गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा कडाका वाढल्याने मुंबईकरांच्या जीवाची तगमग होत असून डोळयांचे विकार, पित्ताचा त्रास, अतिसार, डोकेदुखी आणि सर्दी आदी आजारांमुळे शहरवासीयांचे आरोग्य बिघडले आहे.
मुंबई- गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा कडाका वाढल्याने मुंबईकरांच्या जीवाची तगमग होत असून डोळयांचे विकार, पित्ताचा त्रास, अतिसार, डोकेदुखी आणि सर्दी आदी आजारांमुळे शहरवासीयांचे आरोग्य बिघडले आहे.
रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असताना वाढत्या तापमानामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत आहे. त्यामुळे बहुतांश लोकांना निर्जलीकरणाचा (डिहायड्रेशन) त्रास होत असल्याच्या तक्रारींत वाढ झाली आहे. उकाडा असह्य झाल्यानेअशक्तपणा व अन्य दुष्परिणामांना सामोरे जावे लागत आहे, असे तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे.
उष्णेतमुळे शरीरातून मोठया प्रमाणात घाम बाहेर पडत असतो. त्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी सातत्याने खालवते. त्यामुळे सतत तहान लागते. अशावेळी पाणी गाळून प्यावे अन्यथा दूषित पाणी प्यायल्यास जंतू संसर्गाने अतिसाराचा त्रास होण्याची शक्यता असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
काहींना उन्हात थकून आल्यानंतर थंडगार पाणी प्यायची सवय असते. पटापट पाणी प्यायल्याने घशाला त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे अतिथंड पेय पिणे टाळले पाहिजे. योग्य प्रमाणात थंड पेयांचा आस्वाद घ्यावा, असे ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’चे अध्यक्ष डॉ. जयेश लेले यांनी सांगितले.
उन्हाळयात रस्त्यावरील धुळीचे प्रमाणही वाढत असते. वाहनांमुळे ही धूळ डोळयांत गेल्यास डोळे चुरचुरणे, लालसर होणे असा त्रास होतो. धुळीचा त्रास जास्त प्रमाणात झाल्यास डोकेदुखीचा त्रास होतो. उष्ण वातावरणात डोळयांचे आरोग्य जपणे मोठे आव्हान आहे.
उन्हाळयात डोळ्यातून पाणी येणे, जळजळ होणे आदी त्रास होतात. त्यामुळे डोळयांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यास गंभीर आजार होऊ शकतो. सध्या रुग्णालयात उन्हामुळे डोळयाचा त्रास होणा-या रुग्णांची संख्या वाढत आहे. यासाठी उन्हात घराबाहेर पडताना काळया रंगाचा गॉगल वापरावा. तसेच घरी परतल्यावर कोमट पाण्याने डोळे स्वच्छ धुवावे, असा सल्ला नेत्रतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांनी दिला आहे.
तापमानाचा पारा आणखी वाढणार
तापमानात होणा-या वाढीमुळे उष्णतेचे प्रमाणही वाढत आहे. एप्रिलच्या सुरुवातीला तापमान ३६ अंश सेल्सिअसवर पोहोचल्याने उष्णतेने मागील अनेक वर्षाचा विक्रम मोडला आहे. मुंबईतील तापमानाचा पारा ३९ अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्याची शक्यता असल्याचे मुंबई हवामान खात्याचे प्रमुख व्ही. के. राजीव यांनी म्हटले आहे. एप्रिलच्या दुस-याच आठवडयात ही परिस्थिती निर्माण झाल्याने पुढील काही दिवसांत उन्हाच्या झळ आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.