कांदळवनांची तोड आणि वाढणा-या झोपड्या दहिसरच्या मुळावर उठल्या असून; मुंबईपासून जवळच असलेल्या या उपनगराची वाढ बकालता आणि अस्ताव्यस्ततेकडे होत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
मुंबई- कांदळवनांची तोड आणि वाढणा-या झोपड्या दहिसरच्या मुळावर उठल्या असून; मुंबईपासून जवळच असलेल्या या उपनगराची वाढ बकालता आणि अस्ताव्यस्ततेकडे होत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तरी या शहराच्या सुधारणेकडे लक्ष द्या, अशी गळ या परिसरातील नागरिकांनी महापालिकेला घातली आहे.
कधी काळी गावठाण म्हणून दहिसरची ओळख होती. ही ओळख आता पूर्णत: संपुष्टात आली आहे. त्या काळी या भागात आगरी, कोळी लोकांची संख्या मोठी होती. या ठिकाणी आता छोटय़ा वसाहती, गर्दीने ओसंडणारी नगरे, चाळी आणि एलआयसी-आयसी कॉलनी यासोबतच उंचच उंच इमारती झाल्या आहेत. मुंबईची लोकसंख्या वाढली तशी या शहरात वास्तव्याला येणा-या लोकांचीही संख्या वाढली आहे. पूर्वी मराठी, गुजराती, ख्रिस्ती, आगरी, मुस्लीम आणि दक्षिण भारतीय अशी सीमित वस्ती होती. आता यात आणखीनच वाढ होताना दिसत आहे.
येथूनच काही किलोमीटरवर असलेल्या ‘दहिसर नदी’चे पाणी पूर्वी येथील लोक पिण्यासाठी वापरत होते. या नदीत येथील रहिवासी अंघोळ करायचे, अशा आठवणी येथील जुनेजाणते नागरिक सांगतात. दुस-या महायुद्धाच्या काळात याच दहिसरमध्ये श्रीमंत गुजराती, पारसी लोक आठवडाअखेर विश्रांतीसाठी येत असायचे, अशा आठवणीही काही जण सांगतात. आज मात्र या नदीचे पात्र आक्रसले आहे. नदीकिनारीच्या कांदळवनांची तोड करून झोपडय़ा उभारल्या जात आहेत. आजूबाजूच्या वस्त्यांतून निघणारे सांडपाणी या नदीत सोडण्यात येत असल्याने नदीला गटाराचे रूप आले आहे. अनेकदा या नदीची साफसफाई करण्यात आली आहे, मात्र हे प्रयत्न अपुरे असून; महापालिका आणि राज्य सरकारने एकत्रित प्रयत्न करून या नदीची स्वच्छता केली पाहिजे, असा सल्ला येथील नगरसेवक देतात. आजूबाजूच्या वस्त्यांतून या नदीत सोडण्यात येणार सांडपाणी या नदीचे पाणी दूषित करत असल्याचेही त्यांचे मत आहे.
दुसरीकडे, दहिसर हे मुंबईत येण्याचे प्रवेशद्वार असल्याने या भागात मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी दिसते. त्यातून होणा-या प्रदूषणालाही हे शहर तोंड देत आहे. याशिवाय येथील आनंदनगर भागात दिवसेंदिवस वाढणा-या झोपडय़ा हीदेखील मोठी समस्या आहे. महापालिकेकडून मात्र या झोपडय़ांना आळा घालण्यासाठी कोणतीही ठोस पावले उचलली जात नसल्याची खंत या भागातील नागरिकांनी व्यक्त केली. येथील गणपत पाटील नगरमध्ये कांदळवनांची होणारी तोड ही गंभीर समस्या आहे. या समस्येकडेही कुणी लक्ष देत नसून; येथे उभ्या राहणा-या झोपडय़ांमागे मोठे षड्यंत्र असावे, अशी शक्यता या भागातील नागरिक व्यक्त करतात. या ठिकाणी उभ्या राहणा-या झोपडय़ांतील नागरिकांनाही विविध समस्यांमुळे अनारोग्याला सामोरे जावे लागत आहे. झपाटय़ाने वाढणा-या गणपत नगर भागात ३० हजारहून अधिक स्थलांतरित कामगार राहतात. हे कामगार म्हणजे येथील नेत्यांसाठी हक्काची वोट बँक झाली आहे. महापालिका अधिकारी आणि स्थानिक नेत्यांच्या हातमिळवणीमुळे या ठिकाणी गुन्हेगारीही वाढत असल्याचा आरोपही येथील नागरिकांनी केला आहे.