तीन अभियंत्यांना १५ लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले गेल्याची घटना ताजी असतानाच या विभागाचे प्रमुख अभियंता राजीव कुकनूर यांना चक्क बढती देत त्यांचा गौरव करण्यात आला आहे.
मुंबई – भायखळा येथील इमारत प्रस्ताव विभागातील कार्यकारी अभियंत्यासह तीन अभियंत्यांना १५ लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले गेल्याची घटना ताजी असतानाच या विभागाचे प्रमुख अभियंता राजीव कुकनूर यांना चक्क बढती देत त्यांचा गौरव करण्यात आला आहे.
इमारत प्रस्ताव विभागाचे प्रमुख अभियंता राजीव कुकनूर यांची वर्णी थेट उपायुक्त (अभियांत्रिकी) या पदावर लावण्यात आली आहे. मात्र कुकनूर यांच्या जागी उपप्रमुख अभियंता बालचंद्रन यांची प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आल्यामुळे भायखळा लाच प्रकरणामुळेच कुकनूर यांना तेथून हटवले असल्याची चर्चा महापालिकेत चांगलीच रंगली आहे.
महापालिकेतील इमारत प्रस्ताव विभागाच्या प्रमुख अभियंता या पदावर कार्यरत असलेल्या राजीव कुकनूर यांची बदली बुधवारी थेट उपायुक्त (अभियांत्रिकी) या पदावर करण्यात आली आहे. विद्यमान उपायुक्त (अभियांत्रिकी) या पदावरील अधिकारी येत्या ३१ ऑक्टोबर रोजी सेवानिवृत्त होत आहेत.
त्यांच्या जागी कुकनूर यांची वर्णी लावण्यात आली. आजवर कधीही उपायुक्तपदावरील अधिकारी सेवानिवृत्त होण्यापूर्वी त्या जागेवर दुस-या अधिका-याची वर्णी लावली जात नसे. परंतु कुकनूर यांची नियुक्ती तीन दिवस आधीच जाहीर करण्यात आली आहे.
भायखळा येथील इमारत प्रस्ताव विभागातील कार्यकारी अभियंता सुनील राठोड, बालाजी बिरासदार आणि विलास खिल्लारे यांना लाचलुचपत विभागाने १५ लाख रुपयांची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडले. या प्रकरणामध्ये प्रमुख अभियंता राजीव कुकनूर यांचाही हात होता, असे चौकशीमध्ये निष्पन्न होण्याची शक्यता लक्षात घेऊन महापालिका आयुक्तांनी त्यांना उपायुक्तपदी बसवले असल्याची चर्चा सध्या महापालिका वर्तुळात ऐकायला मिळत आहे. त्यामुळे ही बढती की बदली अशा चर्चेला उधाण आले आहे.