वैशाख वणव्याची चाहूल लागू लागली असून कडाक्याच्या उन्हामुळे मुंबईकरांची अंगकांती भाजून निघत आहे.
मुंबई – वैशाख वणव्याची चाहूल लागू लागली असून कडाक्याच्या उन्हामुळे मुंबईकरांची अंगकांती भाजून निघत आहे. ११ मार्च रोजी कमाल तापमानाचा पारा पहिल्यांदा ३६ अंशांवर गेल्यानंतर पुढील काही दिवस कमालसह किमान तापमानात ४ ते ५ अंश सेल्सिअसने घट नोंद झाली आहे. शनिवारी तापमानाने २५ अंश सेल्सिअस तर कमाल तापमानाचा पारा ३६ अंश सेल्सिअसपर्यंत नोंदवल्याने सर्वाधिक तापमानाची नोंद झाल्याचे कुलाबा येथील प्रादेशिक वेधशाळेतर्फे सांगण्यात आले.
कुलाबा येथे कमाल ३३.० अंश सेल्सिअस, किमान २५.८ अंश सेल्सिअस, ५४ टक्के आद्र्रता तर सांताक्रूझ येथे कमाल ३६.० अंश सेल्सिअस, किमान २३.४ अंश सेल्सिअस आणि ३२ टक्के आद्र्रतेची नोंद झाली. मुंबईसह राज्यातही कमाल तापमान वाढीचा इशारा देण्यात आला आहे. मालेगाव, सोलापूर, नांदेड, परभणी, वर्धा येथे सर्वाधिक कमाल ४० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
आणखी दोन दिवस उकाडय़ाचे
पूर्वेकडून वाहणा-या वा-यांचा प्रभाव लक्षात घेता कमाल तापमानात वाढ होत आहे. सोबत गरम वारे वाहत असल्याने वातावरणात उकाडा अधिक जाणवत आहे. येते दोन दिवस हा उकाडा कायम राहण्याचा अंदाज आहे.
– व्ही. के. राजीव, संचालक, कुलाबा प्रादेशिक वेधशाळा