संवादच लोकशाहीला बळकटी आणू शकतो, असे मानणा-यांपैकी मी एक आहे. विकासाचा रथ चालवताना तो एककल्ली असू नये, त्यात नागरिक आणि प्रशासन यांच्यात समन्वय असावा.
कणकवली – संवादच लोकशाहीला बळकटी आणू शकतो, असे मानणा-यांपैकी मी एक आहे. विकासाचा रथ चालवताना तो एककल्ली असू नये, त्यात नागरिक आणि प्रशासन यांच्यात समन्वय असावा. या समन्वयातून झालेला विकासच पारदर्शी व समाजाला अभिप्रेत असा घडतो. हा विकास वाढत्या कणकवली शहरातही घडावा.
कणकवलीवासीयांच्या मनामनात असलेली विकासाची संकल्पना सत्यात उतरावी, यासाठीच हा आजचा जनता दरबार होता. भविष्यात प्रत्येक प्रभागात जाऊन जनता दरबार घेतले जातील आणि नागरिकांच्या समस्या सोडवल्या जातील, असे आश्वासन युवा नेते नितेश राणे यांनी दिले.
शहरातील नागरिकांच्या समस्या, शंका यांचे निरसन करण्यासाठी कणकवली नगरपंचायतीच्या वतीने नुकतेच जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नागरिकांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्षा प्रज्ञा खोत, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, तालुकाध्यक्ष गोटया सावंत, युवा नेते संदेश पारकर, उपनगराध्यक्ष समीर नलावडे, नगरसेवक बंडू हर्णे, किशोर राणे, कन्हय्या पारकर आदी मान्यवर उपस्थित होते.
पाच वर्षानी निवडणुकीला सामोरे जाऊन मते मागणा-यांपैकी मी नाही. दिलेला शब्द पाळणारा नेता म्हणून राज्याचे उद्योगमंत्री व पालकमंत्री नारायण राणे यांची राज्यात ख्याती आहे. त्यांचा कार्यकर्ताही विकासाच्या संकल्पना आत्मसात करून तत्परतेने काम करणारा असावा, म्हणूनच आम्हा कार्यकर्त्यांचे जनतेशी संपर्क अभियान सुरू असल्याचे नितेश राणे यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, जनता दरबाराच्या निमित्ताने आपापसात विचारांची देवाणघेवाण व्हावी, सुसंवादातून चांगला विचार पुढे यावा, विकासासाठी दूरदृष्टी ठेवून पाऊल टाकावे, जनसामान्यांचे प्रश्न जाणून घेऊन पुढे चालावे व ते सोडवावेत यासाठी प्रयत्न सुरू आहेत. म्हणून कणकवलीतील नागरिकांना ज्या समस्या भेडसावतात त्या सोडवण्यासाठी हा प्रयत्न होता. एक-दुस-यावर विश्वास व्यक्त केल्याने परिवर्तन होत असते. ज्या विश्वासाने कणकवलीची सत्ता आमच्याकडे दिली, त्या विश्वासास पात्र ठरण्यासाठी आणि निवडणुकीत दिलेला प्रत्येक शब्द पूर्णत्वास नेण्यासाठी आपले प्रयत्न सुरू असल्याचे नितेश राणे म्हणाले.
मागाहून टीका करण्यापेक्षा टीकाकारांनीही अशा कार्यक्रमात स्वत: उपस्थित राहून जनतेसमोर काम करणा-या सत्ताधा-यांच्या चुका सांगणे गरजेचे होते. निवडणूक आली की विरोधात आरोळय़ा देणा-यांनी आणि वृत्तपत्रात रकाने भरणा-यांनी अशा कार्यक्रमात येऊन सूचना करणे आवश्यक होते.
राजकारण प्रत्येक मुद्दय़ावर करण्यापेक्षा योग्य पद्धतीने विरोध करून शहराच्या विकासासाठी दर्जेदार काम होईल, शहर सुसज्ज होईल आणि कणकवली शहराची देदीप्यमान नगरी म्हणून ओळख बनेल, यासाठी पुढे येऊन चर्चा करा. भविष्यात प्रभागनिहाय ज्यावेळी भेटी होतील, त्याठिकाणी हे विरोधक येतील आणि चर्चा करतील, अशी अपेक्षाही यावेळी नितेश राणे यांनी व्यक्त केली.