राज्यातील यंदाच्या शैक्षणिक वर्षातील शाळांची सुरुवात सोमवारी, १५ जूनपासून होत आहे.
मुंबई- राज्यातील यंदाच्या शैक्षणिक वर्षातील शाळांची सुरुवात सोमवारी, १५ जूनपासून होत आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी नव्याने पहिलीच्या वर्गात पाऊल टाकणा-या प्रत्येक बालकाला येथील वातावरण प्रसन्न आणि उत्साहाचे वाटावे यासाठी शाळा-शाळांमध्ये प्रवेत्शोत्सवाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
शाळेत नव्याने येणा-या मुलांचे फुले व गुच्छ देऊन स्वागत करण्यात येणार आहे. शिक्षण हक्क अधिकार कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी पहिल्या दिवशी शाळांच्या माध्यमातून प्रत्येक ठिकाणी प्रभातफेरीचे आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून यात शिक्षण विभागाच्या अधिका-यांसोबतच स्थानिक लोकप्रतिनिधीही मोठया प्रमाणात सहभागी होणार आहेत.
विदर्भाचा अपवाद वगळता राज्यातील सर्व ठिकाणच्या शाळा या सोमवारी सुरू होत आहेत. या दिवशी शाळा व्यवस्थापन समिती, स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्था तसेच स्थानिक सेवाभावी संस्था यांच्या सहकार्याने शाळेत नव्याने येणा-या विद्यार्थ्यांच्या घरी भेट देणे, शाळा परिसरात पदयात्रा काढणे, शाळा परिसर स्वच्छ व सुशोभित करणे आणि मोफत पुस्तक वितरण आदी कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. तर सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून पुरविण्यात येणारी मोफत पुस्तकेही पहिल्या दिवशीच विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहेत.
गणवेशाविनाच पहिला दिवस
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, अनुदानित आदी प्राथमिक आणि माध्यमिकच्या शाळांमध्ये आर्थिक दुर्बल आणि मागास प्रवर्गातील मुलांचा पहिला दिवस नवीन गणवेशाविनाच जाणार आहे. शिक्षण विभागाच्या अनास्थेमुळे गणवेशासाठी आतापर्यंत कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आली नाही. मात्र शाळा सुरू होण्यापूर्वी दोन दिवस अगोदर या मुलांना दोन गणेवशासाठी ४०० रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आल्याने पहिला दिवस आणि महिनाही नवीन गणवेशाविना काढावा लागणार आहे.
पटावर पालकांचेही नाव
शिक्षण हक्क अधिकार कायद्यानुसार सहा ते चौदा वयोगटातील प्रत्येक मुलाला शिक्षणाचा अधिकार मिळवून देण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांसोबत पालकाचे नावही पटावर नोंदविले जाणार आहे. तर ग्रामीण आणि शहरी भागात मुले नियमित शाळेत यावीत यासाठी राज्यभर विविध पातळ्यांवर नवीन उपक्रमांचे आयोजन पहिल्या दिवसाच्या निमित्ताने केले जाणार आहे.