काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची बैठक सोमवारी २७ ऑक्टोबरला मुंबईत होत आहे. या बैठकीत काँग्रेसचा विधिमंडळ नेता निवडला जाणार आहे, अशी माहिती माणिकराव ठाकरे यांनी दिली.
मुंबई- काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची बैठक सोमवारी २७ ऑक्टोबरला मुंबईत होत आहे. या बैठकीत काँग्रेसचा विधिमंडळ नेता निवडला जाणार आहे, अशी माहिती माणिकराव ठाकरे यांनी दिली. या बैठकीसाठी काँग्रेसच्या सर्व आमदारांना निमंत्रित करण्यात आले आहे.
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला राज्यभरातून ४२ जागांवर विजय मिळाला आहे. जनतेने दिलेला जनादेश काँग्रेसने मान्य करत विरोधी पक्षात राहण्याचा निर्णय घेतला आहे. एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करण्याची काँग्रेसची भूमिका आहे. त्या दृष्टीने काँग्रेसचा विधिमंडळ पक्षाचा नेता निवडला जाणार आहे. यासाठी पक्षाच्या सर्व आमदारांना मुंबईत पाचारण करण्यात आले आहे.
या वेळी पक्षनिरीक्षक आमदारांची मते जाणून घेतील. त्यानंतरच कोणाला विधिमंडळ पक्षनेता करायचा याचा निर्णय घेतला जाणार आहे. जर भाजप आणि शिवसेनेने सरकार स्थापन केले तर काँग्रेस हा विधिमंडळातील मुख्य विरोधी पक्ष असेल.
विधिमंडळ पक्षनेता कोण होणार, याबाबत उत्सुकता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने अजित पवार यांनी विधिमंडळ पक्षाचा नेता म्हणून निवड केली आहे. तर आर. आर. पाटील यांची गटनेता म्हणून निवड करण्यात आली आहे.
शिवसेनेने विधिमंडळ पक्षाचा नेता निवडण्याचे सर्व अधिकार हे पक्षप्रमुखांना दिले आहेत. तर दिवाळी झाल्यानंतर भाजप आपला विधिमंडळ पक्षाचा नेता निवडणार आहे. त्यामुळे दिवाळीनंतरच ही सर्व प्रक्रिया पूर्ण होईल.