‘कामशास्त्र’ हा तसा जिव्हाळयाचा विषय. तरीही त्याविषयी स्पष्टपणे बोलण्यास संकोच व्यक्त केला जातो. भारतात प्राचीन काळी या विषयावर ग्रंथ लिहिण्यात आले आहेत. चौथ्या शतकात वात्स्यायनाने लिहिलेला ‘कामसूत्र’ हा ग्रंथ त्यापैकीच एक. पुरातन लेणी-देवळांच्या भिंती-घुमटांवर स्त्री-पुरुषांच्या समागमाची चित्रं-शिल्प दिसतात. तरीही त्याची फारशी चर्चा होत नसे. या विषयाचं ज्ञान केवळ स्त्रीरोगशास्त्र आणि प्रसूतिशास्त्राच्या पुस्तकात देण्यात येत असे. त्यामुळे डॉक्टरांनादेखील कामशास्त्राविषयीचं शिक्षण मिळणं अवघड असे. या परिस्थितीत डॉ. विठ्ठल प्रभू यांनी ‘कामशास्त्रा’चा अभ्यास केला, फक्त केलाच नाही तर त्या शास्त्राला ‘कामविज्ञानशास्त्र’ अशी नवी ओळख मिळवून दिली. तारुण्याच्या काळात उद्भवणा-या समस्या, लग्नानंतरचा सल्ला, रजोनिवृत्तीच्या काळातील समस्या, लैंगिक शिक्षण या विषयावर विपुल लेखन केलं. त्यातून कित्येकांचं वैवाहिक जीवन सुखी केलं. स्त्री-पुरुष लैंगिकतेविषयीचे समज-गैरसमज दूर केले आणि अश्लील म्हणून पाहिल्या गेलेल्या या ‘कामजीवन’ या विषयाकडे सामान्यांपासून असामान्यांपर्यंत सगळ्यांचं लक्ष वेधलं. वयाच्या ८८व्या वर्षीही कार्यरत असलेले प्रभू कामशास्त्राविषयी बोलतात, तेव्हा या विषयाचा शास्त्रीयच नव्हे तर सामाजिक पैलूही उलगडला जातो.
वैद्यकशास्त्रात अभ्यासाचे इतके विषय, इतक्या अभ्यासशाखा असताना ‘कामविज्ञानाशास्त्र’ (सेक्सोलॉजी) याच विषयाची निवड का केलीत?
>‘कामविज्ञानतज्ज्ञ’ (सेक्सोलॉजिस्ट) कसा झालो, या प्रश्नाचं उत्तर देण्याआधी मुळात मी करिअर म्हणून डॉक्टरकीची का निवड केली, तो किस्सा रंजक आहे. अक्षरश: ज्योतिषीबुवांच्या कृपेने मी डॉक्टर झालो, असं मी म्हणेन. त्याचं झालं असं की, आई-वडिलांना आम्हा चार भावांची मुंज करायची होती. मुंजीसाठी मुहूर्त लागतो आणि मुहूर्तासाठी जन्मपत्रिकेची गरज असते. त्यामुळे आई आम्हा चारही भावंडांच्या जन्मपत्रिका बनवण्यासाठी एका प्रख्यात ज्योतिषाकडे गेली. त्या ज्योतिषाकडे त्याकाळचे चित्रपट निर्माते मुहूर्त काढायला येत असत. त्या ज्योतिषाने पत्रिका बनवून देताना आम्हा भावंडांची भविष्यंही सांगितली. तीन भावंडांची भविष्यं चांगली होती, परंतु माझी पत्रिका पाहून ते म्हणाले, ‘‘हा मुलगा ‘ढ’ आहे. पुस्तकांवरील धूळ साफ करण्यापलीकडे तो काहीही शिकणार नाही.’’ हे भविष्य ऐकताना नऊ वर्षाचा मी एकदम हादरलोच! तेव्हा जो भीतीचा किडा माझ्या डोक्यात शिरला तो ‘एमबीबीएस’ होईपर्यंत टिकून राहिला. कारण माणसाला नशीब घडवतं, ही माझी त्यावेळचीही धारणा होती. ज्योतिषांनी वर्तवलेल्या भीतीपोटी मी इतका अभ्यास केला की, मॅट्रिकचं वर्ष सुरू होण्यापूर्वी आणि नंतर असा दोनदा आजारी पडलो. तेव्हा डॉक्टर व्हावं, असं कधीच वाटलं नव्हतं. मॅट्रिक होणं इतकंच काय ते माझं लक्ष्य होतं. महत्त्वाच्या वर्षाला दोनदा आजारी पडल्यामुळे वर्गशिक्षकांनी मागच्या वर्गात बसायला सांगितलं. एकही वर्ष फुकट न घालवता अभ्यास करणं हे माझं ध्येय होतं. त्यामुळे मी ‘सोशल सव्र्हिस लीग नाइट हायस्कूल’मध्ये जाऊ लागलो. १९४७ साली मॅट्रिकची परीक्षा ५९ टक्के गुणांनी उत्तीर्ण झालो. सरांनी एसएसएलसीला बसण्याचा सल्ला दिला. या परीक्षेला बसल्याने सरकारी नोकरी लवकर मिळते. त्यामुळे कारकून होण्याचं उद्दिष्ट डोळयांसमोर ठेवून टायपिंग शिकून घेतलं. भावाच्या आग्रहाखातर सिद्धार्थ कॉलेजमध्ये जाऊ लागलो. इंटरला ५० टक्के मिळाले. मधु दंडवते सरांची कृपा. त्यांनी माझ्यावर घेतलेल्या मेहनतीमुळे ५० टक्के गुण मिळाले. इंटर झाल्यावर वैद्यकशाखेत जायचं की, अभियांत्रिकी, असा प्रश्न होता. माझे जीवशास्त्र, गणित, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र हे विषय चांगले होते. त्यामुळे परळच्या जीएस मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. मन लावून अभ्यास करून डॉक्टर झालो. गंमत म्हणजे, ज्या ज्योतिषांनी मी फारसा शिकणार नाही, असं भाकित केलं होतं, त्यांच्याकडून माझ्या दवाखान्याच्या उद्घाटनाचा मुहूर्त काढून घेतला. हे सारं केवळ जिद्दीच्या बळावर केलं.
जीएस मेडिकल कॉलेजमधून ‘एमबीबीएस’ची पदवी मिळाल्यावर लगेचच ‘कामविज्ञानशास्त्र’ या वैद्यकशाखेच्या अभ्यासाला सुरुवात केली नाही. पदवी मिळाल्यानंतर जनरल प्रॅक्टिशनर म्हणून काम करू लागलो. याच काळात माझ्या कानावर एक बातमी आली. एका नवविवाहित महिलेने आत्महत्या केली होती. तिच्या मृतदेहापाशी पोलिसांना चिठ्ठी सापडली. त्यात तिने लिहिलं होतं, ‘माझ्या नव-याने माझ्यावर बलात्कार केला आहे. आता हे शरीर अपवित्र झालं आहे. त्यामुळे जगण्यात काही अर्थ नाही. म्हणून मी माझं आयुष्य संपवत आहे.’ मुलीच्या आत्महत्येचं कारण ऐकून मी अचंबित झालो. खरं तर लग्नानंतर नवराबायकोच्या खाजगी आयुष्याची माहिती प्रत्येक मुलीला तिच्या आईने किंवा घरातील वडीलधा-या स्त्रीने देणं गरजेचं असतं. साधारण साठ ते सत्तर वर्षापूर्वी तसं सांगण्याची प्रथा नव्हती. दुर्दैवाने ती मुलगी त्याकाळच्या परिस्थितीची बळी ठरली. त्या मुलीने असं का केलं असावं, हा विचाराचा भुंगा माझ्या मनाला पोखरू लागला. ‘एमबीबीएस’ला स्त्री-पुरुषाची शरीररचना शिकताना आमच्या एका प्राध्यापकांचं म्हणणं मला आठवलं. ‘स्त्री आणि पुरुषाचं खासगी आयुष्य हे कामविज्ञानशास्त्राशी संबंधित आहे. याविषयी जागृती होणं गरजेचं आहे. कामविज्ञानशास्त्रावर वैवाहिक जीवन, कुटुंब, मुलं, नवरा-बायकोचे नातेसंबंध अधारित आहेत.’ या वाक्यांशी त्या मुलीच्या आत्महत्येचा संबंध असू शकतो काय, यावर अभ्यास सुरू केला. अभ्यासातून हळूहळू कामविज्ञानशास्त्र या विषयाचा व्यासंग वाढला.
पुढचं करिअर याच विषयातून करावं असं का वाटू लागलं?
>कामविज्ञानशास्त्र ‘प्रभू’ कामविज्ञानशास्त्रावर तेव्हा आपल्याकडे फारशी पुस्तकं मिळायची नाहीत. खूप शोधल्यावर दारूखान्यात पुस्तकं मिळाली. त्याही दुकानदाराने मला ती स्वस्त दरात देऊन टाकली. ही पुस्तकं बारकाईने वाचायला मला वर्ष लागलं. या पुस्तकांचा अभ्यास करताना एक गोष्ट लक्षात आली की, ‘काम’ (सेक्स) याचा संबंध हा फक्त वैद्यकीय शाखेशी नाही तर मानसशास्त्र, मानववंशशास्त्र, समाजशास्त्र यांच्याशी आहे. कामजीनवाच्या इतक्या व्यापक दृष्टिकोनाशी समाज वंचित राहू नये, तसंच कामविज्ञानशास्त्राची जागृती समाजात वाढावी, या उद्देशाने पुढे भविष्यात या विषयाचा सखोल अभ्यास करण्याचं ठरवलं. हा अभ्यास करताना माझी अवस्था ब-याचदा भरसमुद्रात एकटा पडल्यासारखी व्हायची. तरीही अभ्यास करण्याची चिकाटी सोडली नाही. अभ्यास करताना मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात प्रा. रं. धो. कर्वे, आचार्य बाळाचार्य कुपेरकर यांची पुस्तकंवाचयला मिळाली. के. पी. भागवतांचं वैवाहिक जीनवही वाचलं. प्रा. रं. धो. कर्वेच्या ‘समाजस्वास्थ्य’ या मासिकाचे काही अंक वाचले. चौथ्या शतकातील वात्स्यायनाच्या ‘कामसूत्र’ या संस्कृत भाषेतील ग्रंथाचं आचार्य बाळाचार्य कुपेरकरांनी मराठीत भाषांतर केलं आहे. तसंच ‘कामसूत्र’ या ग्रंथावर जयमंगलम या विद्वानाने संस्कृत भाषेतून टीकाही केली आहे. त्या टीकेचेही बाळाचार्यानी मराठीत भाषांतर केलं आहेत. शिवाय या दोन्ही ग्रंथांच्या तौलनिक अभ्यासाची टिपणंही काढली आहेत. या साहित्याचा बारकाईने अभ्यास करताना रं. धों. चं साहित्य क्रांतिकारी वाटलं. तर वात्स्यायन या ऋषीचा ‘कामसूत्र’ हा ग्रंथ पुरुषधार्जिणा वाटला. बाल्यावस्थेत मुलांना विद्या, यौवनात कामजीवन आणि वृद्धापकाळात मोक्ष यांची गरज असते, असं वात्स्यायनाचं म्हणणं आहे. तसंच चौथ्या शतकातील वात्स्यायन आणि विसाव्या शतकातील आल्फ्रेड किन्से, मास्टर्स अॅण्ड जॉन्सन या विचारवंतांच्या विचारात जवळजवळ ६० टक्के साधम्र्य असल्याचंही माझ्या लक्षात आलं.
१९६०-७०च्या दशकात आपल्याकडे सेक्सोलॉजी करिअर म्हणून निवडणं खूप धाडसाचं होतं. त्यावेळी तुम्हाला कसा अनुभव आला?
> या विषयावर फारसा कुणी अभ्यास करत नव्हतं. अभ्यास करताना मन दोलायमान झालं. एक मन सांगायचं की, हे सारं समाजाच्या हितासाठी आहे. मात्र या विषयावर आमच्या वैद्यकीय क्षेत्रात फारसं बोललं जायचं नाही. या विषयावरची पुस्तकंही फारशी मिळायची नाहीत. माझे मित्र तर मला नेहमीच सांगायचे, ‘काय, रे तू स्पशेलायझेशनसाठी याच शाखेची का निवड केलीस?’ शेवटी कुतूहल माणसाला स्वस्थ बसू देत नाही. मी अभ्यास करायचो, हा अभ्यास करणारे माझ्यासारखे इतर डॉक्टर्स होते त्यांच्याशी चर्चा करायचो, स्वत:जवळ दोन व्हिजिटिंग कार्ड ठेवायचो. जनरल प्रॅक्टिशनरचं आणि दुसरं होतं सेक्सॉलॉजिस्ट.
कामविज्ञानशास्त्राचा अभ्यास करत असताना आम्ही समविचारी लोकांनी एकत्र येऊन ‘कौन्सिल ऑफ सेक्स एज्युकेशन अँड पॅरेंटिंग’ या संस्थेची स्थापना केली. या संस्थेचं काम करताना दुस-या कार्डचा वापर करायचो. माझ्या एका मित्राला माझं ‘कामविज्ञानशास्त्रा’वरचं पुस्तक भेट दिलं. ते पुस्तक त्याने ज्ञानेश्वरीजवळ ठेवलं. तेव्हा त्या मित्राची बायको त्याच्यावर भरपूर वैतगली. ‘अहो हे पुस्तक तुम्ही ज्ञानेश्वरीजवळ का ठेवलंत?’ असा प्रश्न विचारून तिने त्याला सज्जड दमच भरला. कामविज्ञानशास्त्राच्या जागृतीबद्दल काम करतोय, याचं नामवंत मंडळींना कौतुक होतं. पु. ल. देशपांडे यांनी तर माझं अनेकदा कौतुक केलं. सचिन तेंडुलकरचे वडील रमेश तेंडुलकर यांनी गं. मा. फडके व्याख्यानमालेंतर्गत माझी सलग तीन व्याख्यानं मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या सुरेंद्र गावस्कर सभागृहात ठेवली. त्या व्याख्यानांना पुरुषवर्गाचीच उपस्थिती होती.
एकही स्त्री उपस्थित नव्हती म्हणून त्या व्याख्यानांना आलेली माझी डॉ. पत्नी आणि मुलगी दोघीही निराश होऊन निघून गेल्या. तेंडुलकरांनीच माझं दुसरं व्याख्यान कीर्ती महाविद्यालयात ठेवलं होतं. त्या व्याख्यानांना एकही महिला प्राध्यापिका, विद्यार्थिनी, कारकून उपस्थित नव्हत्या. लोकजागृतीसाठी कामविज्ञानशास्त्रावर मी पुस्तकं लिहिली. एकदा सहजच मी एका विक्रेत्याकडे गेलो. पुस्तकाला रिस्पॉन्स कसा आहे, म्हणून विचारलं. त्यावर तो माझ्या पिकलेल्या केसांकडे आपलं हसू लपवत म्हणाला, ‘काय राव, तुम्हाला हे शोभतं का या वयात?’ मला त्यावर काय प्रतिक्रिया द्यावी, हेच सुचलं नाही.
यात घरच्यांचं तुम्हाला कसं सहकार्य लाभलं?
> खूप चांगलं. माझी पत्नी, मुलगी, मुलगा डॉक्टर असल्यामुळे त्यांना माझ्या कामाविषयी कायमच आदर राहिला आहे. मुकुंदराव किर्लोस्कारांच्या पत्नी शांताबाई किर्लोस्कर, ‘फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन’च्या सर्वेसर्वा आवाबाई वाडिया, डॉ. वात्सा या मंडळींचं भरपूर प्रोत्साहन मिळालं. त्यांच्या कौतुकाची थाप सदैव पाठीवर असायची. कारण त्या काळात मी ‘काम’ या विषयावर वैज्ञानिक दृष्टिकोन डोळयांसमोर ठेवून कार्य केलं होतं. उदाहरणच घ्यायचं तर आहारात ‘आहारशास्त्र’ आणि ‘पाकशास्त्र’ या दोन वगेवेगळ्या गोष्टी आहेत, तसं काम या विषयात ‘कामविज्ञानशास्त्र’, ‘कामसुख’ या दोन निराळया संकल्पना आहेत.
या क्षेत्रातील तुमचे आदर्श कोण?
> अर्थातच थोर गणितज्ज्ञ प्रा. र. धों. कर्वे. भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे चिरंजीव असलेल्या रधोंनी कामविज्ञानाचा प्रसार करण्यासाठी जीवाचं रान केलं. त्यांनी १९२१ पासून संतती नियमनाच्या प्रसाराला सुरुवात केली. भारतातील पहिल्या संतती नियमन केंद्राची सुरुवात रधोंनी केली. चांगला पगार असलेली प्राध्यापकाची नोकरी सोडून त्यांनी संतती नियमनाची साधनं विकायला सुरुवात केली. १९२७ साली ‘समाजस्वास्थ्य’ हे मासिक सुरू केलं. भारतीयांनी वेळीच संतती नियमन केलं नाही, तर त्यांची अन्नान्नदशा होईल, याची कल्पना त्यांना प्रथम आली. त्यावेळी हा विषय सर्वानी थट्टेवारी नेला. मार्गारेट सँगर, मारी स्टॉप्स आणि रधों यांनी सुमारे एकाच वेळी संतती नियमनाच्या प्रसाराला सुरुवात केली होती. परंतु त्या दोघींना जितकी प्रसिद्धी मिळाली तशी रधोंना मिळाली नाही. एकही मूल झालं नसताना, परिस्थितीखातर आपल्याला मुलं नकोत म्हणून आणि नसबंदीमुळे नपुंसकत्व येत नाही, हे दाखवण्यासाठी त्यांनी स्वत:वर नसबंदीची शस्त्रक्रिया केली. डॉक्टर नसतानाही त्यांचा वैद्यकीय विषयाचा अभ्यास दांडगा होता. लोकशिक्षणाचं महत्त्व वाटत असल्यामुळे त्यांनी ‘समाजस्वास्थ्या’तून अनेक विषयांवर अभ्यासपूर्ण लेख लिहिले. त्यांच्या हयातीत लोकांनी त्यांची मतं स्वीकारली नसली तरी ती आज ती लोकांना पटत आहेत. स्त्रीला किती मुलं व्हावीत हे तिने ठरवावं, एका कुटुंबाला दोन मुलं पुरेत, विवाहासाठी मुलीचं वय किमान १८ आणि मुलाचं वय किमान २१ वर्षे असावं, पती हा देव नसतो, स्त्रियांच्या कुंकू लावण्याचा आणि सौभाग्याचा संबंध नाही, विधवा स्त्रियांनी पुनर्विवाह करावा, स्त्रियांना व्यक्तिस्वातंत्र्य असावं, गर्भपात करवून घेण्याचा हक्क स्त्रीला मिळावा, रोगांच्या उपचारांपेक्षा प्रतिबंधाकडे अधिक लक्ष द्यावं हे विचार त्यांनी त्याकाळी मांडले. र. धों. कर्वे हे तत्कालीन समाजापेक्षा शंभर र्वष पुढे होते. ‘आधुनिक कामशास्त्र’, ‘गुप्तरोगापासून बचाव’, ‘संतती नियमन : विचार आणि आचार’, ‘वेशाव्यवसाय’ ही पुस्तकं लिहून त्यांनी कामविषयक ज्ञानाच्या प्रसारात मोलाची भर घातली आहे. अशा निरपेक्ष कार्यकर्त्यांचा कोणाला अभिमान नसणार? या अभिमानापोटी मी माझं ‘निरामय कामजीवन’ हे पुस्तक रधोंना समर्पित केलं आहे.
र. धों. कर्वेनी लैंगिक शिक्षण आणि संतती नियमनावर इतकी जागृती करून तुम्हाला त्याच विषयांवर का काम करावं लागलं?
> महत्त्वाच्या कारणांबद्दल सांगतो. एक तर आपल्याकडे कुटुंबनियोजन, वासनाकांडं, एड्स, वाढणारे घटस्फोट यामुळे लैंगिक शिक्षणाचं महत्त्व अधिकाधिक पटू लागलं आहे. मात्र ते योग्य रीतीने दिलं जातं का, याविषयी शंका आहे. गेल्या वीसेक वर्षात समाजात परिवर्तनाचे वारे वाहू लागल्याचं दिसतं. काही शाळांत लैंगिक शिक्षण द्यायला सुरुवात केलेली आहे. पण देशात सर्वत्र लैंगिक शिक्षणाचा प्रसार आढळत नाही. दिल्या जाणा-या लैंगिकता शिक्षणात एकसूत्रता, सर्वागीण स्वरूपात आढळत नाही. तसंच आपल्या भारतात प्रशिक्षित कामविज्ञानतज्ज्ञ (सेक्सोलॉजिस्ट) फारच थोडे आहेत. वैदू मात्र भरपूर आहेत. वैदूंचं प्रमाण कमी व्हायचं असेल, तर तज्ज्ञांचं प्रमाण वाढलं पाहिजे. काही समस्यांचं मूळ अज्ञानात असतं. संबंधितांना पुरेशी माहिती दिली की त्यांची समस्या सुटते. मुळात आपली समस्या सुटावी, असं फार कमी जणांना वाटतं.
कामजीवनाविषयी बोलताना किंवा त्यातून निर्माण होणा-या समस्यांवर लिहिताना, ते मुद्दे भाषण-व्याख्यानांतून मांडताना तुम्ही सामाजिक दृष्टिकोन डोळयांसमोर ठेवून बोलता की वैद्यकीय दृष्टिकोन?
> बोलण्याचा पाया हा वैद्यकीय शिक्षणाचा असतो. मात्र सामाजिक दृष्टिकोन डोळयांसमोर ठेवून बोलावं लागतं. मुलगी मुलाच्या प्रेमात पडल्यावर त्यांना लग्न करावंसं वाटतं. ते कधी मुलीच्या घरच्यांना पसंत नसतं, तर कधी मुलाच्या. अशा केसेस माझ्याकडे आल्यावर मी त्या दोघांना आधी ‘प्रेम’ ही व्याख्या नेमकी काय आहे हे समजावून सांगतो. मुलं-मुली वयात येतात, तेव्हा त्यांना प्रमोशन मिळतं. मुलाचं रूपांतर पुरुषात, तर मुलीचं रूपांतर स्त्रीमध्ये होतं. दोघंही प्रजोत्पादनक्षम होतात. स्त्रीला पुरुषाचं आणि पुरुषाला स्त्रीचं आकर्षण वाटणं यात निसर्गाचा उद्देश वंशसातत्य टिकवणं हाच असतो. या आकषर्णाची काही खास वैशिष्टयं असतात. हे आकर्षण चटकन आणि कुणाच्याही बाबतीत निर्माण होतं. यात मागचापुढचा विचार होत नाही. कौतुकाचा भाग अधिक असतो. एखाद्या पैलूवर खूश होऊन हे होतं. (उदा. तिचे लांब केस किंवा त्याची बुद्धिमत्ता, देखणेपण वगैरे.) ती व्यक्ती जवळ आल्यावर छातीत धडधडतं. कानशिलं गरम होतात. नंतर तिची सतत आठवण येते. या वयात शरीरात डोपामिन, फेनिलएथिल अमाईन आणि ऑक्सिटोसिन ही तीन रसायनं निर्माण होतात. या रसायनांमुळे आकर्षण निर्माण होतं. कालांतराने १८ ते ३० महिन्यांनंतर ही रसायनं स्र्वणं कमी होतं. तेव्हा आकर्षणाचा भर ओसरण्याची शक्यता अधिक असते. या आकर्षणाला ‘प्रेम’ समजल्यामुळे घोटाळा होतो. प्रेम हे सावकाश आणि टप्प्याटप्याने होत असतं. सर्वात आधी ओळख, त्यानंतर सहवास, त्यातून मैत्री, अनेक मित्रांतून एखाद्या मित्राची-मैत्रिणीची निवड होते. मनं जुळतात तेव्हा प्रेमात रूपांतर होतं. कथा-कादंब-यांत प्रेमाचं जे वर्णन येतं, ते खरं प्रेम नाही. अशा विवाहानंतर दोघांनाही एकमेकांच्या स्वभावाचं खरं स्वरूप स्पष्ट होतं. विवाहापूर्वी एकमेकांच्या अपेक्षा उंचावलेल्या असतात. आपली निवड चुकली हे विवाहानंतरच कळून येतं. प्रेमात पडल्यावर दोन-तीन र्वष वाट पाहावी. एकमेकांच्या आवडीनिवडी पाहाव्यात. कसोटीला उतरल्यास विवाह करावा.
या विषयांवर पुस्तकं लिहावीशी का वाटली? तुमची एकूण किती पुस्तकं प्रकाशित झाली आहेत?
> ‘एमबीबीएस’च्या अभ्यासक्रमात आम्हाला असं शिकवलं जायचं की, एक शुक्राणू आणि स्त्रीबीज यांचं मिलन झाल्यावर गर्भधारणा होते. मात्र गर्भधारणा होतेवेळी समागम होताना स्त्री-पुरुषांची मानसिकता कशी असते किंवा कशी असायला हवी आणि ती का असायला हवी यावर फारसं शिकवलं जायचं नाही. ‘कामविज्ञानशास्त्र’ या विषयाचा अभ्यास करताना मला केस स्टडीज अभ्यासता आल्या. त्यातून आम्ही ‘कौन्सिल ऑफ सेक्स एज्युकेशन अँड पॅरेंटिंग’ या संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून आम्ही परिसंवाद भरवायचो. कार्यशाळा घ्यायचो. तेव्हा असं लक्षात आलं की, आपल्याकडे असाही एक मोठा वर्ग आहे की ज्याला याविषयी जागृती हवी आहे. पण तो उघडपणे कुणाशी बोलू शकत नाही. त्यांच्यासाठी पुस्तकं प्रकाशित केली. कामविज्ञानशास्त्र हे सर्वसमावेशक शास्त्र आहे. ते ७०० ते १००० शब्दांच्या मर्यादेत बसवून चालणार नाही. कधी कधी लेख एकांगी होतात. लैंगिक इंद्रियांविषयी, लैंगिक संबंधाविषयी लोकांच्या मनात आजही भरपूर समज-गैरसमज आहेत. अनेकदा वृत्तपत्रांतून लैंगिक समस्यांच्या प्रश्नोत्तरांची सदरं वाचनात येतात. ‘माझं एका मुलीवर प्रेम आहे. मला तिच्याशी संबंध ठेवायचे आहेत. मी काय करू?’ अशा आशयाचे प्रश्न असतात. प्रश्न विचारणारे १६ ते २५ वर्षे या वयोगटातील असतात. त्यावर बेधडक उत्तरं दिलेली असतात. ‘अच्छा मग तुम्ही कंडोमचा वापर करा. गर्भनिरोधकं वापरा!!!’ ही उत्तरं झाली का? अशा उथळ तकलादू उत्तरांनी ‘कामविज्ञान शास्त्र’ हा चेष्टेचा विषय ठरतो. तसंच गर्भनिरोधकं, कंडोम, पिल्स यांची अप्रत्यक्षरीत्या जाहिरात करण्याची ही क्लृप्ती असते. अशा उत्तरांना अर्धवट माहिती असणारे सहज बळी पडतात. कामविज्ञानशास्त्राबाबत समाजाचा सकारात्मक दृष्टिकोन निर्माण व्हायला पाहिजे, यासाठी पुस्तकाची निर्मिती केली. एकूण ३५ पुस्तकांची निर्मिती केली आहे. त्यातील ‘निरामय कामजीवन’ या पुस्तकाची तिसावी आवृत्ती निघाली आहे.
‘कामजीवन’ या विषयावरील तुमच्या भाषणं, परिसंवादांना श्रोत्यांचा प्रतिसाद कसा लाभतो?
> ही भाषणं तसंच परिसंवादांना मध्यमवर्गीय, स्त्रिया आणि मध्यमवयीन लोकांचा प्रतिसाद चांगला लाभतो. हल्ली तर पूर्वीपेक्षा जास्त उपस्थिती असते. पूर्वी तरुणवर्ग जास्त असायचा. मात्र इंटरनेटचा विस्तार जसा होतोय, तसा तरुण वर्गाचा सहभाग कमी होतोय.
लैंगिक संबंधांतून होणा-या आजारांविषयी आपल्या समाजात अजूनही जागृती नाही?
> जागृतीपेक्षा गैरसमजच जास्त आहेत. लहान मुलींच्या योनीवर शिश्नाचं घर्षण केल्यास परमा बरा होतो. या गैरसमजापोटी निष्पाप बालिकांना हा रोग होतो. किती प्रकारचे गुप्तरोग आहेत, हेही लोकांना माहीत नाही. गोनो-हिया, सिफिलीस, शँक्रॉइड, लिंफोग्रॅन्युलोमा व्हेनेरिअम, ग्रॅन्युलोमा इंग्वाय्नेल, व्हेनेरिअल वॉर्ट, हर्पिस जेनिटालिस, नॉन्स्पेसिफिक युरेथ्राय्टिस, ट्राय्कोमोनियसिस, कँडिडियासिस, मोनिलियासिस असे गुप्तरोगांचे अनेक प्रकार आहेत. फक्त एड्सविषयी लोकांमध्ये थोडीफार जनजागृती आहे. ‘सुरक्षित शरीरसंबंधांसाठी कंडोम (निरोध) वापरा’, असं आपण ऐकतो. वाचतो. पण हे अर्धसत्य आहे. जर कंडोम जुना असला, फाटला, नीट वापरता आला नाही, तर गुप्तरोग नाहीतर संभोग होण्याची शक्यता जास्त असते. कंडोमची सुरक्षितता ९० टक्के असते. मग यावर पर्याय काय तर संयम! दुसरा उपाय हस्तमैथुन. लैंगिक ताण मोकळा होण्यासाठी हा बिनधोक उपाय असतो. यामुळे कोणाचंही नुकसान होत नाही. तिसरा पर्याय आहे केवळ एकाच स्त्रीशी संबंध राखणं.
लैंगिकता शिक्षण, लैंगिक शिक्षण आणि कामशिक्षण यात फरक काय?
> लैंगिक शिक्षण म्हणजे लिंगविषयक किंवा प्रजोत्पादनांच्या अवयवांचं शिक्षण. हे शिक्षण ‘सेक्स एज्युकेशन’ म्हणूनही ओळखलं जातं. ‘कामशिक्षण’ याचा अर्थ वैषयिक सुखाचं शिक्षण. लैंगिकता या शब्दाला व्यापक अर्थ आहे. लैंगिकता म्हणजे लिंगविषयक मानसिकता. स्त्री किंवा पुरुषाचे लिंगविषयक विचार, भावना आणि वर्तन म्हणजे लैंगिकता. लैंगिकता ही मनात असते. ती सर्वागीण स्वरूपाची असते. जन्मापासून मरणापर्यंत साथ देते. लैंगिकता जितकी नाजूक तितकी स्फोटक असते. लैंगिकता ही माणसाच्या व्यक्तिमत्त्वाचा एक पैलू असते. या लैंगिकतेविषयी शिक्षण म्हणजे लैंगिकता शिक्षण. लैंगिकता शिक्षण म्हणजे संभोगाचं शिक्षण हा सर्वात मोठा गैरसमज आहे. लैंगिकता शिक्षणास ‘युवा आरोग्य शिक्षण’ म्हणण्यासही काही हरकत नाही.
वृद्धांचं सहजीवन, त्यांची लिव्ह इन लाइफ रिलेशनशिप, त्यांचं लैंगिक जीवन याविषयी समाज बोल्ड झाला आहे का?
> वृद्धांच्या सहजीवनाविषयी समाज बोल्ड झालेला आहे, असं वाटत नाही. वृद्धांचे ‘लिव्ह इन लाइफ रिलेशनशिप’मधील संबंध आपल्याकडच्या लोकांना किती पटतील, हे सांगणं अवघड आहे.
समलिंगी संबंधांबद्दल तुमचं काय मत आहे?
– समलिंगी संबंध निर्माण व्हायला आनुवंशिकता, हे कारण असू शकतं. त्या संबंधांना आम्ही समलिंगीयासक्ती म्हणतो. व्यक्तीच्या समलिंगीयासक्त वर्तनाला त्याच्या पेशीत असणारं ‘एएक्सक्यू २८’ हे गुणसूत्र कारणीभूत ठरतं. त्यावर त्याचा ताबा नसतो. त्यामुळे समलिंगीयासक्त व्यक्तीला बदलवणं शक्य नसतं. काही म्हणतात की, समलिंगीयासक्त व्यक्तींच्या मेंदूत विशिष्ट पेशींचा समूह असतो. तरीही नेमकं कारण सापडलेलं नाही. माणूस गर्भावस्थेत असताना त्याच्या आईच्या शरीरात हॉर्मोन्सचं असंतुलन असेल तर मग तो माणूस पुढे समलिंगीयासक्त बनतो, असंही काही संशोधकांचं मत आहे. काही तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की, संस्कारानुसार मुलं समलिंगी बनतात. उदा. मुलाला मुलीचे कपडे घालणं, त्याला बाहुलीने खेळायला लावणं. आपल्या देशातील कायद्यानुसार समलिंगीयासक्ती हा गुन्हा मानला जातो.
समलिंगीयासक्तीला विरोध नाही, पण आपला जोडीदार बदलणा-या समलिंगीयासक्त व्यक्तीला एड्स, गुप्तरोग, कावीळ होण्याची शक्यता जास्त असते. जास्त वर्षे घरापासून दूर राहिल्यास ती व्यक्ती समलिंगी होते. संधी मिळाली किंवा ते घरी परतले की पूर्वीप्रमाणे भिन्नलिंगीयासक्त होतात. अशा व्यक्तीत समलिंगीयासक्ती हा कामतृप्तीचा ‘पर्यायी मार्ग’ असतो.
तुम्हाला असं वाटतंय का, की आजही देशातील लोकांची लैंगिक समस्या ही प्रमुख समस्या आहे?
> आजच्या विज्ञानयुगातही मला असं वाटतंय की, ही आपल्या देशातील एक प्रमुख समस्या आहे. तसं नसतं तर ‘निर्भया’, ‘दामिनी’, ‘गुडियाँ’ या घटना नसत्या. लहान लहान मुलींवर अनैसर्गिक पद्धतीने बलात्कार झाले नसते.
कामजीवनाबद्दल जागृती करण्याचं तुम्ही जे काम करताय, त्याची आजवर फलनिष्पत्ती दिसून आली आहे का?
> ‘एड्स’ या गुप्तरोगाचा प्रसार वाढल्यापासून आपल्या देशात विशेषत: महाराष्ट्रात लैंगिक शिक्षणाविषयी थोडीफार का होईना पण जागृती निर्माण झाली आहे. दक्षिण भारतात कामजीवनाविषयी जास्त प्रमाणात जागृती झाली आहे. .
उत्तरेकडे आणि पूर्वेकडे या जागृतीचं प्रमाण अत्यल्प आहे. मध्य प्रदेश, बिहार, ओदिशा, राजस्थान, दिल्ली इथे प्रमाण कमी आहे. ‘निरामय कामजीवन’ या पुस्तकाने बरंचसं काम केलं आहे. तरीही साहित्यिक पातळीवर या विषयाला फारसं महत्त्व नाही, याची खंत आहे.