अनेक अडचणींना तोंड देत पदवी प्राप्त करणा-या एसएनडीटी विद्यापीठातील विद्यार्थिनी कोणतेही जागतिक आव्हान पेलू शकतील, असा विश्वास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला.
मुंबई – अनेक अडचणींना तोंड देत पदवी प्राप्त करणा-या एसएनडीटी विद्यापीठातील विद्यार्थिनी कोणतेही जागतिक आव्हान पेलू शकतील, असा विश्वास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला. तसेच उच्चशिक्षणाची गुणवत्ता आणखी सुधारणे आवश्यक आहे, यासाठी राज्य सरकार महिला आणि मुलींसाच्या विकासासाठी सतत अग्रेसर आहे.
महिलांसाठीचे धोरण अधिक व्यापक करण्यात आले असून, महिलांचा सामाजिक दर्जा सुधारण्यावर अधिक भर देण्यात आला आहे, असे सांगून महिलांनी विकास प्रक्रियेत पुढे येणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले.
श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाचा (एसएनडीटी) ६३वा दीक्षान्त समारंभ सोमवारी विद्यापीठाच्या पाटकर सभागृहात पार पडला. त्या वेळी मुख्यमंत्री चव्हाण बोलत होते. या वेळी उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री डी. पी. सावंत, विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. वसुधा कामत, प्र-कुलगुरु डॉ. वंदना चक्रवर्ती, डॉ. रोहिणी गोडबोले, विद्यापीठाच्या सिनेटचे सर्व सदस्य, आदी या वेळी उपस्थित होते.
या समारंभात १७ हजार ७७ विद्यार्थिनींना पदवी प्रदान करण्यात आली. यात ५७ विद्यार्थिनींना पी. एचडी. तर १२ एम. फिल. पदव्या प्रदान करण्यात आल्या. सार्वजनिक आरोग्य विषयक संशोधनासाठी डॉ. रोहिणी गोडबोले यांना ‘डॉक्टर ऑफ लेटर्स’ची पदवी प्रदान करण्यात आली.
राज्य सरकार महिला सक्षमीकरणात अग्रेसर असून, महिला धोरण जाहीर करणारे हे पहिले राज्य आहे. इतर राज्यात ३३ टक्के आरक्षण असताना महाराष्ट्राने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण दिले. महिलांना कमी दराने कर्ज, महिला बचत गटांची स्थापना आदी माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणावर भर देण्यात येत असल्याचे या वेळी मुख्यमंत्री चव्हाण यांनी सांगितले.