प्रवासी आसनांची बिकट अवस्था, अस्वच्छता, जुन्या व मोडकळीस आलेल्या गाडया अशी एसटी महामंडळाची डागाळलेली प्रतिमा बदल्यणाकरता एसटी महामंडळाकडून प्रयत्न केले जात आहेत.
मुंबई- प्रवासी आसनांची बिकट अवस्था, अस्वच्छता, जुन्या व मोडकळीस आलेल्या गाडया अशी एसटी महामंडळाची डागाळलेली प्रतिमा बदल्यणाकरता एसटी महामंडळाकडून प्रयत्न केले जात आहेत.
त्यानुसार ३४ नव्या वातानुकूलित बस घेण्याचा निर्णय राज्य परिवहन महामंडळाच्या झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.
नव्याने दाखल होणा-या बसपैकी १७ व्होल्वो (शिवनेरी) तर १७ बस शिओनी कंपनीकडून घेण्यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
या निर्णयासंबंधी महामंडळाकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
या संदर्भात एसटीच्या अधिका-यांकडे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे नव्याने दाखल होणा-या बसच्या किमतींसंदर्भात कोणतीही माहिती समोर आलेली नाही. यापूर्वी एसटी महामंडळाच्या ताफ्यातील भाडयाच्या काही गाडया सेवेतून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
सध्या एसटी महामंडळाच्या ताफ्यात एकूण १७ हजार ५०० बस आहेत, त्यातील ११० वातानुकूलित बसपैकी ९० बस या भाडयाच्या आहेत. उर्वरित बस साध्या, निमआराम, मिडी बसेस असून, यातील काही बसची अवस्था अत्यंत वाईट आहे.
सध्या एसटी महामंडळाची शिवनेरी वातानुकूलित बसची वाहतूक मुख्यत: मुंबई-पुणे आणि नागपूर,औरंगाबाद या शहरांकरता मर्यादित आहे, मात्र येणा-या काळात एसटीच्या ताफ्यात नव्याने ३४ बस दाखल होणार असल्याने हे मार्ग वाढण्याची शक्यतादेखील वर्तवण्यात येत आहे.
याशिवाय नव्या १०० हायटेक बस महामंडळाकडून (लीजवर) घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याकरता सरकारच्या मंजुरीची आवश्यकता असून प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात आला आहे.