कल्याणचा रेल्वे मार्ग थेट नवी मुंबईशी जोडण्याची कल्पना सध्या रेल्वे महामंडळ करत आहे. या प्रकल्पासाठी किमान ३५० कोटी रुपये अपेक्षित आहेत
मुंबई – कल्याणचा रेल्वे मार्ग थेट नवी मुंबईशी जोडण्याची कल्पना सध्या रेल्वे महामंडळ करत आहे. या प्रकल्पासाठी किमान ३५० कोटी रुपये अपेक्षित आहेत. हा मार्ग झाल्यानंतर कल्याण, कसारा, कर्जत परिसरातील रहिवाशांना नवी मुंबईकडे जाण्यासाठी ठाणे स्थानकात उतरून गाडी बदलण्याचा होणारा त्रास वाचणार आहे.
कल्याण, कर्जत, कसारा या मध्य रेल्वेच्या मार्गावरून दररोज हजारो प्रवाशांकडून ट्रान्सहार्बर मार्गाने नवी मुंबईत प्रवास सुरू असतो. मात्र ठाणे स्थानकातील गर्दीची समस्या सोडवण्यासाठी ट्रान्सहार्बरचा आणखी एक पर्याय आखला जात आहे. ऐरोली येथून कळव्यापर्यंत हा नवा मार्ग सुरू करण्यात येणार आहे.
ठाणे ते दिवा पाचवा व सहावा मार्ग टाकल्यानंतर त्याला हा मार्ग जोडण्यात येणार असल्याची माहिती महामंडळाचे अध्यक्ष राकेश सक्सेना यांनी दिली. या नव्या प्रकल्पामुळे डोंबिवली, कल्याण येथील प्रवाशांचा त्रास कमी होईल, असे सक्सेना यांनी सांगितले. मात्र या प्रकल्पासाठी रेल्वे बोर्ड, सिडको, महाराष्ट्र राज्य सरकारची परवानगी आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.