कल्याण-डोंबिवली महापालिकेने राज्य सरकारच्या सुवर्णजयंती नगरोत्थान अभियानांतर्गत कचरा वाहतुकीसाठी खरेदी करण्यात आलेल्या वाहनांचे टायर खराब झाल्याने नवीन टायर खरेदीसाठी १८ लाख ७७ हजार रुपयांच्या प्रस्तावास शनिवारच्या स्थायी समितीत मंजुरी दिली आहे.
कल्याण – कल्याण-डोंबिवली महापालिकेने राज्य सरकारच्या सुवर्णजयंती नगरोत्थान अभियानांतर्गत कचरा वाहतुकीसाठी खरेदी करण्यात आलेल्या वाहनांचे टायर खराब झाल्याने नवीन टायर खरेदीसाठी १८ लाख ७७ हजार रुपयांच्या प्रस्तावास शनिवारच्या स्थायी समितीत मंजुरी दिली आहे. मात्र ही रक्क म कंत्राटदाराच्या बिलातून वळती करण्यात येणार असल्याचे पालिको प्रशासनाने स्पष्ट केले.
पालिकेने कचरा उचलण्याचे खासगी कंत्राट अॅन्थोनी या कंपनीला दिले होते. कचरा वाहतुकीसाठी पालिकेने लहान व मोठ्या आकाराची १०० वाहने खरेदी करून कंत्राटदाला दिली होती. अॅन्थोनीकडून पाच प्रभाग क्षेत्रांतील कंत्राट काढून घेतल्यानंतर कंत्राटदाराने वाहने परत केली. मात्र वाहनांचे टायर झिजलेले आहेत. उर्वरित दोन प्रभाग क्षेत्रांतील प्रश्न न्यायालयात सुरू असल्याने अॅन्थोनीचे कंत्राट अजूनही रद्द झालेले नाही. पाच प्रभाग क्षेत्रांतील वाहनांचे टायर खराब झाल्याने ते बदलण्यासाठी प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर ठेवण्यात आला होता. एक टायर ४० हजार किलोमीटर चालल्यावर बदलण्याचा निकष आहे, मात्र हे टायर अवघे १३ ते १८ हजार किमी चालल्यानंतर बदलण्याची गरज काय, असा प्रश्न राहुल चितळे यांनी उपस्थित केला आहे, मात्र सभापती प्रकाश पेणकर यांनी या प्रस्तावास मंजुरी दिली आहे.