‘मंदिरामध्ये महिलांना प्रवेश नाकारणारा देव मी मानत नाही,’ असे शरद पवार यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. पवार यांचा महिलांसंबंधीचा समानतेचा विचार हा आजचा नाही. ते जेव्हा जेव्हा अधिकारावर होते त्या त्या वेळी त्यांनी महिलांना झुकते माप देऊन ही भूमिका कटाक्षाने अमलात आणली. त्यामुळे महाराष्ट्रात ‘महिला आयोगा’ची स्थापना झाली. महिलांची पोलीस खात्यात भरती हीसुद्धा शरद पवार यांच्यामुळेच झालेली आहे. ‘तो देव मी मानत नाही..’ यावरून एक आठवण झाली.
योगायोग असा की, आजच (९ फेब्रुवारी) महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री ए. आर. अंतुले यांची ८६वी जयंती आहे. अंतुले यांचा मुख्यमंत्री पदाचा काळ अठराच महिन्यांचा असला तरी त्यांच्या धडाकेबाज निर्णयाबद्दल ते प्रसिद्ध होते. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात १९७२ साली ते बांधकाममंत्री होते. त्यावेळची ही आठवण आहे. आज सर्वत्र उड्डाणपुलांची मोठी चर्चा आहे; पण, जेव्हा उड्डाणपूल कुतूहलाचा आणि कौतुकाचा विषय होता तेव्हा बॅरिस्टर अंतुले यांनी या उड्डाणपुलाचा महाराष्ट्रातील पहिला आविष्कार घडवला तो रेवदंडा-साळाव या उड्डाणपुलापासून. त्याचवेळी गोरेगाव खाडीवरचा श्रीवर्धनकडे जाणारा पूलही अंतुले यांच्या निर्णयामुळे होऊ शकला; पण, कोणत्याही विकासकामात देव किंवा धर्म घुसवला की, ती विकासकामे लटकतात.
जर निर्णयकर्त्यांने आपली भूमिका स्पष्ट करून कोणतेही विकासकाम रोखू द्यायचे नाही, अशी जर भूमिका घेतली तर मग ही कामे झपाटयाने मार्गी लागतात. गोरेगावच्या पुलाचा विषय असाच आहे. या खाडीवर श्रीवर्धनला जाताना एका तराफ्याचा उपयोग करावा लागे आणि त्या तराफ्यातून जे उत्पन्न येत होते ते उत्पन्न खाडीच्या तोंडावर असलेल्या एका पिराकरिता जात होते. जेव्हा या खाडीवर पूल बांधायचा निर्णय अंतुले यांनी जाहीर केला तेव्हा, त्या पीर समितीचे सदस्य अंतुले यांना भेटले आणि हा पूल बांधला जाऊ नये, अशी मागणी केली. कारण काय तर तरफ्याचे उत्पन्न देवाला जाते, अशी त्यांची भावना! त्यांनी ती अशी स्पष्टपणे नोंदवली.
१९७२च्या विधानसभेची निवडणूक तोंडावर आलेली. अंतुले ज्या मतदारसंघातून निवडून येत तिथे मुस्लीम मतदारही मोठया प्रमाणात. त्यामुळे त्या पिराला उत्पन्न जाते, असे सांगितल्यानंतर पूल बांधण्याचा आग्रह अंतुले साहेब धरणार नाहीत, अशी या व्यवस्थापन मंडळाची समजूत होती. अंतुले यांच्याकडे ही मागणी आली तेव्हा त्यांनी स्पष्ट सुनावले की, ‘लोकांची गैरसोय करून उत्पन्न खाणारा देव मी मानत नाही..’ त्या पीर समितीचे सदस्य अत्यंत अस्वस्थ झाले. त्यांनी हीसुद्धा कल्पना दिली की, येणा-या विधानसभा निवडणुकीत तुमच्या या विधानामुळे आणि पूल बांधण्याचा आग्रह धरल्यामुळे राजकीयदृष्टया तुमची अडचण होईल. बॅरिस्टर अंतुले यांनी त्यावरही ताडकन असे उत्तर दिले की, ‘देव, धर्माचा वापर करून मला निवडणूक जिंकायची नाही. ती मला माझ्या कामावर जिंकायची आहे. या उपर माझा पराभव झाला तरी मला खंत नाही’..
मग बॅरिस्टर यांच्या पुढाकाराने गोरेगावच्या पुलावरील काम सुरू झाले. म्हसळा, श्रीवर्धन या गावांना जायला जिथे बारा बारा तास लागत होते. तो प्रवास चार तासांत उरकू लागला. लोकांची सोय ख-या अर्थाने झाली. १९७२च्या विधानसभा निवडणुकीत अंतुले देवाचे उत्पन्न बुडवणारा उमेदवार आहे, असा विरोधकांनी अपप्रचारही केला; पण, त्या कशाचीही पर्वा न करता बॅरिस्टर अंतुले ४० हजार एवढया प्रचंड मताधिक्यांनी विजयी झाले.
ज्याला राजकारण करायचे आहे, त्याच्या राजकीय भूमिका स्पष्ट असाव्या लागतात आणि त्या ठाम असाव्या लागतात; मग, त्याचा हिशेब करून, राजकारण सोयीप्रमाणे करता येते. अलीकडे या मतांच्या सोयीचे राजकारण वाढल्यामुळेच धार्मिक भावना, धार्मिक प्रश्न आणि अगदी राम मंदिराचा प्रश्नसुद्धा धार्मिकदृष्टया हाताळला की, या विषयाचा सामाजिक आशय संपुष्टात येतो आणि तो विषय धार्मिक बनवला जातो. आज सर्वत्र राजकारण सोयीचे केले जाते.
ब-याच ठिकाणी त्याला भावनात्मकरित्या मुलामा चढवला जातो. दुस-या अर्थाने ‘ब्लॅकमेल राजकारण’ करण्याची पद्धत वाढलेली आहे. सोशल मीडियाला अनुकूल भूमिका घेतल्या जातात. सतत वृत्तपत्रांत आपली छबी राहिली पाहिजे आणि ठाम राजकीय भूमिका न घेता सोयीप्रमाणे भूमिका बदलून राजकारण करणारे काही काळाकरिता यशस्वी होत असतीलही. मात्र, ते कायमचे यशस्वी कधीच होत नाहीत; पण, एक ना एक दिवस हे भांडे फुटते. ज्यांना ज्यांना राजकारणात स्वच्छ भूमिका घेऊन काम करायचे आहे, त्यांना यश मिळाले नाही तरी त्यांच्या भूमिका स्वच्छ राहिल्या तर त्या भूमिकांचा समाजाला फायदाच होत असतो.
सध्या शनिशिंगणापूर आणि त्र्यंबकेश्वर येथे महिलांच्या प्रवेशाचा जो वाद उभा राहिलेला आहे त्या वादाला धार्मिक भावनेत गुंतवण्याचा प्रयत्न झाला की, तो विषय गुंतागुंतीचा होतो. जेव्हा स्त्री-पुरुष समान आहेत तर देवधर्माच्या प्रवेशाच्या भूमिका अनाठायी ठरतात. स्त्रीला काही निसर्गमर्यादा आहेत आणि त्या मर्यादांमध्ये जो त्रास आहे तो सहन करून ही विश्वाची जननी मातेच्या भूमिकेत येत असते.
जगात मातेपेक्षा काही पवित्र नाही. हा निर्णय एकदा झाला की, बाकी सगळे वाद गळून पडतात. पुंडलिकाच्या भेटीला परब्रह्म आले असताना माता-पित्याची सेवा करणारा पुंडलिक खुद्द विठुरायाला विटेवर उभा करून माता-पित्याची सेवा करत राहिला. आजच्या अत्याधुनिक काळात परंपरागत जुन्या समजुती दूर केल्या पाहिजेत. कवी केशवसुतांनी म्हटले आहे की,
‘जुने जाऊ द्या मरणालागूनी
जाळुनी किंवा पुरुनी टाका’
आजच्या सामाजिक प्रश्नांसंबंधात हीच भूमिका सर्वानी घेणे अत्यावश्यक आहे. आजच्या डिजीटल युगात स्त्री वर्गाला एखाद्या ठिकाणी प्रवेश नाकारणे, हा त्या डिजीटल युगाचा पराभव आहे. ज्या काळात या परंपरा होत्या तो काळच आता राहिलेला नाही; मग, परंपरांना कवटाळून काय साधणार?