कालच्या शुक्रवारी उस्मानाबादमध्ये उद्धवराव पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण झाले. उद्धवराव गेल्याला ३५ वर्षे झाली. उस्मानाबाद ही त्यांची जन्मभूमी, कर्मभूमी. ते आमदारही तिथूनच झाले. खासदारही तिथूनच झाले… एन.डी. म्हणजे एन.डी. पाटील. शे.का. पक्षाचे महाराष्ट्रातले आजचे सर्वश्रेष्ठ नेते. एकेकाळचा हा महाराष्ट्रातला दमदार पक्ष. विधानसभेतील विजयी उमेदवारांच्या तुलनेत सध्या नगण्य आहे. परंतु एन.डीं.नी जे राजकारण केले ते उमेदवार विजयी किती आणि त्यांची संख्या किती याचा हिशोब करून त्यांनी केले नाही….
उस्मानाबादचे उद्धवराव…
कालच्या शुक्रवारी उस्मानाबादमध्ये उद्धवराव पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण झाले. उद्धवराव गेल्याला ३५ वर्षे झाली. उस्मानाबाद ही त्यांची जन्मभूमी, कर्मभूमी. ते आमदारही तिथूनच झाले. खासदारही तिथूनच झाले. १९४६ साली आंध्रच्या विधानसभेत निवडून गेले. तेव्हा मराठवाडा निजामाच्या ताब्यात होता. ५७ साली संयुक्त महाराष्ट्र समितीचे उमेदवार म्हणून विधानसभेत निवडून आले. १९५८ साली विधानसभेत विरोधी पक्षनेते झाले. मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आणि विरोधी पक्षनेते उद्धवराव. मग उद्धवरावांचे एकही भाषण पुढच्या चार वर्षात यशवंतरावांनी कधी चुकवले नाही. विधानसभेत यशवंतराव उत्तराला उभे राहिले की, उद्धवरावांच्या सखोल अभ्यासाचा शेतीच्या प्रश्नाशी असलेल्या आत्मीयतेचा आणि विरोधी बाकावर असूनही त्यांच्या समतोल बुद्धीवादी नेतृत्वाचा यशवंतराव मनापासून आदर करून अनेकवेळा उल्लेख करीत. १९६७ला उद्धवराव पुन्हा विधानसभेत निवडून आले. १९७७ला उस्मानाबादमधून लोकसभेवर खासदार म्हणून निवडून गेले. ते आमदार असोत, खासदार असोत किंवा नसोत. महाराष्ट्राच्या राजकारणात शेतकरी कामगार पक्ष आणि उद्धवराव यांना वजा करता येणे शक्य नाही. किंबहुना शंकरराव मोरे, केशवराव जेधे आणि उद्धवराव पाटील हे त्या काळात अतिशय अभ्यासू नेते म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध होते. उद्धवराव निव्वळ पुस्तकी नव्हते. शेतीच्या प्रश्नाची इतकी सखोल माहिती असलेला आणि त्यावर उपाय सांगणारा उद्धवरावांएवढा माणूस महाराष्ट्रात अजून झालेला नाही. एवढे असूनही अतिशय निगर्वी. त्यांच्या भाषणात कुठेही आक्रस्ताळेतपणा नसायचा, हातवारे नसायचे. आवाज चढवून बोलायची त्यांना गरज नसायची. मुद्दे एवढे विपुल असायचे की कोणत्याही विधेयकावर बोलताना विधानसभेचे अध्यक्ष त्यांना थांबवू शकत नसत. महाराष्ट्राच्या शेतक-याला शेतीमालाच्या उत्पादनाच्या खर्चावर आधारित भाव मिळाला पाहिजे, या मागणीची पहिली शास्त्रशुद्ध मीमांसा विधानसभेच्या व्यासपीठावर फक्त उद्धवरावांनी केली आणि लोकसभेतही त्यांनी तो आवाज उठवला. १३ मार्च १९६६ रोजी शेतक-यांच्या याच प्रश्नासाठी मुंबईत शेतकरी कामगार पक्षाचा एक लाख बैलगाड्यांचा मोर्चा मुंबईत धडकला होता. त्याचे नेतृत्व करण्यात उद्धवरावच आघाडीवर होते. मुंबईत एक लाख बैलगाड्यांचा मोर्चा ही कल्पना आज कोणी करू तरी शकतो का? ही ताकद उद्धवरावांची होती.
यशवंतराव चव्हाण तर उद्धवरावांच्या समतोल नेतृत्वावर इतके खूश होते की संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात मुंबईतल्या कामगारांचे जेवढे मोठे योगदान होते, त्याचप्रमाणे ग्रामीण भागातल्या शेतक-याला या लढय़ात सामावून घेण्याच्या कामात किंबहुना महाराष्ट्र घुसळून काढण्यात उद्धवरावांचे योगदान फार मोठे आहे. ते निष्णात वकील होते. पण वकिली केली शेतक-यांची. एकदा का पानाचा विडा तोंडात रंगला की उद्धवरावांचे मुद्देसूद भाषण म्हणजे मेजवानी असायची. पत्रकारितेतील माझ्या पिढीला शेतीचे अर्थशास्त्र, ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था, उत्पादन खर्चावर आधारित शेतीमालाचा भाव, ग्रेडिंग न करता (निवड) शेतीमाल विकावा लागल्यामुळे शेतक-याची होणारी लूट आणि दलालांचा फायदा हे सगळे विषय उद्धवरावांमुळे माझ्या पिढीला कळले. उद्धवराव सांगायचे की दुकानातली कोणतीही वस्तू खरेदी करायला तुम्ही गेलात तर त्या वस्तूची किंमत दुकानदार सांगेल ती तुम्हाला द्यावी लागते. पण एक शेतीमाल हा विषय असा आहे की, त्याची किंमत घाम गाळून उत्पादन करणारा शेतकरी न ठरवता ती किंमत दलाल, व्यापारी आणि सटोडिये ठरवतात. त्याचे विश्लेषण उद्धवराव अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने करायचे. यशवंतराव उद्धवरावांच्या या सगळ्या ग्रामीण अर्थशास्त्रावर बेहद खूश असायचे.
१९६२च्या २२ नोव्हेंबरला यशवंतरावांना संरक्षण मंत्री म्हणून दिल्लीला जावे लागले. तेव्हा यशवंतरावांच्या मनात असा विचार होता की, उद्धवरावांना काँग्रेसमध्ये घेऊन त्यांना मुख्यमंत्री करावे. त्यावेळचे राज्यसभेचे खासदार रामराव आवरगावकर यांना यशवंतरावांनी निरोप देऊन उस्मानाबादला पाठवलेसुद्धा होते. तसा निरोप घेऊन रामराव गेले. उद्धवरावांनी त्यांना चहा पाजला. यशवंतरावांचे आभार मानले आणि यशवंतरावांना असा निरोप दिला की, ‘तुम्ही देऊ केलेला सन्मान मी स्वीकारू शकत नाही. कारण मी डाव्या चळवळीचे राजकारण करतो. शेतकरी कामगारांच्या लाल झेंड्यातच माझे पार्थिव गुंडाळले जाणार आहे. मला सत्तेचा मोह नाही.’ रामराव निरोप घेऊन आले. यशवंतरावांच्या डोळय़ांत पाणी तरारले आणि कॅन्सरच्या असाध्य रोगाने उद्धवराव गेले तेव्हा खरोखरच त्यांचे पार्थिव लाल झेंड्यातच गुंडाळले गेले.
उद्धवराव जेव्हा थकले आणि त्यांना कॅन्सरने गाठले, त्यावेळी यशवंतराव त्यांना भेटायला गेले. यशवंतरावांच्या मनात आले की, नि:स्वार्थपणे निजामाच्या विरोधात लढलेला, स्वातंत्र्यानंतर शेतक-यांसाठी लढलेला, बेळगाव-कारवार सीमाप्रश्नासाठी लढलेला, अनेकदा तुरुंगात गेलेल्या या नेत्याचा सत्कार व्हायला हवा? आणि मग १९८० साली औरंगाबादमध्ये उद्धवराव पाटील यांचा सत्कार झाला. तो यशवंतरावांच्या हस्ते झाला. यशवंतरावांमध्ये ती उदारता होती. पुढे विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी औरंगाबादमध्ये उद्धवरावांचा पुतळाच उभा केला. त्यावेळचे राजकारण गुणवत्तेचे होते. द्वेषाचे नव्हते. एकमेकांना संपवण्याचे नव्हते. एकमेकांना पाडण्याचे नव्हते. उद्धवराव लढले, कधी निवडून आले, कधी पडले. शेती विकून राजकारण केले. ते गेल्यानंतर त्यांचा मुलगा धनंजय याच्या डोक्यावर एक लाखाचे कर्ज ठेवून गेले. पण धनंजयला त्या कर्जाचा अभिमान आहे. त्या उद्धवरावांच्या पुतळ्याचे अनावरण त्यांच्या कर्मभूमीत ३५ वर्षाने झाले. त्या कार्यक्रमात उद्धवरावांचा जीवनपट असा डोळ्यासमोरून जात होता. उद्धवरावांची अशी अनेक लढाऊ रूपे आठवली, अनेक भाषणे आठवली, असे नेते आता कुठे मिळणार आहेत?
परवा एन.डीं.च्या घरी फोन केला होता. एन.डी. म्हणजे एन. डी. पाटील. शे.का. पक्षाचे महाराष्ट्रातले आजचे सर्वश्रेष्ठ नेते. एकेकाळचा हा महाराष्ट्रातला दमदार पक्ष. विधानसभेतील विजयी उमेदवारांच्या तुलनेत सध्या नगण्य आहे. परंतु एन.डीं.नी जे राजकारण केले ते उमेदवार विजयी किती आणि त्यांची संख्या किती याचा हिशोब करून त्यांनी केले नाही. जसे कम्युनिस्ट पक्षात बर्धन, शे.का. पक्षात उद्धवराव, काहीशा त्याच तोलामोलाचे एन.डी. १९५७ साली संयुक्त महाराष्ट्र समितीचे उमेदवार म्हणून ते इस्लामपूर मतदारसंघातून निवडणूक लढले. त्यावेळचे दिग्गज आमदार राजाराम बापूंना त्यांनी पराभूत केले. अवघ्या ४०० मतांनी बापू पडले. पण एन.डीं.ची विधानसभेतील ती निवडणूक गाजली. मग विधान परिषदेवर ते दोन-तीन वेळा निवडून गेले. शरद पवारांनी १९७८ साली पुलोदचा जो प्रयोग केला, त्यात एन.डीं.ना सहकार मंत्री म्हणून घेतले. तेवढाच एक अठरा महिन्यांचा त्यांचा सत्तेचा प्रयोग. पण त्या काळातही एन.डी. आणि गणपतराव देशमुख हे दोन मंत्री असे होते की, ते मंत्री म्हणून कधी वाटलेच नाहीत. चप्पल ऐवजी त्यांच्या पायात कधी बूट आला नाही. गणपतराव कॅबिनेट मंत्री असताना मंत्रालयाच्या समोरच्या मंत्र्यासाठी असलेल्या छोट्या बैठ्या घरात राहायचे. तिथून रोज मंत्रालयात चालत यायचे, चालत जायचे. एन.डी. स्वत:ही अनेक वेळा चालत यायचे, चालत जायचे. या माणसाला मंत्रिपद कधीच चिकटले नाही आणि सत्तेला त्यांनी कधी अंगाला चिकटू दिले नाही. १६ फेब्रुवारी १९८० रोजी शरद पवारांचे सरकार इंदिरा गांधींनी बरखास्त केले आणि महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट आली. महाराष्ट्रात आलेली ही पहिली राष्ट्रपती राजवट. सरकार बरखास्त झाल्याबरोबर एक तासात एन.डीं.नी बंगला सोडला. मंत्र्यासाठी असलेली गाडी परत पाठवून दिली आणि मुंबई सेंट्रलच्या एसटी स्टॅण्डवरून ‘मुंबई-कोल्हापूर’ ही लाल डब्याची गाडी पकडून रात्रभर प्रवास करून ते कोल्हापूरला गेले. ही माणसे सत्तेत कधी रमली नाहीत. लोकांसाठी जगायचे या हेतूने आणि हिमतीने ही माणसे लढत राहिली. एन.डी. शरद पवारांचे मेहुणे. पवारसाहेबांची सख्खी बहीण सरोजताई एन.डीं.ची पत्नी. पण शरद पवारांच्या विरोधात आंदोलने करायला एन.डी. कधी मागे राहिले नाहीत.
महाराष्ट्रातल्या कितीतरी आंदोलनांचे नेतृत्व एन.डीं.नी केलेलं आहे. अन्नधान्याची टंचाई असताना इस्लामपूरला निघालेल्या मोर्चावर गोळीबार झाला. त्या गोळीबारात एन.डीं.चा सख्खा पुतण्या धारातीर्थी पडला. त्याचे पार्थिव तिथेच ठेवून एन.डी. मामलेदार कचेरीवर धडकले. आपल्या व्यक्तिगत दु:खाला सार्वजनिक दु:खात बुडवून ते मोकळे झाले. महात्मा फुले, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे ही एन.डीं.ची दैवते. ते प्राध्यापक असले तरी प्राध्यापकी नावालाच केली. सीमाप्रश्न असो, नाहीतर महागाई विरोधातला लढा असो, लढाऊ बाणा हा एन.डीं.चा स्वभाव. त्यात त्यांनी कधी तडजोड केली नाही. व्यक्तीद्वेषावर त्यांनी कधी राजकारणही केले नाही.
८० वर्षाचे असतानाही अलीकडची एन.डीं.ची सर्वात मोठी लढाई म्हणजे रायगड जिल्ह्यातील अंबानींच्या विरोधातली लढाई, सेझच्या विरोधातली लढाई. ही लढाई म्हणजे एकहाती लढाई होती. या लढाईतून एन.डी. पाटलांच्या आक्रमक नेतृत्वामुळेच सरकारला आणि रिलायन्सला माघार घ्यावी लागली. त्याचे नायक एन.डी.च होते. त्यावेळी केंद्र सरकारने एक धोरण जाहीर केले होते. रायगड जिल्ह्यातील पेण, उरण आणि पनवेल या तालुक्यातल्या ४५ गावातली तीस हजार एकर जमीन रिलायन्सने ताब्यात घ्यायची आणि ती विकसित करून तिथे उद्योग उभे करायचे. या सेझ प्रकल्पाला रायगडातल्या शेतक-यांनी जोरदार विरोध केला. त्या लढ्याचे नेतृत्व एन.डीं.नी केले होते. सरकारने जी मुदत जमीन संपादन करण्याकरिता दिली होती, त्या मुदतीत जमीन संपादन करणे शक्य झाले नव्हते. म्हणून रिलायन्सने मुदतवाढ मागितली. ती मुदतवाढ द्यायला एन.डीं.च्या नेतृत्वाखाली विरोध झाला आणि मग ही मुदतवाढ मागे घ्यावी लागली. याच रिलायन्स कंपनीने शेतक-यांची खूप मोठी फसवणूक केली होती. जमीन सहज मिळाली म्हणून साठेखत, खरेदी खत करताना शेतक-यांना पुनर्वसन पॅकेज दिले होते. त्यानुसार वरकड जमिनीसाठी एकरी पाच लाख, भातशेतीसाठी एकरी दहा लाख, असं पॅकेज ठरलं होतं. ही सगळी लबाडी होती. जमीन देणा-या शेतक-यांना विकलेल्या जमिनीपैकी साडेबारा टक्के भूखंड देण्याचे कंपनीने मान्य केले होते. भूखंड नको असेल तर आणखीन पाच लाख अशी खैरात कंपनीने केली. पण ती सगळी आकडेवारी लबाडीची होती. या सगळ्या फसवणुकीविरुद्ध शेतकरी रस्त्यावर उतरले आणि एन.डीं.नी त्यांचे नेतृत्व केले. एन.डी. काही रायगड या जिल्ह्यातले नाहीत. ते तसे मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातले. सांगली जिल्ह्यातही ते लढत राहिले. सेझचा लढा लढायला ते रायगडात आले. उत्तम व्याख्याते म्हणून एन.डी. महाराष्ट्राला परिचित आहेत. ते गोष्टीवेल्हाळही आहेत. अनेक किस्से,आठवणी आहेत. बेळगाव-कारवार सीमाप्रश्नासाठी चारा बंदीच्या काळातही एन.डीं.नी जोरदार लढा दिलेला आहे. बेळगावात बीडी जत्ती सरकारच्या विरोधात दत्ता पाटील, दि.बा.पाटील हे नंतर उतरले होते. त्यात एन.डी. अग्रेसर होते. चारा बंदीच्या चळवळीत दहा-दहा महिन्यांची शिक्षा झाली होती. कोल्हापूरच्या वरूणतीर्थावर सीमाप्रश्नासाठी फार मोठी परिषद झाली होती. त्या परिषदेत जयंतराव टिळक, एन.डी. पाटील आणि भाई ताराचंद्र शहा यांच्या भाषणांनी सीमा लढ्याला मोठी शक्ती मिळाली होती.
आजही हृदयाची शस्त्रक्रिया झाली असताना (ओपन हार्ट सर्जरी) नाइलाज म्हणून एन.डी. घरात पडून आहेत. सरोजताईंच्या भाषेत सांगायचे तर नाहीतर ते घरात कशाला थांबतील? घरात न थांबणारा आणि लोकांसाठी लढणारा, त्याचे नाव एन.डी.