मूर्ती तयार करणे सपशेल चुकीचे आहे. सांगून कळणार नाही, पटूनही वळणार नाही, अशी गणेशभक्तांची गत आहे. शाडू मातीची दोन ते अडीच फुटांपर्यंतची मूर्ती शास्त्रीय चौकटीत बसते. याव्यतिरिक्त जे काही केले जाते त्यास केवळ चढाओढच म्हणता येईल. शास्त्र राहिले बाजूला, असले अशास्त्रीयरीत्या सदर उत्सव साजरा करून पापाचे धनी होऊन बाप्पाची अवकृपा का ओढवून घ्या? असा साधासरळ प्रश्न समाजास पडू नये, हे आश्चर्यकारक आहे. मूर्तीची प्रतिष्ठापणा करून त्या मूर्तीचे विधिवत विसर्जन होईपर्यंत आपली जबाबदारी संपत नाही. ठाण्यात शाडूच्या मूर्तीची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रायगडमधील ‘पेण’ म्हणजे गणेशमूर्ती साकारण्याचे राज्यातीलच नव्हे सर्वोच्च केंद्र आहे. आपण मूर्तिकारांकडे शाडू मातीच्याच मूर्तीची मागणी केल्यास प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा वापर करून मूर्ती साकारणे हळूहळू बंद होईल. शाडू मातीच्याच मूर्तीची मागणी करणे ही प्रत्येक गणेश भक्ताची जबाबदारी आहे. हे प्रकर्षाने लक्षात घेणे काळाची गरज आहे. १०० टक्के शाडूच्या मूर्तीचा उपयोग केल्यास कृत्रिम तलावाचा मुद्दाही गळून पडेल. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बनवण्यासाठी पूर्णत: मज्जाव केला जावा. ज्यांच्या मूर्ती प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या आढळतील, त्यांच्यावर कडक कारवाई करावी. – जयेश राणे, भांडुप
पेंग्विनचा खर्च अनाठायी वाटतो का ?
भायखळा येखील वीरमाचा जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयात थायलंडहून खास पेंग्विन पक्षी आणले जाणार आहेत. तब्बल अडीच कोटी खर्च करून उद्यानात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी पेंग्विन पक्ष्यांवर होणारा खर्च पटतो का? प्राणिसंग्रहालयाची दुरवस्था पाहता पेंग्विन पक्ष्यांना आणणे योग्य ठरेल का? पेंग्विन पक्ष्यांना योग्य सोयी-सुविधा मिळतील का ? उद्यानाची अवस्था पाहता सध्या पेंग्विनना आणणे योग्य आहे का? पेंग्विनवर खर्च करण्याऐवजी उद्यानाच्या बांधकामासाठी पैसा खर्च करावा का ?
याबद्दल वाचकांनी आपली मते शुक्रवारपर्यंत पुढील पत्त्यावर पाठवावीत.
प्रहार, वन इंडियाबुल्स सेंटर, नववा मजला,
ज्युपिटर मिल्स कंपाउंड,
लोअर परळ, मुंबई – ४०००१३,
फॅक्स : ०२२-४०९६९९००. ०२२- ६१२३९९६६
शब्दमर्यादा : १०० ते १५० शब्द. पाकिटावर ‘वाचकांचे व्यासपीठ’ असा आवर्जून उल्लेख करावा.
आपली मते तुम्ही vyasapith@gmail.com या ई-मेल आयडीवरही पाठवू शकता.
‘वाचकांचे व्यासपीठ’ ऑनलाइन
ऑनलाइन पत्र लिहा vyasapith@gmail.com वर तसेच ‘प्रहार’च्या संकेतस्थळावर किंवा प्रहारच्या फेसबुक पेजवरही मत नोंदवू शकता.
त्यासाठी लॉग इन करा www.prahaar.in किंवा www.facebook.com/prahaar.in
शब्दमर्यादा १०० ते १५० पर्यंत