वनसंपदेची मोठी पर्वणी सह्याद्रीच्या रांगेतील वैभववाडी तालुक्याला लाभली आहे. डोंगरची काळी मैना आणि खायला फैना अशी आरोळी ऐकली की करवंदांची चव चटकन ओठावर येते.
वैभववाडी – वनसंपदेची मोठी पर्वणी सह्याद्रीच्या रांगेतील वैभववाडी तालुक्याला लाभली आहे. डोंगरची काळी मैना आणि खायला फैना अशी आरोळी ऐकली की करवंदांची चव चटकन ओठावर येते. वैभववाडी तालुक्यातील विशेषता सह्याद्रीच्या भागातील गावात मोठय़ा प्रमाणात करवंदांची विक्री होत आहे.
करवंदांपासून संध्या चांगले उत्पन्न मिळत असल्याने ग्रामीण भागातील कुटुंबासाठी हा एक चांगला व्यवसाय बनला आहे. दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. याचा सर्वात जास्त फटका सर्वसामान्याला बसत आहे. जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. यातून मार्ग काढताना शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
महागाईवर मात करण्यासाठी डोंगरातील करवंदांपासून झटपट उत्पन्न मिळत असल्याने याकडे लोकांचा कल वाढला आहे. धनगर समाजाबरोबर इतरही मंडळी या व्यवसायात सरसावली आहेत. जंगल परिसरातून डोंगर कपा-यातून जंगलाचा रानमेवा काढण्यासाठी भल्या पहाटे उठून रानात जाऊन काटय़ा-कुटय़ातून लोक धडपडत आहेत.
पुरुषाप्रमाणे महिलाही करवंदांपासून उत्पन्न मिळविण्यासाठी पुढे सरसावल्या आहेत. उन्हाळय़ाच्या दिवसांत वाढता खर्च व घर संसाराचा गाडा चालवण्यासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी काही रक्कम बचत म्हणून राहावी यासाठी ही मंडळी करवंदे विक्री करताना दिसत आहेत. एप्रिल व मे महिन्यात हा रानमेवा काढताना लोक दिसत आहे. डोक्यावर टोपली घेऊन राना-वनात ही मंडळी फिरत असल्याने संपूर्ण जंगल परिसर कुजबुजू लागला आहे.
सध्या शाळांना सुट्टय़ा पडल्याने पर्यटकांचा ओढा जिल्ह्याकडे जास्त आहे. घाटमाथ्यावरील पर्यटक सिंधुदुर्ग व गोवा या ठिकाणी येण्यासाठी करूळ घाट मार्गाचा अवलंब करत आहेत. गर्दीच्या ठिकाणी पर्यटकांना हा रानमेवा सहजरीत्या उपलब्ध होत आहे.
महामार्गादरम्यान करवंदांची विक्री होत असल्याने ठिकठिकाणी पर्यटक या रानमेव्याचा आस्वाद मनमुरादपणे घेत आहेत. करवंदांबरोबर जांभूळ, काजूगर याचीही विक्री मोठय़ा प्रमाणात केली जात आहे. करवंदे काढण्यासाठी जंगलात ४ ते ५ किमी पायपीट करून करवंदे घेऊन येतात. व्यवसाय करणारे व्यापारी गावागावात जाऊन करवंदे खरेदी करतात.
व्यापा-याकडून प्रत्येक टोपलीला ९० ते १०० इतका चांगला दर शेतकऱ्यांना दिला जात आहे. त्यामुळे एकाच कुटुंबातील माणसे दिवसाला अंदाजे ७०० ते ८०० रुपये इतके उत्पन्न मिळवत आहेत. संसाराचा गाडा हाकताना बरेच जण याच पैशातून जीवनावश्यक गरजा भागविताना दिसत आहेत.