विलासरावांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून पक्ष वाढवण्यासाठी प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रयत्न करणे हीच ख-या अर्थाने विलासरावांना श्रद्धांजली ठरेल, अशा शब्दांत उद्योगमंत्री नारायण राणे यांनी मंगळवारी विलासरावांना श्रद्धांजली अर्पण केली.
मुंबई- ‘‘काँग्रेस पक्ष वाढावा यासाठी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी अहोरात्र कष्ट उपसले. त्यांचा आदर्श डोळय़ांसमोर ठेवून पक्ष वाढवण्यासाठी प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. काँग्रेसला ताकद देणे हीच ख-या अर्थाने विलासरावांना श्रद्धांजली ठरेल,’’ अशा शब्दांत उद्योगमंत्री नारायण राणे यांनी मंगळवारी विलासरावांना श्रद्धांजली अर्पण केली.
‘‘मी शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर पहिल्यांदा मला विलासराव यांचा फोन आला. त्यांनी मला विचारणा केली की, काय ठरवले आहे? मी म्हणालो, अजून काहीच नाही. त्यावर विलासराव म्हणाले, मग आमच्या पक्षात या. त्यांना मी विचारले, तुम्ही आता कुठे आहात? ते म्हणाले मी परदेशात आहे. त्यावर मी म्हणालो, तुम्ही भारतात आल्यानंतरच आपण सविस्तर बोलू. तुम्ही आल्याशिवाय मी कोणता निर्णय घेणार नाही. विलासराव आणि माझे ऋणानुबंध चांगले असल्यामुळे आमच्यात जिव्हाळा होता. सर्वांना घेऊन जाणे हा त्यांचा स्वभाव होता. याच स्वभावामुळे ते प्रत्येकालाच आपलेसे वाटायचे,’’ अशा शब्दांत नारायण राणे यांनी मंगळवारी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या आठवणी यावेळी जागवल्या.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने विलासराव देशमुख यांच्या अस्थी राज्यातील सर्व जिल्हा कार्यालयात ठेवण्यात येणार आहेत. मंगळवारी प्रदेश काँग्रेसच्या ‘टिळक भवन’ या मुख्यालयात विलासरावांच्या अस्थी दर्शनासाठी ठेवल्या होत्या. त्यावेळी राणे यांनी अत्यंत भावूक शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या.
‘‘आपल्या प्रत्येक सहका-याशी विलासराव सल्लामसलत करायचे. सर्वांना सोबत घेऊन जाणारा नेता म्हणून त्यांची ओळख होती. विलासराव आमदार, मंत्री, मुख्यमंत्री असताना मी त्यांना खूप जवळून पाहिले आहे. त्यांनी भूषवलेल्या सर्वच पदांना त्यांनी योग्य न्याय दिला. ते अत्यंत दिलदार आणि दिलखुलास व्यक्तिमत्त्व होते. विलासराव हयात नाहीत, या गोष्टीवर अजूनही माझा विश्वास बसत नाही.
त्यांच्या पश्चात काँग्रेस पक्ष मजबूत करणे ही जबाबदारी प्रत्येक कार्यकर्त्यांवर आहे. पक्ष मजबूत करणे हीच ख-या अर्थाने विलासरावांना श्रद्धांजली ठरेल, असेही राणे यांनी यावेळी सांगितले.
लोकांमध्ये मिसळणा-या नेत्याला महाराष्ट्र मुकला
बाभळगावचे सरपंच ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि त्यानंतर केंद्रीय मंत्रीपदी झेप घेऊन विलासराव देशमुख यांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले. लोकांमध्ये मिसळून लोकांसाठी काम करणे हाच खरा लोकशाहीचा आत्मा आहे. महाराष्ट्र अशा नेत्याला मुकला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विलासराव देशमुख यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांच्यावर मनापासून प्रेम करणा-या चाहत्यांना अस्थींचे दर्शन व्हावे, यासाठी प्रत्येक जिल्ह्यात अस्थिकलश पोहोचवण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या टिळक भवनात मंगळवारी दुपारी झालेल्या बैठकीत बसवराज पाटील नागराळकर यांनी शोकप्रस्ताव मांडला. त्यावर अनुमोदन देताना मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उद्योगमंत्री नारायण राणे, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, अल्पसंख्याकमंत्री नसीम खान, आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी, महिला व बालविकासमंत्री वर्षा गायकवाड आदी उपस्थित होते. शोक प्रस्तावानंतर विलासराव यांच्या अस्थी सर्व जिल्ह्यांतील काँग्रेस नेत्यांकडे सोपवण्यात आल्या. बैठकीच्या सुरुवातीलाच विलासराव देशमुख, विधानसभेचे माजी अध्यक्ष शंकरराव जगताप आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते प्रभाकरराव कुंटे यांना पुष्पांजली अर्पण करण्यात आली.
विधानसभेचे माजी अध्यक्ष शंकरराव जगताप आणि प्रभाकर कुंटे या नेत्यांनाही मुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. विलासराव देशमुख यांच्या अस्थिकलश दर्शनासाठी उपलब्ध करावा, अशी राज्यभरातील कार्यकर्त्यांची भावना होती. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्याला अस्थिकलश पाठवण्यात येणार आहे, असे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी सांगितले.